Saturday, 5 July 2014


शहाणे अंतर...........




नुकतीच निलिमा गुंडींची एक कविता वाचनात आली,
तर आपण विचार करूया आपल्या नात्याचा , त्यातल्या जवळकीचा आणि अंतराचा
तशा मिलनासाठी अनेक प्रतिमा आहेत
उदाहरणार्थ .......... धरतीवर टेकलेलं आकाश,
प्रतिमा थोडी खरवडली की कळेल
धरती खरी एकटीच आहे... कारण आकाश म्हणजे चक्क आभास...
दुसरीही प्रतिमा आहे तयार
सुरात वाजणारी सतार
सतारीकडे नीट पाहूया म्हणजे कळेल
सूर लागण्यासाठी कसे तारांमध्ये अंतर ठेवले आहे
आपल्या नात्याविषयी मला हेच म्हणायचे आहे...
              या कवितेतून ''अंतर'' या अगदी सहज वापरल्या जाणा-या शब्दाचा किती छान अर्थबोध होतो. विरह ... अंतर हे  शब्द चांगल्या अर्थानी वापरले जात नाहीत. पण त्यामध्येसुध्दा एक वेगळीच मजा आहे. तुम्ही म्हणाल, भेटण्यात जी मजा आहे, ती अंतर असण्यात कशी असेल?
पण कधीतरी विचार करून बघा. ज्या व्यक्तिवर आपण हातचं काहीही न राखता प्रेम करतो . ती व्यक्ति कितीही दिवसांनी भेटली तरी त्या प्रेमात काहीही फरत पडत नाही. कारण भेट होणं म्हणजे अंतर मिटणं. म्हणजे प्रवास संपण... मुक्कामाच्या ठिकाणी जाण्याची आस प्रत्येकालाच असते. पण ते ठिकाण आलं की प्रवास थाबतो. खरी मजा तर प्रवासात आहे ना?
दोन व्यक्तिंमध्ये अंतर असेल तरच त्यांना एकमेकांची किती ओढ आहे हे कळेल. कायम जवळ असणारी सगळी माणसं आपल्याला खरच आवडतात का ? अगदी ज्या व्यक्तिवर भरभरून प्रेम करतो तीसुध्दा रोज सहवासात आली तर ते प्रेम तितकच उत्कट राहू शकत का ?
हल्ली एक खूप चांगला शब्द ऐकायला मिळतो. ''स्पेस '' प्रत्येकाला ती हवी असते. कोणीही आपल्याशी फार जास्त जवळीक साधून आपल्या खाजगी गोष्टीत लक्ष घालायला लागलं तर ते आपल्याला आवडत नाही. मग  ती व्यक्ति कितीही जवळची  असो. ही स्पेस, हे अंतर हवच. कारण हे अंतर शहाणं असत.
अंतरच आपल्याला प्रेमाच्या साक्षात्काराची जाणीव करून देत. प्रत्येक बाईचा असा गोड गैरसमज असतो की, मी नसले तर घरातलं पानही हलणार नाही. एकदा बाहेर गेले ना मग कळेल. वगैरे.... तसं होत असेलही. पण या अंतरामुळेच घरातल्यांनासुध्दा तिची किंमत कळते. म्हणून बायकांनीसुध्दा आपली स्पेस जपण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. संसार, नोकरी, मुलं - बाळ हे सगळ आहेच. पण तरीही जसं घरातल्या बाकीच्यांना स्पेस हवी. तशी तिलाही हवी. या उदाहरणामध्ये अंतर किती महत्त्वाची भूंमिका बजावतं. हो की नाही ?
प्रेमी जीवांच्या बाबतीत हे अंतर त्रासदायक ठरत असेल. पण शरीरानी दूर गेल्यावरच मन अधिक जवळ येतात. हे अंतरच दोघांमधला दुवा ठरतं. ख-या प्रेमाची जाणीव करून देत.
संदीप खरेनी या शहाण्या अंतराचं वर्णन फार छान केलयं. मला खूप जास्त आवडलेली ही कविता आहे.
कितीक हळवे, कितीक सुंदर , किती शहाणे अपुले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जासी माझ्यासाठी माझ्यानंतर...
भेट जरी ना या जन्‍मातून, ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर
किती शहाणे अपुले अंतर...
पण मित्र मैत्रिणींनो, विचारांमध्ये आणि मनांमध्ये अंतर पडू देऊ नका हं. काय ते म्हणतात ना , KEEP IN TOUCH.

No comments:

Post a Comment