स्वप्नातल्या कळ्यांनो....
संवेदना, भावना, जाणीवा , रुसवा, वाट बघणं याची अनुभूती प्रेमात पडल्याशिवाय येत नाही. अजून एक गोष्ट अशी आहे ज्याचा अनुभव प्रेमात पडल्यावर जास्त रोमांचकारी वाटतो, ते म्हणजे स्वप्न. माणसाच्या मनाला समजून घ्यायचं असेल ना तर त्याला कोणती स्वप्न पडतात हे बघायला हवं. ज्या गोष्टी आपण प्रत्यक्षात करू शकत नाही त्याचा अनुभव स्वप्नात घेता येतो. ज्या भावनांची तृप्तता जागृतावस्थेत होऊ शकत नाही , त्याची पूर्तता स्वप्नाच्या दुनियेत होते. आपल्याला आवडणारी व्यक्ति प्रत्यक्षात भेटणं जेव्हा शक्य नसतं तेव्हा तीच व्यक्ति स्वप्नात येते. चेतन मनातली इच्छा अचेतन मनाकडे पाठवली जाते. मग तीच इच्छा अचेतन मनाकडून स्वप्नांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
ही स्वप्नं इतकी खरी वाटतात की सत्य काय आणि स्वप्न काय याचं भान उरत नाही. स्वप्नात दिसणारा तो किंवा ती खरच समोर आहे की काय असं वाटायला लागतं. ''मनी वसे ते स्वप्नी दिसे '' असं म्हणतात. आपल्या मनात असणा-या व्यक्तिचं स्वप्न कधी संपूच नये असं वाटत. स्वप्नात उमटलेल्या खुणा प्रत्यक्षातही कोणाला कळतील की काय या कल्पनेनी गडबडायला होतं, लाजायला होतं. जागं आल्यावरही ही धुंदी ओसरत नाही. हे स्वप्नच आहे हे समजूनही मनं त्यातच रमून जात.
we are what and where we are because we have first dreamed it. आपली आत्ताची परिस्थिती म्हणजे पूर्वी कधीतरी पाहिलेलं स्वप्न असू शकते. म्हणून स्वप्न मोठी बघावीत. वास्तवाची जाणीव बुध्दि करून देत असते , पण आपलं मन मात्र देहभान हरपून स्वप्नांच्या दुनियेत भरा-या घेत असतं.
स्वप्नं म्हणजे नेमक काय ? मानसशास्त्राचा अभ्यास करणा-यांच्या मते, झोपेमध्ये मिळणा-या चेतनावस्थेच्या अनुभवांना स्वप्न म्हणता येईल. मृगजळ जसं आभास निर्माण करतं तस स्वप्नही आपल्याला आभासात सत्य मानायला भाग पाडत. स्वप्न पडणा-या माणसाला प्रॅक्टिकल जगातली माणस वेड्यात काढतात. ''तुला बरी स्वप्न पडतात, आम्हाला नाही पडत'' असं म्हणून हिणवतात. मनात चाललेल्या गोष्टी नकळतपणे अंतर्मनात उमटतात. या भावना सत्यात उतरव्यात यासाठी धडपड सुरू असते. मनात उठणा-या या भावना प्रत्यक्षात होणं शक्य नसेल तर ती पूर्तता स्वप्नात केली जाते.
स्वप्न आणि सत्याचं भांडण झालं तर कोण जिंकेल? भविष्य घडवण्यात यापैकी कोणाचा वाटा सर्वाधिक आहे ? एकाच वेळी आभाळाला हात टेकतील आणि तरीही आपण जमिनीवर राहू असं शक्य आहे का ? कारण स्वप्नात पाय जमिनीवर नसतात आणि सत्यात हात आभाळाला टेकत नाहीत. म्हणूनच आपल्या आयुष्यात स्वप्न आणि सत्य या दोघांनाही समान महत्त्व आहे. माणसाला पडणारी स्वप्नं हा एक व्यर्थ मानसिक अनुभव आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. कारण स्वप्नात येऊन त्यानी किंवा तिनी केलेला गोड छळ किती हवाहवासा वाटतो . नाही का ? काय ? विश्वास नाही बसत? चला तर झोपा आणि स्वप्न बघा....
No comments:
Post a Comment