Friday, 30 May 2014


झोपेची महती.....
खूप दिवसात काही भावलचं नाही मनाला. त्यामुळे मनीमानसी काही आलच नाही. पण आज अचानक एक मस्त कल्पना डोक्यात आली. खरं सांगा बर माणसं सगळ्यात जास्त निरागस कधी दिसतात ? लहानपणी..... नाही.... अगदी मोठेपणीसुध्दा माणसं निरागस दिसतात. पण फक्त झोपेत. विश्वास नाही बसत ? पण ही गोष्ट खरी आहे. झोप ही आपल्यासाठी संजीवनी आहे. अन्न , व्सत्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. पण खरच नीट विचार केला तर झोप ही गरज सुध्दा तितकीच महत्त्वाची आहे. झोप नसेल तर काय होईल किंवा एखाद्या रात्री झोप आलीच नाही तर... निद्रानाशाचा त्रास असणा-यांनाच झोपेचं महत्त्व समजू शकेल. म्हणून हे निद्रा आख्यान.....
झोपेची महती काय वर्णावी ?  एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल (पण एक वेळच हं...) पण झेप हवीच. झोपेचा काळ तेवढा असा असतो की आपण सगळे मुखवटे काढून, मनातले वाईट विचार टाकून, निरागस होऊन निद्रादेवीच्या कुशीत शिरतो.
प्रत्येक ऋतुतल्या झोपेला एक वेगळं महत्त्व आहे. दुपारची डुलकी असो अगर रात्रीजी निवांत झोप. झोपावं ते थंडीच्या दिवसात, असं आपल म्हणायचं. ज्याला झोप येते त्याला थंडी काय अगर रखरखीत उन्हाळा काय, सगळ सारखच. बाहेर छान कडाक्याची थंडी पडली आहे, घरात मस्त शेकोटी पेटवलेली आहे, झोपताना गरम चहा असेल मस्तपैकी आलं घातलेला तर वा वा.... कोण म्हणतं चहानी झोप उडते.. झोप येते ती उडण्यासाठी नाहीच मुळी.
पावसाळ्यातली झोप म्हणजे तर खूपच छान. बाहेर छान पाऊस पडतोय, वातावरण अगदी ढगाळ झालय. दुपार असली तर बहारच आणि रात्र असली तर खूपच छान. पट्टीच्या झोपणा-याला काय हो ? दुपार काय आणि रात्र काय सगळ सारखच. सोनेवालो को सोने का बहाना चाहिये असं म्हणलं तर अनुभवसिध्द म्हण तयार केल्याचा किताब मिळेल.
उन्हाळ्यात बाहेर कितीही गरम होत असलं तरी पंख्याखाली मस्त झोप लागते. एकदा झोप लागली की आजुबाजुला काय चाललय याचं भान कुठे असतं. माझं मत विचाराल तर झोप हे वरदान आहे. कोणत्याही परिस्थितीत, कुठेही ज्याला पटकन झोप लागते तो सुखी माणूस. झोपेला घटकेचं मरणदेखील म्हणलं आहे. झोपेनंतर प्रत्येक सकाळी आपला पुनर्जन्म होतो. आदल्या दिवशीची टेन्शन्स, रुसवे- फुगवे याची तीव्रता कमी होते. निरोगी आयुष्यासाठी झोप आवश्यक आहे. मन शांत आणि शुध्द असेल तर निद्रानाशाचा त्रास होणारच नाही.
अजूनही पटन नाहीये.... तुम्ही म्हणाल झोपेचा काय एवढा विचार करायचा? बरोबर आहे. झोपेचा विचार करायचाच नसतो. मस्तपैकी झोपायचं असतं. का? तर... दुस-या दिवशीच्या आनंददायी गोष्टी ख-या अर्थाने जगण्यासाठी.

Monday, 26 May 2014

सांगा ना कसं जगायचं ?

