Sunday, 27 July 2014


जरा जपून.......

सकाळची वेळ होती.... मॉर्निंग वॉकसाठी एक आजोबा रस्ता क्रॉस करत होते. अचानक रॉंग साईडनी एका मुलानी गाडी घातली. ते आजोबा बिचारे घाबरून गेले. बरं त्या मुलाला आपण काही चुकलोय याची जाणीवसुध्दा नव्हती. पुढे जाऊन निर्लज्जपणे हसत तो निघून गेला......
आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलावस वाटतय. निदान तळेगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात जाणवणारी ही समस्या आहे.कदाचित तुम्हालाही जाणवत असेल. गेले काही दिवस मी बघतीय, टू व्हीलरवर अगदी लहान मुलं भरधाव वेगानी जातायत. वेळ सकाळची असो की संध्याकाळची,  हल्ली ट्रॅफिकची समस्या गंभीर बनते आहे. त्यातच ही मुलं फारसा विचार न करता गाड्या हाणत असतात. पावसाळ्याच्या दिवसात किती घसरडे रस्ते झाले आहेत. त्यातच अशा पध्दतीनी गाडी चालवणं म्हणजे ''आ बैल मुझे मार'' असं आहे. बरं याबद्दल या मुलांना काही सांगायला जावं तर त्यांना ते पटत नाही. ''आमच्या आई बाबांना काही प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्ही का टेन्शन घेताय उगाच'' असली उत्तर ऐकावी लागतात. एकदा शहाणपणा करून एका मुलाच्या पालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या महाशयांनीदेखील असच उत्तर दिलं, ''अहो  ठीक आहे ना वय आहे मुलांच. काही प्रॉब्लेम होत नाहीये ना , मग उगाच कशाला घाबरता
तुम्ही ? ''तो मुलगा  सुरुवातीला सांगितल्यावर असं का बोलला असेल ते आत्ता लक्षात आलं. आडातच नाही तर पोहो-यात कुठून येणार.
याच गंभीर विषयावर एकदा माझ्या ओळखीच्या काकू बोलल्या होत्या. त्यांनी एका मुलाला असच ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न केला. एक अगदी शाळकरी मुलगा भरधाव वेगात चारचाकी चालवत होता. त्याला त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यानी उलट काकूंनाच समजावलं, ''तुम्ही जुन्या पिढीतले लोक फार घाबरट आहात. आता जग बदललं आहे.  कुठल्या जमान्यात आहात तुम्ही.''  काकूंनी हार मानली नाही. त्या बिचा-या त्याच्या वडिलांकडे गेल्या. त्यांना म्हणाल्या, '' अहो तुम्ही तरी समजावून सांगा तुमच्या मुलाला. '' तर त्याचे वडिल म्हणाले, '' अहो काकू , गाडी आमची, मुलगा आमचा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? आणि आमचं लक्ष आहे ना आमच्या मुलाकडे. तुम्ही कशाला उगाच काळजी करताय ? ''
या दोन्ही उदारणावरून  त्या मुलांइतकाच त्यांच्या आई वडिलांचा पण दोष आहे असं मला वाटतं. शाळकरी मुलांना गाडी हातात देणं चूक आहे. एक तर त्यांच वय आणि मन दोन्ही विचित्र असतं. या वयात फास्ट गाडी चालवण्याची उर्मी त्यांच्या मनात असली तर ते चूक नाही. धूम १, २, ३ आणि येणारे सगळे तसचं इतर सिनेमांमध्येदेखील गाड्या उडवणं हा प्रकार ही मुलं आणि मुलीसुध्दा पहात असतातच. त्यात पालकांचा पाठिंबा मिळाला तर काय विचारायलाच नको.  या सगळयामुळे आपल्या मुलाचा जीव धोक्यात येईलच. पण चालणा-यांनासुध्दा धोका आहे. हे लक्षात घ्यायला हवं. गाडी चालवण्याची क्रेझ असणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. नाही का ? लायसन्सवर वय टाकण्यामागे नक्कीच खूप मोठा विचार केला गेला असणार. आपण नेहमी कायद्यांच्या बाबतीत उलट सुलट बोलतो. पण हे कायदे  आपण आणि आपल्या आसपासचे लोक पाळतात की नाही ही जबाबदारी पण आपलीच आहे
ना ?
 कोवळ्या वयाच्या या सळसळत्या तरूणाईला जपण्याचं आणि त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम आपलच आहे. आपला जीव इतका स्वस्त नाही की तो अशा रीतीने गमवायला लागावा. नंतर दुःख करत बसण्यात काहीही अर्थ नाही. खूप मनापासून विनंती आहे की, चुकीच्या वयात मुलांच्या हातात अशा कोणत्याही गोष्टी पडू देऊ नका, की ज्यामुळे नंतर पश्चाताप करावा लागेल.
एका कवीच्या सुंदर ओळी आठवतात,
उसळत्या रक्तात मला ज्वालामुखीचा दाह दे,
वादळाची दे गती , पण भान ध्येयाचे असूदे. 

No comments:

Post a Comment