Monday, 4 August 2014

मैत्री............




काल 3 ऑगस्टच्या दिवशी मैत्रीदिनाच्या निमित्तानी तुम्ही तत्वज्ञानाच्या अनेक मेसेजेसचं प्राशन केलं असेलच. बघा, माझी भाषा सुध्दा किती जड झालीय या सगळ्या तमाम मेसेजेसमुऴे. काही मेसेज तर मला कळलेच नाहीत. तुमचंही तसच झालं का
 हो ? मैत्री हे नातं किती सहज, सोपं आहे. अगदी प्रेमापेक्षा श्रेष्ठ. हो थोड धाडस करतीय आज. कारण एखाद्या व्यक्तिवर भरभरून केलेलं प्रेम काही वेळा निराशा पदरी घालतं. पण मैत्रीमध्ये असं कधीच होत नाही. 
अगदी बालवाडीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या जीवाभावाच्या मित्र मैत्रिणींना आठवून बघा. प्रत्येक वळणावर त्यांनी दिलेली मोलाची साथ किती महत्त्वाची असते. कधी आपण चुकलो तर जो आपल्याला डोस देतो, तो खरा मित्र. आपलं भलं चिंतणारा, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करणारा, आपली सुख - दुःखात साथ देणारा मित्र भेटणं हे भाग्याचं लक्षण आहे. 
मैत्री दिनाच्या निमित्ताने माझ्या शाळेतले सगळे मित्र मैत्रीणी झरझर डोळ्यासमोर आले. आमच्या वर्गात कधीही विचित्र स्पर्धा नव्हती. आमच्या वर्गातला एक मुलगा खूप हुशार होता. तो दहावीत बोर्डात आला. पण आम्हाला कधीच असूया वाटली नाही. मला आठवतय, आम्ही मुली त्याचं अभिनंदन करायला त्याच्या घरी गेलो, तेव्हा लाजून तो आत पळून गेला होता. असाच अजून एक मित्र ऑफ तासाला प्रभू तू दयाळू गाणं म्हणणारा. आम्ही मुली तर अभ्यासापेक्षा नाट्यवाचन, स्पर्धा, गॅदरिंग, गाणं यामध्ये रमायचो. आमच्यातही हुशार मुली होत्याच. प्रत्येक  मित्र मैत्रिणीची एक वेगळी आठवण आहे. ते सगळ सांगत बसले तर वेळ पुरणार नाही. या सगळ्यांची आज खूप आठवण येतीय. अगदी त्यावेळी बोललो नव्हतो इतकं भरभरून बोलावस वाटतय. कारण आमच्या भोरला मुलामुलींनी मोकळेपणानी बोलण्याची सोय निदान त्यावेळी तरी नव्हती. आज व्हॉटस अप वर आम्ही सगळे गप्पा मारतो. पण त्यावेळी फार बोलायचो नाही. आता आठवलं तरी हसू येतं. 
नंतर कॉलेजमध्ये फार मोठा ग्रुप नाही होऊ शकला. आम्ही चारचौघी गटून असायचो. महिन्यातून एकदा मिळणा-या दहा रूपयांचा चहा प्यायचो. खूप गप्पा मारायचो. नाटकाचा एक ग्रुप होता. पण ते सिनिअर होते सगळे.  कॉलेजपेक्षा माझं मन शाळेत जास्त रमत. आजही भोरच्या एसटीतून जाताना, ''हे आमचं राजा रघुनाथराव विद्यालय'' असं पालूपद दर वेळी माझ्या मुलाला ऐकायला लागतं. 
मैत्री म्हणजे नेमकं काय हो ? पुन्हा संदीप खरेच या भावना व्यक्त करण्यासाठी धावून येतो. खर तर ही कविता प्रेमी जन आपल्या अॅंगलनी घेतील. पण मला ही निरपेक्ष, निखळ मैत्रीच वाटते. संदीप म्हणतो, ''नात्याला या नकोच नाव. दोघांचाही एकच गाव. वेगवेगळे प्रवास तरीही, समान दोघांमधले काही, ठेच लागते एकाला, का ?  रक्ताळे दुस-याचा पाय.'' ही एकरूपता इतकी होते, की काही सांगायची गरज उरत नाही. अशी नाती बनवायला हवीत मित्रांनो. तरच ख-या अर्थानी आपण जगायला शिकू. फेसबुकवर श्री श्री रविशंकरांचं मैत्रीबद्लचं हे विधान मनाला एकदम भावलं. ''तुम अपने मित्र से क्या चाहते हो, केवल मित्रता और कुछ 
नही. '' चला तर,  दोस्तहो जपूया अशी निरपेक्ष मैत्री ? 

No comments:

Post a Comment