माणसाला आपल्याला हवं तसं जगता येत का? माझं उत्तर नाही आहे. अगदी साधी गोष्ट असली तरी आपण फार मन मारून जगतो असं वाटतं मला. असं म्हणतात की अगदी लहान मुलासारख रहावं.... निरागस. पण जगाचे हे नियम आपल्याला हवं तसं वागू देत नाहीत. त्यातही काही मनमौजी असे असतात जे स्वतःला हवं तसं वागतात. पण असे लोक हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असतात.
साधारण मध्यम वर्गातले (परिस्थितीनी नाही बरं का..) लोक हवं तसं म्हणजे काय वागणार हो.... रस्त्यावर कुल्फी किंवा गोळा खावासा वाटला तर खाणं. आणि मुख्य म्हणजे ती कुल्फी तोंडाला बरबटली तरी त्याची लाज न बाळगणं. असं झाल तर ....पण  समाजातले सो कॉल्ड मॅनर्स तसं वागू देत नाहीत. हे काय साधं एवढ कळत नाही
का ? असं खाऊ नये हे कळत नाही या माणसाला. असं प्रत्यक्षपणे न म्हणता बरच काही सांगणा-या नजरा आपल्याला सगळ सांगून जातात.
हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर खुर्चीत पाय सोडून बसणं हा मॅनर्सचा भाग आहे. पण आपल्याला वाटलं मस्त मांडी घालून बसावं तर ते तितक्या सहजपणे आपण करू शकत नाही. काटा चमच्यानी पदार्थ खाणं ही तर मॅनर्सच्या नावाखाली मिळालेली मोठी शिक्षा आहे. ती सगळी कसरत करताना त्या पदार्थाचा आनंद घेणं तसच राहून जातं.
हातगाडीवर पाणी पुरी खाताना ब-याच वेळा ती अंगावर सांडते, तोडातून खाली पडते, तेव्हा उगाचच किती अपराध्यासारखं वाटतं. खर तर इतकं काही वाटण्याची गरज नाही. पण आपला हा बावळटपणा कोणी पाहिला तर नसेल या कल्पनेनी आपली उगाचच धांदल उडते.
रस्त्यावरून जाताना एखादं मस्त गाण गुणगुणावसं वाटलं तरी आपण ते मनातल्या मनात म्हणतो. आपल्या मनासारखे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य सुध्दा नसतं कित्येक वेळा. साधारणपणे अगदी विचित्र काहीतरी कपडे घालणं आपल्याला सुध्दा मान्य नसतच. पण तरीही असं नको, तसं नको असं आपल्याच जवळची लोकं आपल्याला सांगतात. आणि गंमत म्हणजे लोक काय काहीही केलं तरी नावच ठेवतात. असं म्हणणारी आपल्या जवळची माणसं ठराविक वेळेला मात्र लोकांचा फार विचार करतात.
आपल्याला ब-याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. असं का? असं  ब-याच  वेळा म्हणूनही ते तसं का ? हे मात्र कळत नाही. आपल्या एखाद्या यशाचं कौतुक आपल्याच माणसांना नसेल तर खुप वाईट वाटतं. पण वेदनेतूनच निर्मिती होते. अडथळे जितके जास्त तितकी जिंकण्याची, जगण्याची मजा जास्त. सगळ सरळ आणि सोप्प असेल तर मग आयुष्य बेचव होईल. खुपदा या अडथळ्यांनी थकायला होतं. असं वाटतं का करतोय आपण हे सगळ? कोणासाठी ? पण आधी म्हणलं तसं कित्येक प्रश्नांची उत्तरं नसतात आपल्याकडे. माझा तर जगण्याचा फंडा आहे, ''नेहमी आनंदी रहा.'' आपली निम्मी संकट या फंड्यामुळे दूर होतात. कोणालाही त्रास न देता आपल्याला हवं तसं जगायची इच्छा असेल तर सगळ्यांनीच एकमेकांना मदत केली पाहिजे. आपल्या जवळच्या माणसाच्या आनंदात सहभागी होणं हे जास्त महत्त्वाचं , नाही का?
त्यामुळे  सांगा ना कसं जगायचं ? याचं उत्तर, कितीही अडचणी आल्या तरी कण्हत, कुढत न जगता आनंदानी जगणं (आपल्याला हवं तसं मोकळं....)

Saturday, 24 May 2014


माझं आणि फक्त माझं.....

माणूस स्वतःच्या अशा अनेक गोष्टींबाबत खूप पझेसिव्ह असतो नाही? माझं आणि फक्त माझं.....असं बरच असतं आपल्या आयुष्यात. ते किती खर असतं हा चर्चेचा मुद्दा आहे. हे सगळ माझं जे आहे ते इथे सोडून वर जाव लागणार आहे असं कितीही म्हणलं तरी माझं माझं संपत नाही . त्यात आम्ही बायका जरा जास्तच पझेसिव्ह असतो.
माझं पोलपाट लाटण असल्याशिवाय माझ्या पोळ्या चांगल्या होत नाहीत. मला बाई माझच पांघरूण लागत नाहीतर मला झोप येत नाही. माझी खुर्ची ऑफिसमध्ये माझ्या जागेवर नसेल  तर मला काम सुचत नाही. माझी कपडे वाळत घालायची काठी मला लागतेच बाई. हे काय, आज नेहमीचा झारा दिसत नाहीये भांड्यात आता तळण कसं तळणार ? माझं हे पेन मी किती वर्ष वापरतोय मला तेच लागत लिहायला. माझं टेबल नसेल तर सुचत नाही अभ्यास. पाठांतर करण्यासाठी मला हीच जागा लागते. माझं घर,   माझं ताट, माझी उशी, माझी क्लिप, ............
बापरे...... किती मोठी आहे ही लिस्ट. वस्तूंच्या आणि जागांच्या बाबतीत आपण इतके पझेसिव्ह असतो मग माणसांच्या बाबतीत तर कहरच करू. नाही का ? मला आठवतय शाळेत असताना माझी एक खुप जिवलग मैत्रिण होती , अजूनही आहे. मी सोडून कोणाशीही जास्त बोललेलं मला आवडायचं नाही. कॉलेजच्या निमित्तानी ती पुण्याला रहायला गेली. तेव्हा मला त्यातून सावरायला खूप दिवस लागले. आपण ज्याच्यावर जिवापाड प्रेम करतो त्यानी  दुस-या कोणाबद्दल बोललेलं आवडत नाही. शेअरिंग भलत्या बाबतीत नाही हा...
अजून एक मी नोटिस केलेली गोष्ट. आपण कोणत्या ट्रीपला वगैरे गेलो ना. तर तिथे प्रत्येक जण आपण पहिल्यांदा ज्या जागेवर बसलो आहोत तिथेच बसतो. अगदी कितीही वेळा उतरलो , चढलो तरी.  तिथे सुध्दा माझी जागा.
सकाळी फिरायला जाणा-या ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे, संध्याकाऴी टाईम पास करणा-या तरूणांचे कट्टे ठरलेले असतात. शाळेत डबे खाण्याच्या जागा ठरलेल्या असतात. ट्रेनमध्ये रोज अप डाऊन करणारे सुध्दा त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये माझं - तुझं करतात. आपल्या ठरलेल्या जागांवर कोणाला बसू देत नाहीत.
जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय.... हे जीवनाचं कटू सत्य असलं तरी माणूस म्हणून असणारी ही भावना कमी होत नाही. म्हणूनच सांगते माझ्या मित्र मैत्रिणींनो माझा ब्लॉग वाचून मला प्रतिक्रिया द्या......

