Friday, 11 July 2014



मोकळेपणानी जपलेलं मोकळ नात...........

मराठी साहित्यामध्ये स्त्री लेखिकांनी आपल्या व्यथा ,वेदना मांडण्याचा प्रयत्न केला. पुरूष लेखकांच्या नजरेतून निर्माण झालेल्या साहित्यापेक्षा हे जास्त खरं होतं. कारण ''ज्याचं जळत, त्यालाच कळतं'' याप्रमाणे ही व्यथा स्त्रियांनी अधिक सक्षमपणे मांडली. तरीही हा मोकळेपणा समाजाची बंधनं पाळून लिहिला गेला. ज्या लेखिकांनी शृंगारिक, मनाला खरच पटेल ते आणि हवं ते लिहिलं त्याकडे चांगल्या दृष्टीनी पाहिलं गेलं नाही. इतकं स्पष्ट बोलण्याची काय गरज आहे ? हे म्हणजे जरा अतिच आहे. असे शेरे अगदी स्त्रियांनीसुध्दा मारले.

मोकळेपणानी वागावसं वाटणं, व्यक्त होणं याला इतकी बंधनं का असतात ? निरपेक्ष, निखळ असं काही असू शकत नाही का ? जग बदललं आहे, समाज विकसित झाला आहे असं म्हणताना आजही  स्त्री - पुरूष संबंधाकडे एका ठराविक चष्म्यातून का पाहिलं जातं ? मैत्री ही फक्त मुली- मुलींची आणि मुला - मुलांचीच असते का ? एखादी स्त्री आणि पुरूष निरपेक्ष मैत्री करूच शकत नाहीत?

तुम्ही म्हणाल हे सगळ आऊटडेटेड झालयं. पण मित्र मैत्रिणींनो तसं नाहीये. मोकळेपणानी वागण आजही समाजाला रूचत नाही. कोणालाही न कळता , गुपचुप , लपत - छपत मैत्री करणं हे किती लाजिरवाण आहे. स्त्रियासुध्दा आपल्या नव-याची मैत्रीण स्विकारत नाहीत. पुरूषांना तर याबाबतीत जमेसच धरायचं नाही. कितीही म्हणलं तरी आजही पुरूषसत्ताक राजवटच आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा पुरूषांना आपल्या बायकोचा मित्र समजतो. अशा नात्यांची गरज मान्य का होत नाही ? दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर न करण्याची जबाबदारी  पार पाडणं हेही महत्त्वाचं आहेच. पण विश्वास टाकून तर पहा. अशी नाती निर्माण झाली आणि ती मोकळेपणानी स्विकारली गेली तर बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होणारच नाहीत.

मिलिंद बोकील सरांच्या ''एकम'' या कादंबरीमध्ये स्त्री - पुरुष नात्याबद्दल ते फार छान सांगतात. सुभद्रा आणि देवकी या मैत्रिणींमधल्या संवादामध्ये या नात्याविषयी सुभद्रा सांगते, ''स्त्री - पुरूषांमध्ये बेसिक आकर्षण असतं. त्याचा बॉंड खूप घट्ट असतो. या आकर्षणातून जे नातं निर्माण होतं ते कायम टिकणारं आहे. मग तुम्ही लग्न करता का नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. स्त्री - पुरूष नातं बेसिक आहे. अगदी मुलभूत. पण बायकांचा प्रॉब्लेम हा आहे की त्या असं नातं पुरूषांशी निर्माण करू शकत नाहीत. पुरूषांचा प्रॉब्लेम हा आहे की त्यांना ते कोणाशीच निर्माण करायचं नसतं. त्यामुळे दोघही करंटेच. ''
या सगळ्या विचारावर संदीप खरेची एक मस्त कविता अगदी पटकन आठवली.
मी मनस्वीतेला पाप मानले नाही
अन उपभोगाला शाप मानले नाही
ढग काळा  जेथून एकही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही.

2 comments:

  1. Mast. Sundar. Kharach stri-purush nikhal maitri asavi, asa malahi khup watat!

    ReplyDelete
  2. Khup chan.. It all depends on person to person .
    --deepali

    ReplyDelete