Monday, 5 January 2015


लोकमान्य.........  एक युगपुरूष 



माणसाच्या आयुष्यात भारावून जाण्यासारखे अनेक क्षण येतात. काही वेळा हे क्षण आपलं आयुष्य बदलवून टाकतात. मग हे भारावलेपण एखादी व्यक्ति, एखादं पुस्तक, एखादी घटना किंवा एखादी कलाकृतीमुळे येऊ शकतं.  संवेदनशील माणसं अधिक भारावून जातात. असच भारावलेपण कालपासून मी अनुभवते आहे..... 
लोकमान्य ..... एक युगपुरूष हा सिनेमा पाहिल्यापासून  टिळकांचे ते डोळे......ते संवाद.... तो काळ..... डोळ्यांसमोरून हालतच नाहीये. आज दिवसभर रोजची काम करताना माझा चिन्मय मांडलेकर झाला होता. (सिनेमा पहा मग कळेल) चित्रपटाचं परीक्षण करण्याइतकी मी तज्ज्ञ नाही. पण एक नक्की.... कोणताही सिनेमा आपल्या मनावर दीर्घकाऴपर्यंत छाप सोडतो तो उत्तम सिनेमा.... या सिनेमात टिळकांची भूमिका करणा-या सुबोध भावेनी त्याच्या मुलाखतीत एक विलक्षण गोष्ट सांगितली होती , टिळकांच्या डोळ्यात त्याला रोंमॅंटिसिझम दिसला होता . पण तो रोंमॅंटिसिझम देशाप्रती होता.... देशबांधव सुखात रहावे यासाठी होता.... अगदी हाच भाव हा सिनेमा पहाताना जाणवला.
लोकमान्य टिळक या महान व्यक्तिमत्वाला आपण काहीच ओळखत नाही याची खंत वाटली... आणि खरं सांगु लाज सुध्दा. आपल्या मुलांनी आपल्याला टिळकांविषयी काही विचारलं तर एक दोन गोष्टी सोडल्या तर आपण काहीच सांगु शकत नाही. टिळकच कशाला कित्येक क्रांतिकारकांची, देशभक्तांची नावं आपल्याला माहिती नाहीत. आज मिळणा-या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं घरदार पणाला लावलं अशा लोकांचं आपण स्मरणदेखील करत नाही.... निदान त्यांच्या विचारांना आपल्या मनात जिवंत तरी ठेवलं पाहिजे. मनात विचार जिवंत राहीले ना की कृती आपोआप घडेल.... कारण कृतीचा कर्ता करविता मनच तर आहे. फार छोट्या गोष्टींचा जास्त विचार करून ध्येयच विसरतो........ 
किती अडचणींचा सामना करून, आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहून, हालअपेष्टा सहन करून स्वातंत्र्य मिळालय आपल्याला, अगदी आयतच. पण रोजच्या अगदी क्षुल्लक संकटांनी आपण किती घाबरतो. मला कल्पना आहे, आपापल्या परीनी आपलं दुःख मोठं असत. पण त्यावर मात करता आली पाहिजे. 

Friday, 2 January 2015

मन..........


आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो..... चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो.... आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...... सलीलचं हे गाणं सारख आठवतय आज.... छे.... नववर्षाची अशी बोअर सुरूवात..... काम असलं म्हणजे खूप आणि नसलं म्हणजे काहीच नाही.... काय आहे हे ? मला ना खुप काम करायची सवय झालीय..... म्हणजे ते स्वतःच असेल असं नाही.... लष्करच्या भाक-याच फार असतात. (आमच्या अहोंच्या मते).... मला आनंद मिळतो ते खरच.... पण आजचा दिवसच जाम बोअर गेला. आज मला माझ्या सो कॉल्ड लष्करच्या भाक-या पण नाही भाजता आल्या. 
  सकाळपासूनच एक - दोन फोन कॉल्स नी जाम डोक आऊट केलं....   म्हणजे मी करून घेतलं. हे मात्र जाणवलं आज .....आपणच आपला मुड घालवतो आणि परतदेखील आणतो. बाहेरचा माणूस या सगळ्याला जबाबदार नसतो. आपण उगाचच समोरच्याला ब्लेम करतो. बाह्य परिस्थितीचा फार परिणाम करून घेतो आपण. काही गरज नसते त्याची. फक्त याचा साक्षात्कार फार उषीरा होतो. माणूस म्हणजे हे सगळ होणारच. पण तरीही .......... फार भडकून काही होत नाही... दोन घास आपल्यालाच कमी जातात. ज्या कारणामुळे डोकं फिरलय ते कारणच मार्ग सुचवत... पण विचारांच्या भोव-यात गुंतण्याआधी मन शांत करायला हवं..... स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी बाहेरचं कोणी नाही तर आपणच प्रयत्न करायला लागतो. त्यात आम्ही बायका जरा जास्तच संवेदनशील असतो. नाही त्या गोष्टींचा उगाचच विचार करत बसतो. 
माझ्या ओऴखीचे एक काका आहेत , ते नेहमी म्हणतात, समर्थांचा दासबोध वाचा.... आनंदी रहाण्याची गुरूकिल्ली आहे ती.... खरच आहे........ माणसानी आपलं वर्तन कसं ठेवावं आणि कसं ठेवू नये याबद्दल समर्थ रामदास स्वामीनी नि:संदिग्ध, खूप सविस्तर आणि मोलाचं मार्गदर्शन त्यांच्या  काव्यात केलं आहे. त्यांनी वारंवार मनाला संबोधित केलं आहे खरं.... पण इथे मन हे केवळ एक रूपक असून लेखन सगळ्या मानवजातीला उद्देशून केलं  आहे. समर्थ सांगतात असं जगता आलं तर..... 
मना मानसीं दु:ख आणूं नको रे। 
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ 
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। 
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी -      
समर्थांच्या या श्लोकावर विचार करता करता मनावरची मरगळ नाहीशी झाली.... खरच हे मन म्हणजे ना........                                                                             

Saturday, 20 December 2014

हे बंध रेशमाचे...


आपण सगळेच प्रेम मिळवण्यासाठी धडपडत असतो . सगळी नाती जोडतो ती प्रेम मिळवण्यासाठीच. त्यातून आनंद मिळावा यासाठी. पण प्रत्येक वेळी आनंद मिळतोच असं नाही. काही वेळा प्रेम आणि आनंद मिळवण्यासाठी समाजाचा विरोध पत्करायची आपली तयारी नसते. प्रेम, आनंद आणि  स्वच्छ, मोकळ जगणं हे सगळ किती छान आहे.  आज मी दोन अप्रतिम कलाकृतींचा आनंद घेतला. तेव्हा मला प्रकर्षानी हे जाणवलं.
 एक म्हणजे उमा त्रिलोक यांचं अमृता आणि इमरोझ हे पुस्तकं. ज्ञानपीठ पुरस्कार विजेती लेखिका आणि एक चित्रकार यांची प्रेमकहाणी. प्रतिभा आणि प्रतिमा, मैत्री आणि प्रेम यांचा विलक्षण अविष्कार म्हणजे हे नातं. चाळीस वर्ष एकमेकांच्या सहवासात घालवलेले दोन जीव. म्हणायला दोन पण खरं तर एकच. ज्यांना प्रेम ही एक भ्रामक कल्पना वाटते, त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा.  समाजाच्या सो कॉल्ड चौकटीत बसणारं त्यांच हे प्रेम नव्हतं. पण अमृता आणि इमरोझ मोकळ्या मनानी जगले. प्रेमाची खात्री असली की अडथऴे जाणवत नाहीत. हे सगळ अमृता यांनी  नुसतं लिहून ठेवलं नाही तर त्या तसं जगल्या. इमरोझदेखील अमृतांच्या आजारपणात  सावलीसारखे त्यांच्याबरोबर राहिले. एक विलक्षण नातं. शब्दात बांधता न येणारं
शांता गोखले यांचं रीटा वेलिंगकर या पुस्तकानी आणि सिनेमानी  एका वेगळ्या मोकळ्या जगण्याविषयी सांगितलं. जगायचं पण आनंदानी ही थिअरी उषीरा का होईना कऴलेल्या एका स्त्रीची गोष्ट आहे यामध्ये. अमृता आणि इमरोझच्या निखळ आणि सुंदर प्रेमापेक्षा एकदम वेगळी कथा. जे मोकळ नातं त्या दोघांमध्ये होतं आणि समाजाचा रोष पत्करून त्यांनी स्वीकारलं होतं त्याला छेद देणारी ही गोष्ट. समाजाची चौकट न मोडता, गुडी गुडी संबंध जपणा-या साळवीची आणि रीटाची गोष्ट. रीटाला हवय मोकळ नातं आणि साळवी जपतोय चौकट. यातून झालेला संघर्ष. रीटाला मिळालेलं शहाणपण. सुंदर आहे सगळ. 
स्वच्छ आणि मोकळ जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. तसं जगलो तरच आनंदी रहाता येईल. एक तर आपण करत असलेल्या गोष्टी मोकळेपणानी स्वीकारायचं धैर्य हवं,  नाही तर असं काहीही करू नये ज्यामुळे आपल्या आयुष्यातला मोकळेपणाच संपून जाईल. निर्मळ , मोकळं, स्वच्छ असं जगता यायला हवं. हे सगळ अवलंबून आहे आपल्या  नात्यांमध्ये असलेल्या प्रामाणिकपणावर. हा प्रामाणिकपणा तेव्हाच ठेवता येईल जेव्हा आपुलकीनी आणि प्रेमानी एकमेकांना समजून घेतलं जाईल. विधात्यानी माणसं निर्माण केली, माणसानी निर्माण केली नाती, नातं कोणतही असो, हे बंध जोपासण्यासाठी आणि ते घट्ट करण्यासाठी धडपड करायला हवी...... 