Friday, 23 May 2014

भावना........

माणसाच्या मनात वेगवेगळ्या भावनांची मस्त गर्दी असते. प्रेम, दया, करूणा, द्वेष, मत्सर, राग,  हेवा या सगळ्या भावना आपण माणूस असल्याची जाणीव करून देतात. याशिवाय असलेला माणूस असेल याची कल्पनादेखील करता येत नाही. अगदी ऋषी मुनी, राजे रजवाडे, देवादिकांनादेखील यामधून सुटका नाही. तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना कुठली सुटका हो ?
प्रेमाबद्दल बोलण्यासारखं माझ्याकडे खुप आहे. पण आत्ता नको. पुन्हा कधीतरी. आज मला ना कोणाचातरी हेवा वाटला. मग म्हणलं, याबद्दलच बोलूया तुमच्याशी. तुम्ही म्हणाल, का वाटला हेवा? आज मला माझ्या एका मित्राचा हेवा वाटला. अतिशय निर्मळ आणि निरपेक्ष मनाचा आहे तो. ''कुल'' का काय म्हणतात ना तसा. कोणी कितीही चिडलं तरी अगदी शांतपणे वागणारा. मग तुम्ही विचाराल , तुला हेवा का वाटला ? त्याच्या स्वभावाचा हेवा वाटला. मी का नाही अशी शांतपणे वागू शकत असं वाटलं. 'उत्कटता' हा गुण चांगला पण संयम पण हवाच ना. तोच गुण कमी आहे असं वाटलं. आज एका विषयावरून खुप भांडण झालं त्याच्याशी. पण तो शांतपणे विचार करत होता. मी मात्र उगाच आदळआपट केली मनातल्या मनात. खूप हेवा वाटला मला त्याचा.
हे विचार चालू असतानाच एक गोंडस बाळ त्याच्या आईच्या कडेवर दिसलं. मग 'हेवा ' या भावनेनी आणखीनच जोर धरला. उगाच मोठे झालो. काय साल्या या जबाबदा-या? डोक्याला ताप आहे नुसता. या अशा भावना दाटून आल्या. ते बाळ आईच्या खांद्यावर विश्वासानी पहूडलं होतं. त्याला खात्री होती आपली आई आपल्या जवळ कायम असेल. आपण मोठे झालो की अशी खात्री आपल्या जवळच्या माणसांबद्दल आपल्याला का वाटत नाही ? या विचारानी हेवा जास्तच वाढला.
माझा मुलगा आजीला म्हणत होता, ''आजी मला तुझा हेवा वाटतो गं. तुझी मज्जा आहे. शाळा नाही अभ्यास नाही. नुसत घरात बसायचं आणि टी. व्ही. बघायचा, हवं तिथे जायचं. मज्जा आहे बाबा तुझी....'' बापरे, बघा माणसाला कशाचाही हेवा वाटतो. आपल्याजवळ असणा-या गोष्टींपेक्षा दुस-याकडे असणा-या गोष्टी जास्त चांगल्या असतात. देवानी मलाच का हे दुःख दिलं ? इतकं चांगल वागूनही आपण असे कमनशीबी का ? हा तर जवळपास सगळ्यांना पडणारा प्रश्न. शाऴेत काठावर पास होणारी मुलगी बॅंकेत नोकरीला लागते आणि चांगले मार्क पडूनही आम्ही आपले आहे तिथेच. माणसाचं हवेपण, हाव संपत नाही. त्यामुळे हेवा पण संपत नाही. पण असुदे. आम्हाला वाटतो हेवा...आणि तुम्हाला?

