Tuesday, 29 July 2014


ओळख .......




आज एक वेगळाच विषय डोक्यात घोळतोय. आपण कित्येकदा असं म्हणतो नाही की, मी तिला किंवा त्याला चांगलीच ओळखून आहे. किती बिनधास्त, केवढं मोठ्ठ धाडसं करतो आपण. खर तर, नाही ओळखत आपण इतकं कोणालाच. किंवा आपले अंदाज चुकतात. का आपण ओळखायलाच चुकतो माणसांना ? संदीप खरेच्या कवितेत मस्त ओळी आहेत, ''भेट जरी ना या जन्मातून ओळख झाली इतकी आतून. पश्न मला जो पडला नाही त्याचेही तिज सुचते उत्तर.'' अशी इतकी आतून ओळख झाली तर...... कोणाला काही प्रकटपणे सांगावच लागणार नाही. एकमेकांच्या सहवासात राहून  अशी ओळख होत असावी. पण तसंही नसतं. मग काय हवं असतं अशी ओळख व्हायला ? त्याला सहवासाची नाही तर मनांची नाळ जोडली जाण्याची गरज असते. या ओळखीतून ब-याच गोष्टी घडतात. काळजी, प्रेम, आपुलकी , आस्था, आधार या मानसिक गरजा अशा ओळखीतून घडतात , वाढतात. 
रोज दिसणारी अनेक माणसं , ज्यांच नावसुध्दा माहिती नसत त्यांची तोंडओळख एक वेगळ नातं निर्माण करते. सकाऴी फिरायला जाताना ठराविक कट्ट्यावर बसलेले ज्येष्ठ नागरिक एखाद्या दिवशी नसले तरी जीव उगाच कासावीस होतो. रोज ठराविक वेळी येणा-या फेरीवाल्याचा आवाज आला नाही, तर मन त्या आवाजाच्या दिशेनी शोध घेतं. देवळात रोज येणारी माणसं एकमेकांना नावानी ओळखत नसतीलही. पण कोणी एखाद्या दिवशी दिसलं नाही तर बेचैन व्हायला होतं. ट्रेनमध्ये  किंवा बसमध्ये तर अशा तोंडओळखी कितीतरी असतात.  नुसत स्माईल पुरतं  ओळखींना. आता अशा ओळखींना काय लागतं हो ? पण लोक तितकं मोकळसुध्दा वागत नाहीत.असो.... तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
एखाद्या व्यक्तिला आपण नुसतच बघत असतो. पण ओळखत नसतो. त्याच्या किंवा तिच्याबद्दल अंदाज - आडाखे बांधतो. पण ते अगदीच चूक ठरतात. रागीट वाटणारी एखादी व्यक्ति एकदम प्रेमळ असते. प्रेमळ वाटणारी एखादी व्यक्ति तुसडी असते. म्हणजे हे वरवरचं ओळखणं किती फोल ठरतं. 
फार कशाला अगदी रस्त्यावर दिसणारी कुत्री सुध्दा अशी ओळख ठेवतात. माझ्या ओळखीचे एक आहेत. ते कॉलनीत  जाण्याची चाहूल लागताच रस्त्यावरची कुत्री लगेच शेपट्या वर करून त्यांच्या मागे जातात. असं म्हणतात की,  प्राणीजगत निसर्गाच्या जास्त जवळ असतं. त्यामुळे त्यांना शुध्द मनाची माणसं लगेच कळतात किंवा ते लगेच ओळखतात.  ही आतली ओळख  आहे नाही का ? 
सुसंवाद वाढून मनांची विण घट्ट व्हायला हवी. एकमेकांना मदतीची, प्रेमाची, आपुलकीची गरज असते.  शुध्द मनानी मैत्री करायला हवी..... अगदी कोणाशीही... अशा ओळखी माणसाचं खरं दर्शन घडवतात. नाती निर्माण करतात. सगळ विश्वच माझं घर आहे हे संतवचन अशा ओळखीतून सत्यात उतरेल. आता तर फेसबुक, व्हॉटस अप आणि अशी कितीतरी माध्यमं  आहेत, ज्यातून ओळखी वाढतात. आपली ओऴख अशीच झालीय नाही का ?  तर, मित्र मैत्रिणींनो अशीच ओळख राहूदे.... किंबहुना वाढूदे.....  

1 comment:

  1. Olakh nasali tari chalel pan Nisargashi asaleli naal tutaka kama naye. So always try to be natural.

    ReplyDelete