प्रेम केले प्रेम....
व्हॅलेंटाईन डे अगदी उद्यावर आलाय. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नाही हे खरच. पण कोणत्याही गोष्टीला काहीतरी निमित्त लागतच. त्या दृष्टिकोनातून विचार केला तर काय हरकत आहे , प्रेम व्यक्त करायला.
प्रेम या भावनेचा विचार करतानाअजून एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करायला हवा. ते म्हणजे नात्याचं लेबल. ते लेबल नाही तर प्रेम पण नाही असं काही आहे का ? आणि असलं तर ते कसं शक्य आहे ? प्लॅटोनिक लव्ह या संकल्पनेचा विचार केला तर दोन शरीरं आणि एक मन हे शब्द जिवंत होतात. अशा वेळी अपेक्षेला काही महत्त्वच उरत नाही. ग्रीक तत्ववेत्ता अॅरिस्टॉटल म्हणतो, प्रेम म्हणजे दोन शरीरात वास करणारा एक आत्मा. किती सुंदर कल्पना. प्रेम हे अंतरिक, मानसिक असतं. घोटून गुळगुळीत झाल्यामुळे प्लॅटोनिक लव्ह या शब्दाचा वापर तितक्या गांभीर्यानी केला जात नाही. एक मन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या मनात काही आलं ते तिला उमजलं आणि तिच्या मनात काही आलं तर ते त्याला समजलं हे होण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते. म्हणजे एकमेकांवर जिवापाड प्रेम असाव लागत. ''शब्देविण संवादू'' ही कल्पना शारीर सौंदर्यात रमणा-यांना अतर्क्यच वाटते. एकमेकांचं मन जाणण महत्त्वाचं. एकदा असं नात निर्माण झालं की मग त्याच्यासारखा आनंद नाही, समाधान नाही. पण असं नातं निर्माण करणं खुप कठीण आहे.
कोणत्याही नात्याला लेबल किंवा नाव लावलं की मग येतात अपेक्षा, मालकी हक्क. प्रेमाचं सहज सुंदर नात निर्माण करण्यासाठी या नावांच्या, लेबलांच्या पलिकडे जाऊन विचार करता येईल का? कारण अपेक्षा हे दुःखाचे कारण. अपेक्षा ठेवूच नयेत हे शक्यच नाही. पण अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर येणारा कडवटपणा टाळता येतो का ? जर आपण मनापासून प्रेम करत असू तर तो कडवटपणा टाळता येईलच. नक्की. पण काही वेळा या अपेक्षांच्या अतिरेकामुळे एकतर्फी प्रेमातून घडणारे भयंकर प्रकार घडतात. मला एक प्रश्न कायम सतावतो. आपण ज्या व्यक्तिवर प्रचंड प्रेम करतो त्याला इजा पोहोचवण्याचा, दुखावण्याचा विचार कसा येत असेल मनात ? उलटपक्षी त्याच्या किंवा तिच्या सुखातच माझं सुख आहे असा विचार रूजायला हवा. कारण या एका गोष्टीवर प्रत्येकानी विश्वास ठेवायला हवा, जे आपलं असत ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे आपलं नसत ते कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला मिळत नाही. खरं सुख मिळवण्यात आहे असं म्हणलं तर ते अलगद, हळुवार असलं पाहिजे. नाही तर सुख मिळूनही ते न मिळाल्यासारखच आहे. म्हणून प्रेम तुटून करावं, पण ज्याच्यावर आहे, त्याला किंवा तिला न तुटू देता....
No comments:
Post a Comment