Thursday, 22 May 2014

प्रेरणा ...........

आपल्या आयुष्यात आपल्याला कितीतरी माणसं भेटतात. काही पटकन आपले होऊन जातात. काहींना आपण ओळखू शकत नाही. काहींना ओळखूनही ते अनोळखी रहातात. हे सगऴं असं का याला काही उत्तर नाही. टेलिपथी ज्यांच्याशी जुळते त्यांच्याशी सूर जुळतात. काही लोकांशी मात्र  प्रयत्न करूनही सूर नाही जुळत.
आपण नेहमी सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबद्दल बोलतो . काहींना भेटल्यावर खूप मस्त वाटतं तर काहींना भेटल्यावर वैतागल्यासारखं होतं. काही खूप प्रेरक असतात तर काही 'कुरकुरे'.
माझ्या बाबतीत एकाच अभिव्यक्तिबाबत अशा दोन टोकाच्या व्यक्ति भेटल्या. एकानी मी एकही शब्द नीट लिहू शकत नाही असा शेरा मारला. तर एकानी ब्लॉग लिहिण्याची प्रेरणा दिली. पहिल्या व्यक्तिचा अनुभव विदारक होता. मी गेली काही वर्षे पत्रकारिता करतीय. अगदी परिपूर्ण नाहीये मलाही माहितीय. पण त्यांनी.... मी माझी विदवत्ता पाजळण्यासाठी लिहिते, मी वाचकांचा विचार करत नाही, माझा अभ्यासच नाहीये असं काहीसं बोलून माझा लिखाणाचा आत्मविश्वास जवळपास संपवला होता. कौतुक करावं असं प्रत्येकाला वाटतं कारण माणूस हा स्तुतीप्रिय असतो. कौतुक आवडत नाही असा माणूस मी तरी पाहिला नाही. कौतुक केल्यानी उत्साह वाढतो. कामासाठी प्रेरणा मिळते. अगदी काहीही लिहू न शकणा-या माझ्यासारखी माणसंसुध्दा लिहू लागतात. पण नकारात्मक प्रतिसादामुळे  एक चूक झाली की दुसरी चूक करतोय की काय अशी भावना मनात घर करून बसली.
यापुढे मी लिहू शकणार नाही असं वाटत असतानाच याच क्षेत्रातल्या एका अनुभवी व्यक्तिने  फेसबुकवरच्या माझ्या एका कॉमेंटवर मस्त प्रतिक्रिया दिली. ओळख वाढली आणि चक्क मी बरं लिहू शकेन असं वाटायला लागलं. आपलं आयुष्य कोणा एकाच व्यक्तिवर अवलंबून ठेवायचं नसतं हे या एंजलनी सांगितलं. 'क्विन' हा सिनेमा बघायला सांगितला. तो सिनेमा बघून खुप मोकळ वाटलं. वेगळा दृष्टिकोन मिळाला. आपल्यामध्ये असणा-या सृजनशीलतेला मोकळी वाट करून देणं अशक्य नाही असा विश्वास वाटला. मुख्य म्हणजे मोकळेपणा जो मला नेहमीच आवडतो तो गवसला. यापूर्वीअशाच एका व्यक्तिने मला जगायचं कसं हे शिकवलं . अगदी वाईट परिस्थिती असली तरी आयुष्य आनंदानी कसं जगाव हे सांगितलं. 'नेहमी आनंदी रहा' हे माझं नाही तर त्या व्यक्तिचं तत्वज्ञान आहे. आता पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टी देणारी व्यक्ति भेटली आणि वेगळ्या लिखाणाला वेग आला.
या सगळ्यांच माझ्यावर ऋण आहे. अगदी छापील वाक्य आहे , पण त्यांच्या ऋणात रहाणं मला आवडेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अशी अनेक माणसं भेटतात, यापुढेही भेटतील. पण या सगळ्याचा आनंद घेऊन आयुष्याची वाट चोखाळायला शिकवणा-या सगळ्यांसाठी मनापासून सलाम...... 

Tuesday, 13 May 2014



व्याख्यानमाला काळाची गरज

इंटरनेटच्या माध्यमातून जग लहान बनत आहे. मात्र दुसरीकडे माणसे समुदायातही एकेकटी होताहेत. अशा गोंधळलेल्या परिस्थितीत एकूण समाजालाच सुसंवादाची निकड आहे, असे वाटते. पूर्वी हेच  काम विविध व्याख्यानमालांनी केले. मात्र आता व्याख्यानमालांना साहित्यप्रेमी रसिकांचा प्रतिसाद कमी झाल्याचे दिसून येते. या सगळ्याची काय कारणे आहेत तसेच व्याख्यानमालेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन का बदलला आहे ?  याविषयी विचार मांडणारा लेख

