कल्पनेचा कुंचला......
पाहिले न मी तुला , तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले...... पाहिले न मी तुला......
वा वा वा.......काही काही गाणी ना अगदी वेड लावतात बघा.... ही अशी गाणी कितीही वेळा ऐकली तरी पोट भरत नाही. गाण्याची सुरावट जितकी लक्षात रहाते ना, तितकेच गाण्याचे शब्द सुध्दा.... एकमेकांना न पहाता मन गुंतवण्याची कल्पना.... किती छान. कारण समोर असताना जीव गुंतला तर नवल नाही. पण कधीही एकमेकांना न पहाता जीव गुंतणं हे काही वेगळच नाही का? अर्थात कल्पनेच्या जगात काहीही अशक्य नाही.
पण कल्पना ही भावना विचारात घेऊनही, वास्तवात जगता येईल का ? तुम्ही म्हणाल , कुछ तो गडबड है.... पण नाही हो. असं होऊ शकत. म्हणजे वास्तवातही कल्पनेच्या जगात रमता येतं आणि आपल्याजवळ अमुक एक गोष्ट नाही या गोष्टीपासून मिळणारं दुःख कमी करता येतं.
म्हणजे बघा, देवाला आपण कधी पाहिलय का ? पण आपण तो असल्याचा आनंद घेतोच ना ? नेवैद्य दाखवून विठ्ठलाला घास भरवणारे नामदेव विरळाच. पण आपणसुध्दा देवाला नेवैद्य दाखवून , हा प्रसाद देवाचा आहे असं मानून समाधान मिळवतोच ना. आनंदमयी अशा भगवंताचं सान्निध्य नामानी मिळवतोच ना.
न अनुभवलेला स्पर्श, वस्तू, व्यक्ति, सुगंध, रंग याची अनुभूती घेता येते. कित्येक वेळा आपल्या मनात चालू असलेल्या गाण्याचे सूरसुध्दा ऐकू येतात. कल्पनेनी जगाची सफर करून येतो आपण. अंध व्यक्ति आपल्या मनाच्या डोळ्यांनीच कल्पना करून अनुभूतीचा आनंद मिळवतात. त्यामुळे अनुभूतीचा आनंद मिळवण्यासाठी ती वस्तू पहायलाच हवी असं नाही. समोर असताना त्याचा आनंद घेता येईल यात काही शंकाच नाही. किंवा हा आनंद नक्कीच जास्त प्रमाणात असेल. पण कल्पना करूनही याचा आनंद घेता येतो.
भाषा विषयांच्या पेपरमध्येसुध्दा कल्पनारम्य निबंधाचा एक विषय हमखास असतोच. कारण क्रिएटिव्हीटीचा उगम कल्पनेत होतो. एखाद्या कलाकृतीची, व्यवसायाची, यशाचं शिखर गाठण्याची कल्पनाच केली नाही तर तिथपर्यंतचा प्रवास कसा निश्चित करता येईल ? कल्पनेत स्वप्न बघून, वास्तवात प्रयत्नांची जोड दिली तर .. अशक्य अशी गोष्टच नाही. सगळ्या महान लोकांनी कल्पना, स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी जीवापाड मेहनत केली म्हणूनच या कल्पना साकार होऊ शकल्या. पण कल्पनाच केली नसती तर.....
आपण कित्येक वेळा म्हणतो बघा.... कल्पना करायला काय हरकत आहे ? हो नक्कीच काहीच हरकत नाही. कल्पनेच्या जगात रमायलाही काही हरकत नाही. सगळ्या कवींनी, गीतकारांनी आपल्या कल्पनेतल्या जगातूनच आपल्याला उत्तमोत्तम काव्य दिली आहेत. जरी तू.. कळले तरी ना कळणारे....दिसले तरी ना दिसणारे.. विरणारे मृगजळ एक क्षणात....... या काव्यात मृगजळ असले, कल्पना असली तरी तो जीवापाड प्रेम करतोच ना.... विरहाचा सल कमी करण्यासाठी ही कल्पना किती छान आहे .... जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना , तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! ….. भगवंत आणि आपलं नातं सांगणारी ही कल्पना किती छान आहे ... काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल . ससुल्याला शाळेत , सिनेमात , सर्कशीत नेण्याची ही कल्पना म्हणजे.... कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा ! किती छान रमतो आपण कल्पनेच्या या जगात...
मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तू साठी जगतो . वस्तू ही सत्य नसल्यानी तिचं स्वरूप अशाश्वतच असतं अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंदही अशाश्वत.... खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून तिच्या पलिकडे आहे. वास्तवातलं जग आणखी सुंदर बनवण्यासाठी.... चला तर चितारूया एक चित्र कल्पनेच्या कुंचल्यानी....
swapnaatlya kalyaano umaloo nakaat kenva ...
ReplyDeleteGodi apoornatechi laavel ved jeevaa ...
You are true ... especially when we imagine God is there, trust in Him, pray.
Nice article ..... Imagination reduces factual distance !!!
Thanks Sachin.....
DeleteVinaya. ...it's really wonderful thought .hats of to your thinking and creations
ReplyDelete