Wednesday, 13 August 2014

मला राग येतो......


आता अगदी एक लई भारी गाणं हिट होतय मित्रांनो.  राग येतो, मला राग येतो असं काहीतरी आहे. मला पण राग येतो. कशाचा? माणसांचा नाही येत. माणसांच्या वृत्तीचा येतो. तुम्ही म्हणाल हे काय नवीन ? पण खरच माणसाचा दोष नसतो. कारण कित्येक वेळा माणसं परिस्थितीप्रमाणे वागतात. म्हणजे त्या त्या परिस्थितीमध्ये जे योग्य वाटत तशीच वागतात, प्रत्येकाच्या बुध्दिनुसार, आवाक्यानुसार . फक्त मला राग याचा येतो की. तशीच परिस्थिती पुन्हा येते तेव्हा तरी आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. 
माझ्या परिचयात अशी किती तरी मोठी, विद्वान माणसं आहेत ज्यांना आपल्या मोठेपणाचं दुस-यावर ओझं टाकण्याची सवय आहे. खर तर  सगळ्यांना त्यांच्या मोठेपणाविषयी आदर असतो. पण सारखं मी , माझं , मला असं करून ही माणसं आपलं मोठेपण घालवून बसतात. मोठेपणा ही दाखवायची गोष्ट नसून दुस-यांनी अनुभवायची आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे दुस-याला सतत नावं ठेवणा-यांची मोठी पलटणच आहे आयुष्यात. काय मिळवतात ही माणसं असं वागून ? आपली नजर आणि मन स्वच्छ ठेवून जगाकडे कधी बघणार आपण ? मराठीत त्याला गॉसिपिंग  की काय ते म्हणतात. नका आपला वेळ वाया घालवू या सगळ्यात. कोण कसं वाईट आहे? कुणाचं काय चुकतय ?  कोण कोणाशी बोलतयं ? कोण कोणाच्या घरी जातय ? आज काय मग अगदी नट्टा पट्टा, काय आज अगदी लंकेची पार्वती ? एक ना अनेक प्रश्न असतात यांच्या मनात. बरं हे सगळ प्रांजळ हेतूनी विचारलं तर काही वाटत नाही. पण मनात सतत एक जबरदस्त संशय, असूया, हेवा असतो. या सगळ्यानी आपलं स्वतः चं मन कलूषित होतं. बाकी काही नाही. बरं हे सगळ जिच्याबद्दल किंवा ज्याच्याबदद्ल बोलायचं ना त्याच्या माघारी बोललं जातं. त्याचा काहीच उपयोग होत नाही. वेळ मात्र वाया जातो. 
मुलांना आणि नव्या पिढीला समजून न घेता त्यांना सतत उपदेश करणा-यांचा पण मला राग येतो. त्यांच्या भावविश्वात गेल्यावरच त्यांचे ताण कळू शकतील. जे लोक आमच्या वेळी असं नव्हतं, तसं नव्हतं असं म्हणतात ना, त्यांनी एक दिवसभर मुलांच्या शाळेत जाऊन बसावं. एवढी छोटी पिल्लं ती, पण त्यांना किती ताण असतो. इंग्लिश मिडियम असो की मराठी. किती पसारा झालाय शिक्षणाचा. आता काही प्रश्न मला या लोकांना विचारावासे वाटतात, तुमच्या वेळी होती का स्कूल बस ? शाळा घरापासून  एक किंवा दोन तासांच्या अंतरावर आहे हा अनुभव तुम्ही घेतलाय ? तुमच्या शाळेत  सारखे सारखे प्रोजेक्टस होते का ? तुमची आई कामावर जायची का ? घराच कुलुप उघडून घरी एकटं बसण्याची वेळ तुमच्यावर आलीय ? आपली बक्षीस पहायला सुध्दा घरी कोणी नाही हा अनुभव घेतलाय ? शाळेला सुट्टी असूनही शिबीरांमध्ये तुमचा जीव घुसमटलाय ? खूप प्रलोभनं आहेत आजुबाजुला. ही तर वरवर जाणवणारी टेन्शन्स आहेत. तरूणांच्या बाबतीत सुध्दा तसच काहीसं आहे. न रागवता, जरा विचार करायला हवा या सगळ्याचा. 
या निमित्ताने अजून एक  राग व्यक्त करावासा वाटतो , निराश होणं योग्य नाही. अनेक वेऴा आपल्या मनाविरूध्द घटना घडतात. काही माणसं आपल्याशी अनाकलनीय विचित्र वागतात. अपयश येतं. आजारपण येतं. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. पण पुन्हा एकदा ईश्वरावर श्रध्दा आणि सकारात्मक विचार असतील तर या निराशेतला फोलपणा जाणवतो. कारण सुखाचा काय किंवा दुःखाचा काय कुठलाच काळ रहात नाही. मग काळजी कशाला करायची ? 
मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सगळे जिवलग आहात म्हणून माझा राग व्यक्त केला... नाही तर,  मला  राग येतो ? अजिबात नाही..........

No comments:

Post a Comment