महाराष्ट्रात एकोणिसावे शतक हे 'प्रबोधनाचे शतक' म्हणून ओळखले जाते. हा कालखंड सर्वार्थाने प्रबोधनाचा, नवे ज्ञान-नवे विज्ञान यांच्या परिचयाचा आणि भारतीय व पाश्चात्त्य विचारसरणींच्या विश्लेषणाचा होता. नवे ज्ञान जुन्या ज्ञानाला मागे सारते आणि प्रश्न विचारते. आधुनिक ज्ञान आणि विद्या आत्मसात केलेली पिढी जुन्या पिढ्यांसमोर काही प्रश्न उभे करते; तर्कसंगत उत्तरे मागते. बदलण्याच्या अवस्थेत असणारा समाज नेहमीच संभ्रमावस्थेत असतो. या संभ्रमातून समाजाला बाहेर काढण्यासाठी, व्यापक लोकशिक्षण साधण्यासाठी, तसेच लोकसंवाद साधण्यासाठी 'व्याख्यानमाला' हे एक सशक्त माध्यम निर्माण झाले. वक्ता आणि श्रोता यांच्यामध्ये संवाद घडवणे, वस्तुनिष्ठ ज्ञान देणे, वर्तमान व भविष्यकाळाचे विश्लेषण करणे, घडणा-या बदलांवर भाष्य करणे आणि सामूहिक आत्मपरीक्षणातून माणसाच्या विचारांना प्रेरित करणे हेच खरे व्याख्यानमालांचे कार्य म्हणता येईल.
इंटरनेटच्या आजच्या युगात आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात संवाद संपत चालला आहे. एका क्लिकवर जर सगळी माहिती मिळते तर घराबाहेर पडून व्याख्यान ऐकण्यासाठी कोण येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आज खुल्या संवादाची, लोकसंवादाची गरज अधिक आहे. कारण माणसामाणसातले संवाद कमी होत चालले आहेत. येणारे मानसिक ताणतणाव हेदेखील त्यामागचे एक प्रमुख कारण आहे. म्हणून कोणत्याही वयातल्या माणसाने दुस-याचे ऐकण्याला महत्त्व दिले पाहिजे. व्याख्यानमालांच्या मदतीने हा सामुदायिक सुसंवाद वाढायला मदत होईल.  एखाद्या महान व्यक्तिच्या स्मरणाच्या निमित्ताने अनेक व्याख्यानमाला अस्तित्वात आल्याचेही दिसून येते.
आजमितीला महाराष्ट्रात किमान दोनशे व्याख्यानमाला अस्तित्वात आहेत. पुण्यापासून प्रेरणा घेऊन 'मराठी संस्कृती, भाषा व जीवन' यांविषयी आपुलकी  असणा-या महाराष्ट्रातील सर्व मोठी शहरे आणि गावे यांमधून अनेकविध संस्थांनी आपापल्या व्याख्यानमाला रुजवल्या आणि दृढ केल्या आहेत. मावळ तालुक्यात तीन  ते चार ठिकाणी व्याख्यानमाला चालू आहेत. तळेगाव दाभाडे येथे श्री गणेश मोफत वाचनालयाच्या वतीने ''अॅड. दादासाहेब तथा पु. वा. परांजपे व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. लोणावळा येथे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. तसेच वडगाव येथे सरस्वती व्याख्यानमाला व महादजी शिंदे स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाते.
लोणावळा येथे गेली तेरा वर्षे वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. या व्याख्यानमालेचे जनक प्रकाश मोहाडीकर होते. याविषयी व्याख्यानमालेचे संस्थापक सदस्य डॉ. कमलाकांत देसाई म्हणाले, ''लोकशिक्षण व राष्ट्रउभारणीसाठी व्याख्यानमाला सुरू करण्यात आल्या. पूर्वीच्या काळी व्याख्याते समाजसुधारणेसाठी व्याख्याने देत असत. आत्ताचा काळ बदलला आहे. त्यामुळे आत्ताचे व्याख्याते ज्ञानी नाहीत असे नाही. मात्र काही वेळा विस्तृत वाचनाचा अभाव त्यांच्या बोलण्यात जाणवतो. त्यामुळे चांगले व्याख्याते शोधणे हे एक आव्हान झाले आहे. तसेच आर्थिक गणितदेखील महत्त्वाचे आहे. आमची व्याख्यानमाला आठ दिवस चालते. तिकीटविक्रीमधून आर्थिक बाजू सांभाळली जाते. व्याख्यानमालेला ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती असते. त्या मानानी तरूणांची उपस्थिती कमी असते. लहान मुलांकरीता व्याख्यानमाला सुरू केल्यास त्यांना लहानपणापासून ऐकण्याची सवय लागेल. घरी बसून मनोरंजन होत असेल तर बाहेर व्याख्यानमालांसाठी बाहेर कोण पडणार? यामध्ये आई वडीलदेखील प्रबोनधनासाठी कमी पडतात असे मला वाटते ''
