Thursday, 3 July 2014



झिम्मड पावसाची...........

              मन चिंब पावसाळी, घरट्यात रंग ओले
              घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले.
                चिंब असा हा पाऊस आज अनुभवला.  घरातून बाहेर पडताना हलक्याच वाटणा-या सरी जोरदार बरसल्या. अगदी हव्या तशा. आमच्या तळेगावला वेगळा वर्षा विहार करण्याची गरज नाही. मुद्दाम छत्री आणि रेनकोट न घेता बाहेर पडलं ,की वर्षा विहार घडतो. मनावर आलेली मरगळ कुठल्या कुठे पळाली. पावसाच्या या धारा झेलताना मन प्रसन्न झालं. तप्त अशा धरतीवर पाऊस बरसला की ती आनंदित का होत असावी? ते पावसात मस्त भिजल्याशिवाय कळणार नाही. व्हॉटस अॅपवर गरम भजी, चहा अशा इमेजेस टाकून जळवणा-या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आज तळेगावात मस्त पाऊस पडला.
                   श्रावणातल्या पावसाची आणि ढगांची मजा किती आणि कशी सांगावी? सूर्यबिंब बघता बघता नाहीसं होतं. ढग आपली काळी सावळी छाया धरेवर पाडतात. मग सुरु होतो मस्त पाऊस. मध्येच ढग वा-यामुळे पांगतात. सोसाट्याचा वारा सुरु होतो आणि अचानक पाऊस थांबतो. मग हळूच सूर्य ढगांमागून डोकावतो. जणू सृष्टीतला लपंडावच चालू असतो. मग पिवळा, केशरी, लाल असे रंग आकाशात पसरु लागतात. निळे, काळे ढग त्यांना रुपेरी किनार असं लोभसवाणं दृश्य बघायला मिळतं. बराच वेळ ही रंगपंचमी चालू असते. मग पुन्हा एकदा जांभळे, काळे ढग फिरुन येतात आणि लाल, पिवळ्या छटा कुठच्या कुठे लपुन जातात. पाऊस मुसळधार पडतानासुध्दा शेजारचे घर एकवेळ दिसत नाही पण आकाश मात्र निराळे, पांढरट, मध्येच काळसर दिसते. संध्याकाळी ही काळसर छटा पाहून सगळं वातावरण अंगावरच येतं. पण तेही काही काळापुरतच. मस्त पावसानी ही भीती लगेच पळून जाते.
                       उन्हाळ्यानंतर दोन, तीन महिने वठलेल्या झाडांना कोवळी तांबुस पालवी फुटायला लागते. काही दिवसांपूर्वी हे झाड वठल्यासारखं वाटत होतं यावर विश्वासही बसत नाही. रुक्ष वाटाव असं जणू काही घडलच नव्हत अशी ही झाडं दिसु लागतात. मऊ मातीतून हिरवे अंकुर फुटले तर नवल नाही. पण रुक्ष, काळे दगडही या दिवसात हिरवी शाल पांघरुन बसतात. मानव जातीला निसर्गाकडून मिळालेली ही केवढी मोठी शिकवण आहे. सगळ काही संपलय असं  न म्हणता नव्या उमेदीने जगलं पाहिजे. हा संदेश हा ऋतु आपल्याला देतो.
                       हा ऋतू प्रेमिकांना आणखी ओढ लावतो. त्याच्या असण्यानी रिमझिम भासतो. तर त्याच्या नसण्यानी काट्यांप्रमाणे टोचतो. सगळ्याच कवींना प्रेम आणि पावसाच्या अतूट नात्याचं वर्णन करण्याचा मोह आवरता आलेला नाही.  म्हणूनच कवी म्हणतो,
                      तृप्त झाली शांत धरणी,  मधुस्मिते हिरव्या कुरणी,
                     पुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती,
                      भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती.
  पावसाळ्यातच मानवालाच नाही तर सा-या सृष्टीलाच प्रेमाची बाधा झालेली असते.
अशा या मस्त पावसाचा खूप आनंद घ्या.


No comments:

Post a Comment