Sunday, 1 February 2015


अति  सर्वत्र  वर्जयेत्  .......... 



नेटवर सर्च करत असताना चाणक्य नितीचा तिसरा अध्याय वाचण्यात आला. अत्यंत विचारपूर्वक मांडलेल्या एका श्लोकानी मला विचारप्रवृत्त केलं. 
''अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः। अतिदानाद् बलिर्बद्धो ह्यति सर्वत्र वर्जयेत्।।''     
हाच तो श्लोक . कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती संपते. हा एक निष्कर्ष सांगणारा हा श्लोक. जी गोष्ट आजच्या काळातही आपल्याला कळायला हवी. चांगलं असो वा वाईट ते अति झालं की त्रासदायक होतं. 
संदीप खरे आणि डॉ. सलील कुलकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचा प्रयोग आमच्या तळेगावात झाला होता. तेव्हा रंगलेली ही मैफिल थांबुच नये   असं रसिकांना वाटतं होतं. पण त्याच एका पॉईंटवर आता हे समारोपाचं गीत असं डॉ. सलिल म्हणाले. त्यावेळी रसिकांनी त्यांना आग्रह केला की अजून एक तास सुध्दा आम्ही या गाण्यांचा आस्वाद घेण्यासाठी थांबु. तेव्हा त्यांनी दिलेलं  उत्तर फार छान होतं. ही मैफिल संपूच नये असं ज्या क्षणी वाटतं तोच क्षण असतो भैरवी घेण्याचा. 
चांगलं असलं तरी ते मर्यादेतच असलं पाहिजे. नाहीतर रंगाचा बेरंग होतो. कुठे थांबायला हवं हे ज्याला कळलं तो जीवनासकट सगळ्या मैफिली ताज्या, टवटवीत ठेवण्यात यशस्वी होतो. कित्येक वेळा आपल्याला हा अनुभव येतो बघा , कितीही चांगला वक्ता असला, गायक असला तरी, लांबलेला परफॉर्मन्स रसिकांपर्यंत पोहोचत नाही. ''अरे याला आवरा कुणीतरी ''असं मनातल्या मनात म्हणणारे रसिक खोटं हसं घेऊन समोर बसतात. (नाईलाजानी ) उलटपक्षी  एका उंचीवर जाऊन थांबणारा कलावंत  रसिकांच्या काळजात घर करतो.   
माणसाला मिळालेल्या सोयी सुविधांचा अतिवापर होतोय असं निसर्गाच्या लक्षात आलं की तो त्याला पुन्हा त्याच्या मुळ रूपात नेण्याची तयारी करेल यात शंका नाही. (जंगलातले आदिमानव आठवतायत ना ?) आपल्याला मिळालेल्या कोणतीही गोष्ट योग्य पध्दतीनी वापरली तर त्याचे फायदे आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतील. उदाहरण द्यायचं झालं तर वीज, पाणी, पेट्रोल याचं देता येईल. या सगळ्याचा गरजेइतका वापर  केला तरच  त्यापासुन मिळणारा आनंद घेता येईल. विज्ञानानी आपल्याला दिलेल्या  कित्येक गोष्टी वरदानच ठराव्यात हे आपल्याच हातात आहे. मोबाईल, नेट, विकसित तंत्रज्ञान या सगळ्याचा अतिवापर केला तर काय अनर्थ घडू शकतो त्याची चुणूक आपल्याला रोजच्या बातम्यांमधून दिसतीय. मिळालेल्या स्वातंत्र्याचा उचित असा वापर केला तरच हुतात्म्यांच्या, क्रांतिकारकांच्या प्रयत्नांना अर्थ प्राप्त होईल. रूढी-  परंपरांचा अतिरेक झाला तेव्हा बदल झाला. आता स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ देता कामा नये. कारण तो बदल परवडणारा नाही. 
विज्ञानानी दिलेल्या सगळ्याच सुविधांचा योग्य वापर केला तरच त्यापासून मिळणा-या फायद्यांचा आनंद घेता येईल. फेसबुक, व्हॉटस अप, मोबाईल ही संवादाची प्रभावी माध्यमं आहेत यात शंकाच नाही. दूर असणा-या आपल्या माणसांशी निदान आपण कनेक्ट होऊ शकतो.  सगळ जग आपल्या हातात आलय. पण मुठीतलं जग निसटतय का ?   जिथे आपण फेस टू फेस बोलु शकतो, तिथे या सगळ्या अॅप्सची काय गरज    आहे ? कित्येक घरांमध्ये हल्ली घरातल्या घरातसुध्दा मोबोईलचा आधार घेऊन संभाषण केलं जातय.   समोरच्या माणसाच्या चेहे-यावरचे हावभाव समजून घेऊन केलेला संवाद नक्कीच आनंददायी असेल ना ? 
मनातल्या या विचारांना मोकळ केलं  एका कवितेनी....... आमच्या बॅचमेटसचा एक ग्रुप केलाय व्हॉटस अॅप वर त्यामध्ये  एक कविता शेअर केली होती माझ्या मैत्रिणीनी.....                                             

स्वावलंबन, स्वतंत्र वृत्ती सगळच थोड्या अंतरावरती
कधीतरी आईच्या कुशीतही येऊद्या
मुळांना थोडीतरी माती राहुद्या ... प्लीज..... मुळांना थोडीतरी माती राहुद्या




2 comments:

  1. Surekh lekh .... ani antarmukh karayala lavnara shevat .......... mastch

    ReplyDelete
  2. Abhinandan .. Bhairavi kadhi suru karaychi hyach bhan changl sambhl jatay ... Keep it up !

    ReplyDelete