वडगाव येथील महादजी शिंदे स्मृती व्याख्यानमालेचे संस्थापक अॅड. रविंद्र यादव  म्हणाले, ''14 जानेवारीला महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर शेवटचा विजय मिळवला. त्यामुळे या विजयाची स्मृती म्हणून ही तीन दिवसीय व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. मुख्यत्वे इतिहास या विषयावर व्याख्याने आयोजित केली जातात. तसेच सामाजिक विषयांवरदेखील व्याख्यानांचे आयोजन केले जाते. मात्र लोकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. एखादी क्रिकेटची मॅच असेल तर कितीही मोठा व्याख्याता बोलवला तरी लोक येत नाहीत. टी.व्ही. पुढे लोकांना काहीही अवांतर ऐकण्याची इच्छा राहीलेली नाही. तसेच व्याख्यानमालांना प्रायोजकदेखील मिळत नाहीत. त्यामुळे बजेट हा मोठा प्रॉब्लेम आहे. असे असले तरीदेखील वैचारिक भूक भागवण्यासाठी अशा व्याख्यानमालांची गरज आहे. ते काम असेच जिद्दिने चालू ठेवले पाहिजे ''
तळेगाव दाभाडे येथील गणेश मोफत वाचनालयाचे प्रशांत दिवेकर म्हणाले,  ''व्याख्यानमालांचे योग्य नियोजन व विषयाचा योग्य विचार केल्यास उपस्थिती चांगली असते. तरूणांच्या काही विशिष्ट ध्येयाने भारलेला गट त्यांच्या आवडीच्या वविषयांच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद देतात. त्यातून प्रेरणा घेऊन कार्यप्रवृत्त होतात. ग्रामीण भागात व्याख्यानांना चांगला प्रतिसाद मिळतो. व्याख्यान हा प्रबोधनाचा उत्तम मार्ग आहे. हे मान्य करणारा मोठा वर्ग समाजात आजही आहे. तो वर्ग व्याख्यानांना नक्की येतो. व्याख्यानांच्या विषयातली विविधता वाढते आहे. जीवनाच्या सर्व विषयांना स्पर्श करणआरे विषय घेतले जात आहेत. लायन्स कल्ब, रोटरी क्लब सारख्या संस्था आणि धनाढ्य व्यक्तिंनाही व्याख्यानमाला आकर्षणाचा भाग वाटू लागली आहे. असे असले तरीदेखील काही मुद्दे निराशाजनक वाटतात. ज्येष्ठ नागरिकांशिवाय अन्य वयोगटाची उपस्थइती कमी असते. वक्त्यांच्या मांडणीत अनेक वेळा नेमकेपणा नसतो. व्याख्यानमालेचा नेमका हेतू संयोजकांनी ठरवलेला नसतो. व्याख्यानाचा विषय लांबल्यास तो कंटाळवाणा होतो. प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, सत्कार या सगळ्या औपचारिकतेमध्ये मूळ व्याख्यान मागे पडते. वेळेवर कार्यक्रम सुरू होत नाही. त्यामुळे बराच वेळ जातो. गणेश वाचनालयाच्या बाबतीत शतकमहोत्सवी वाटचाल करणा-या संस्थेच्या वाटचालीत व्याख्यानमाला हा मुख्य उपक्रम आहे. स्थानिक प्रश्न, स्थानिक वक्ते, साहित्य अभिवाचन या विषयांचा समावेश व्याख्यानमालेत केला जातो. नेटके व नियोजित व्याख्यान पार पाडण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. व्याख्यानमालेच्या माध्यमातून चांगले वक्ते, निवेदक, श्रोते, कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे''
वडगावच्या सरस्वती व्याखानमालेचे डॉ. रवि आचार्य यांनी व्याख्यानमालेच्या संदर्भात अतिशय सकारात्मक मत सांगितले. ते म्हणाले, ''गेली चौदा वर्षे वडगावसारख्या ग्रामीण भागामध्ये आम्ही नवरात्रामध्ये नऊ दिवस व्याख्यानमाला आयोजित करतो आहे. आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. कमीत कमी पाचशे श्रोते व्याख्यानास येतात. स्थानिक वक्त्यांपासून अॅड. उज्ज्वल निकम, जयंत नारळीकर, सुधा मूर्ती, डॉ. अमोल कोल्हे असे दिग्गज वक्त्यांनी व्याख्यानमालेत व्याख्यान दिले आहे. मला वाटते, आपण व्याख्यानमाला कोणत्या उद्देशाने आयोजित करतो ते महत्त्वाचे आहे. केवळ राजकीय हेतू असेल तर त्याला प्रतिसाद मिळत नाही. वक्ते कोण आहेत यावर श्रोत्यांची उपस्थइती अवलंबून असते. तसेच व्याख्यानाची वेळ महत्त्वाची आहे. विषयांमध्ये नाविन्य व वैविध्य असेल तर वेगवेगळ्या  वयोगटातील श्रोते मंडळी उपस्थित रहातात. आमच्या व्याख्यानमालेमध्ये साठ टक्के महिलांचा सहभाग असतो. महिला केंद्रबिंदू असल्याने आपोआपच कुटुंबाला व समाजाला या व्याख्यानांचा उपयोग होतो.''
व्याख्यानमाला आणि समाजमन यांचे परस्पराशी घनिष्ट असा संबंध आहे.  या व्याख्यानमालांच्या व्यासपीठांनी उत्तम वक्ते घडवले, चांगले संवादक घडवले, सभाध्यक्ष घडवले आणि मुख्य म्हणजे संवेदनशील श्रोते घडवले आहेत. त्यामुळे व्याख्यानमालांची आजही समाजाला नितांत गरज आहे असेच म्हणावेसे वाटते.

