Saturday, 30 August 2014


        जपूया संस्कृती....




माऊली, माऊली, माऊली , माऊली....... प्लीज या हो माऊली. तुम्हाला पण असच वाटतय ना ? अहो गणेशोत्सव सुरू झाल्यापासून मला पण हेच वाटतय. आता तुम्ही म्हणाल, गणेशोत्सव आणि माऊली काय संबंध ? अहो आहे. नीट कान देऊन ऐका म्हणजे कळेल तुम्हाला पण. अर्थात हे ऐकण्यासाठी कान देऊन ऐकायची गरज नाहीये. कानावर आदळणा-या  गोष्टी ऐकण्यासाठी कान देऊन ऐकण्याची काय गरज, नाही
 का ? 
आता तरी कळलं का तुम्हाला मी काय म्हणतीय ते ? नाही....... हं........नाहीतर मला राग येतो.... अरे बापरे , हे काय झालय मला? पण काय करू सारखं जे ऐकायला मिळत तसाच रिअॅक्ट होतो ना माणूस. आता तरी कळलं का तुम्हाला? यस्स... बरोबर ओळखलतं. गणपती बाप्पाला सुध्दा त्रास होत असेल हो या मोठ्या आवाजाचा. गणेशोत्सव असो की कोणताही सण हे लाऊड स्पीकर इतके लाऊड का असतात ? 
चांगल्या गाण्यांची वाटोळी करणारी रिमिक्स गाणी, भसाड्या आवाजातली अर्थहीन गाणी, लांबून तर नुसतच ढाक चीक ढाक चीक इतकच ऐकू येतील अशी गाणी वाजवणं म्हणजे गणेशोत्सव का ? आनंद व्यक्त करण्यासाठी अशा लाऊड गोष्टींचा आधार का घेतोय आपण ?  आपली संस्कृती विकृतीमध्ये बदलण्याआधी आपण जागं होणं गरजेचं आहे. 
मागच्याच्या मागच्या वर्षी आमच्या तळेगावच्या सर्व गणेश मंडळांनी आणि चक्क राजकारण्यांनी सुध्दा डीजेविना गणेशोत्सव पार पाडला. प्रचंड अभिमान आणि आनंद  वाटला आम्हाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.  कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या नावाखाली राजकारणी आणि पर्यायानी पोलिस यंत्रणेनी डीजेला छुपी परवानगी दिली. परिणामी गणशोत्सवाची मिरवणूक चांगलीच गाजली. इतकच कशाला गणेशोत्सवात इतर दिवशीदेखील डीजे ढाकचीकला.....
ध्वनीप्रदूषणावर काम करणा-या अनेक कार्यकर्त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ हे सारेच टाहो .... असंच काहीसं झालं. या डीजेच्या भिंती आपल्या आरोग्याला हानिकारक आहेत हे समजायला हवं. त्या आवाजाच्या नशेत बेधुंद होऊन नाचताना कदाचित काहीही जाणवणार नाही. पण याचे दूरगामी परिणाम होणार हे नक्की. ठराविक डेसिबलच्या आत आवाजाची पातळी ठेवणं हेच हिताचं आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गर्भवती महिला यांच्यासाठी तर हा मोठा आवाज जीवघेणा ठरू शकतो. अहो कशाला, अगदी नॉर्मल माणसाला सुध्दा त्रास होऊ शकतो. जी गोष्ट शास्त्राच्या आधाराने सिध्द झाली आहे. ती आपल्यासारख्या एकविसाव्या शतकातल्या लोकांनी ऐकायलाच हवी. नाही का ? परदेशात विनाकारण गाडीचा हॉर्न वाजवला तरी दंड आहे. मग या अकारण वाजणा-या भोंग्यांना किती दंड पडेल परदेशात ? आपण पाश्चात्यांच अंधानुकरण करतो असं म्हणलं जात. पण नाही, आपण आपल्याला हवं ते करण्यासाठी प्रसंगी असं तर प्रसंगी तसं असं दुटप्पी वागतो. 
सण समारंभ साजरे करताना त्यातून आपल्याबरोबर सगळ्यांना आनंद मिळावा ही आपली संस्कृती आहे. ध्वनीप्रदूषण ही समस्या प्रचंड मोठी आहे. यावर प्रत्येकानी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आपण आपल्या आनंदासाठी स्वतःसकट अनेकांचे जीव धोक्यात घालत नाही आहोत ना ? इतका विचार करू शकलो तरी खूप झालं. 

No comments:

Post a Comment