Tuesday, 6 May 2014

हे एक रेशमी घरटे ......


 शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे तसेच धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालकांना आपल्या मुलांना पुरेसा वेळ देता येत नसल्याने शहरी भागात ऑटिझम आजारातील बालरुग्णांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा मुलांना सांभाळणे हे एक आव्हान असते. मात्र हे आव्हान पेलले आहे तळेगाव दाभाडे येथील एका कुटुंबाने. या कुटुंबात दोन ऑटिझम असलेली मुले आहेत.


तळेगाव दाभाडे येथील स्टेशन विभागात इंद्रायणी कॉलेजसमोरील इंद्रायणी कॉलनीमध्ये प्रल्हाद व राजश्री कदम या दांपत्याला विशाल आणि प्राजक्ता अशी दोन ऑटिझम असलेली मुले आहेत.  विशाल 21 वर्षांचा आहे तर प्राजक्ता 16 वर्षांची. प्रल्हाद यांना विशालच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्याच्या आजाराबद्दल कळले.  नंतर अक्षता हे कन्यारत्न झाले. ही मुलगी सर्वसामान्य मुलांसारखी होती. तिच्यानंतर प्राजक्ताचा जन्म झाला. प्राजक्तादेखील ऑटिझम या आजारानी ग्रस्त होती. प्रल्हाद आणि राजश्री यांना या गोष्टीचा प्रचंड मोठा धक्का बसला. तीन मुलांपैकी दोन मुले ऑटिस्टिक होती. त्यांचा सांभाळ करणे ही खुप आव्हानात्मक भूमिका होती.
कदम कुटुंब सुरुवातीला लोणावळ्यात रहात होते. प्रल्हाद हे लोणावळा  नगरपरिषदेत सफाई कामगार म्हणून काम करतात. विशालचा जन्म झाला तेव्हा तो नॉर्मल होता. मात्र गॅसेसच्या त्रासामुळे त्याच्या टाळूचे पाणी सुकले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तो मोठा होईल तसा हा प्रॉब्लेम कमी होईल. मात्र तसे झाले नाही. उलट त्रास वाढत गेला. इतर मुलांसारखी त्याची प्रगती नसल्याचे राजश्री यांना जाणवले. नातेवाईक व शेजा-यांनी असा मुलगा असल्याने टाळायला सुरूवात केली. नाईलाजाने त्यांनी तळेगावला बि-हाड हलवले.
विशाल व प्राजक्ता यांना कान्हे येथील जय वकिल स्कूल या शाळेत घातले. तिथे या दोन्ही मुलांची प्रगती व्हायला सुरूवात झाली.
प्रल्हाद म्हणाले, ''आर्थिक ओढाताण, अशी दोन मुलं आणि पाठीशी कोणाचाही आधार नाही. या परिस्थितीमुळे खूप त्रास झाला. एकाच्या तुटपुंज्या पगारात घर चालवणं सोप नव्हतं. विशाल व प्राजक्ता या ऑटिस्टिक मुलांमुळे लोकांनी आमची खुप अवहेलना केली, अपमान केला. मात्र आम्ही कधीही या मुलांचा राग राग केला नाही. देवाला कधीही दोष दिला नाही. कारण ही मुलं सुध्दा प्रेमळ आहेत. त्यांना नीट सांगितलं तर सगळ समजत. मात्र लोकांचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यामुळे  मानसिक त्रास अजूनही सहन करावा लागत आहे''
राजश्री म्हणाल्या, ''विशाल लहान असताना एका माणसाने त्याच्यावर काळा कुत्रा सोडला होता. तेव्हापासून त्याला कुत्र्याची खूप भीती वाटायची. रस्त्यात कुठेही कुत्रा दिसला की तो खूप त्रास द्यायचा. लोक हसायचे. बाहेर त्याच्या मनाविरूध्द काही केले तर तो मारायचा, कपडे काढून टाकायचा, आकांडतांडव करायचा. मात्र या कशाचाही त्रास मानून घेतला नाही. आपलं मुलं विशेष आहे. त्याला आपणच प्रेम दिलं पाहिजे. ही भावना कायम होती. जय वकिल स्कूलमुळे त्याच्यात खुप फरक पडला. प्राजक्ता ऑटिस्टिक आहे. पण तिला विशालपेक्षा जास्त समज आहे. या दोघांनाही सतत औषधे घ्यावी लागतात. त्यांची काळजी घेणं सोप नाहीये. मात्र कोणाचाही सपोर्ट नसताना, अक्षता व पतीच्या मदतीने मी हे आव्हान पेलते आहे. विशाल व प्राजक्ताने स्वावलंबी व्हावं एवढीच इच्छा आहे. तसच लोकांनी या मुलांबद्दल गैरसमज करून न घेता, किमान त्यांच्याशी दोन शब्द प्रेमानी बोलावं असं वाटतं''
जय वकिल स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका नयना डोळस म्हणाल्या, ''एकाच कुटुंबात दोन ऑटिस्टिक मुलांचा सांभाळ करणारे कदम कुटुंबिय खरोखर कोतुकास पात्र आहेत. ब-याच वेळा अशा मुलांच्या बाबतीत कुटुंबाकडूनदेखील अवहेलना वाट्याला येते. मात्र विशाल आणि प्राजक्ताच्या प्रगतीत शाळेबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. विशालवर आम्ही ''डॉग थेरपीचा'' वापर केला. त्यामुळे त्याच्यात अमूलाग्र बदल घडून आला. या थेरपीमध्ये आम्ही मुलांना कुत्र्यांशी बोलायला लावतो. जी मुलं कोणाशीही बोलत नाहीत ती मुलं कुत्र्यांशी आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतात. अगदी आज आई रागावली इथपासून, आज आवडीची भाजी डब्यात आहे इथपर्यंत सगळं सांगतात. कुत्र्यांना सांगितलेलं आपलं गुपित बाहेर कोणालाही कळणार नाही याचा त्यांना विश्वास वाटतो. यामुळे विशालची कुत्र्यांची भीती कमी झाली. प्राजक्ता स्लो लर्नर आहे. डान्स, ड्रामा थेरपीमुळे तिच्यात लक्षणीय बदल होतो आहे. अगदी नॉर्मल लोकांसाठीदेखील या थेरपीचा वापर लाभदायक ठरु शकतो, असं संशोधनानी सिध्द झालयं. स्वमग्नता हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो. याचे पूर्ण नाव सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे आहे. इंग्रजीत त्याला ‘ऑटिझम’ म्हणतात. ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही,  ही गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे''




Sunday, 4 May 2014




'स्व' चा मस्त शोध

सुख हे मानण्यावर असतं असं म्हणतात. पण अगदी विचित्र परिस्थितीत माणूस अडकला की सुख कसं मानायचं हेच कळत नाही. पण अशा अवस्थेतून आपल्याला जर कोणी बाहेर काढू शकत तर  ते म्हणजे आपण स्वतः.  हो खर आहे. अनुभवानी सांगतीय. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची गर्दी यासाठी मदत करत नाही. ते गाणं आहे ना, ''मी एकटीच माझी असते कधी कधी, गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी. तसं होतं. माझं होतं ''
असाच 'स्व' गवसलेला आणि ख-या अर्थानी जगणं शिकवणारा एक मस्त सिनेमा पाहिला, 'क्विन'...... राणी. कंगना राणावतनी तुमच्या माझ्या मनातल्या जगण्याच्या कल्पना खुप छान साकारल्या आहेत. काही कारणांनी आत्मविश्वास गमवलेल्या तुमच्या, माझ्या सारख्या सगळ्यांना प्रेरणा देणारा हा सिनेमा आहे.
सिनेमा पहातानाच आपल्यातला आत्मविश्वास वाढतो. कोणा एकावर प्रचंड अवलंबित्व किती घातक असतं हे आपण अनुभवलेलं असत. पण नव्यानी जाणवतं. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तिला आपण खुप जास्त महत्त्व देतो. मात्र त्यानीच आपला विश्वासघात केला तर.... मग सहाजिक प्रचंड निराशा येते. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कोणीही मदत करत नाही. ती मदत आपली आपल्यालाच मिळवावी लागते. आणि एक जाणवतं , की ही मदत कोणी एकानीच करावी अशी आपण अपेक्षा का करतो? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला वेगवेगळी माणसं भेटतात. मोकळ्या मनानी या सगळ्याचा स्वीकार करून आयुष्य आनंदी कसं करता येईल. हा शोध क्विन मध्ये लागल्याचं मला जाणवलं.
मी काही सिनेमाचं परीक्षण लिहिणारी नाही. पण मनापासून सांगते या सिनेमानी खरच एका वेगळ्या विश्वात नेलं. अभिनय, लोकेशन्स, पात्र सगळच खुप मस्त वाटलं. भाषा भावनेपेक्षा मोठी नाही हे जाणवलं. संवाद साधण्यासाठी भावना महत्त्त्वाची . भाषा नाही. आनंद मिळविण्यासाठी आपण कोणावरही अति अवलंबून रहाणं बरोबर नाही. हे पटलं. मनापासून पटलं. त्यामुळेच फार विचार करण्यापेक्षा समोर येणा-या परिस्थितीत आपण आनंदी कसं राहू शकतो याचा विचार केलेला चांगलं. माझ्या मनातसुध्दा नेहमी असा विचार येतो. दुःखी अवस्थेत रहाण्यापेक्षा जगेन तर आनंदानी नाहीतर नाहीच.