Saturday, 13 December 2014


नाती जपूया..........


आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. अलिकडे मुलांना त्यांच्या आई बाबांबरोबर फारस कुठे जायला आवडत नाही. हा विषय डोक्यात येण्याचं कारण अगदी कालच एका लग्न समारंभात माझ्या काही मैत्रिणी खुप मोठेपणानी सांगत होत्या की, ''माझी मुलगी मला म्हणाली, मम्मा प्लीज तू जा बाई त्या बोअर लग्नात. मी त्यापेक्षा घरीच एन्जॉय करते.'' मी मात्र माझ्या मुलाला थोडं रागवूनच लग्नाला नेलं होतं. तो सुध्दा म्हणत होता , ''आई प्लीज मी येत नाही. कारण तिथे माझ्या वयाचं कोणीच नसत.'' त्यावर मी माझं ज्ञान पाजळून त्याला सांगितलं , ''अरे असं कसं करून चालेल? या निमित्तानी ओळखी होतात. हल्ली एरवी कोण कोणाकडे जातय.'' तिथे गेल्यावर त्याचचं म्हणणं खरं झालं. अगदी जवळची नात्यातली मुलं सोडली तर कोणीही तिथे आलेलं नव्हतं. 
थोडं वाईट वाटलं. पिढीच्या अंतरानी परिस्थिती बदलणार आहे . हे मला मान्य आहे. पण एकमेकांना भेटण्याच्या प्रसंगातदेखील असं घडू लागलं तर कसं होणार ? एकमेकांकडे कारणाशिवाय जाणं  दुर्मिळ झालयं. हल्लीच्या बिझी शेड्युल्डमुळे विनाकारण कोणाकडेही जाणं शक्य नाही. पण निदान लग्ना कार्याच्या निमित्तानी तरी मुलांना आपल्या नातेवाईकांशी ओळख झाली पाहिजे. फार लांब कशाला अगदी माझ्या सगळ्या आत्ये, चुलत भावंडांना माझा मुलगा ओळखत नाही. वाईट वाटतं. नाती जपायचं विसरतोय का आपण ?
 तुम्ही इतक्या लांबून कसे येणार ? म्हणून मी बोलवलच नाही लांबच्या कोणाला. असं म्हणतात लोक. काही अंशी बरोबर पण आहे. लांबच्या कार्याला जातच नाहीत. घरातून कोणीतरी एकच जातो. मग यजमानांच ताटाचं गणित कोलमडत असावं. सगळच अवघड असतं. स्पष्ट विचाराव लागत किती लोक येणार तुमच्याकडून ?  हे व्यवहार्य असेलही. पण का कोणास ठाऊक या परिस्थितीची मी  माझ्या लहानपणाशी तुलना करू लागते. आम्ही आईबरोबर सगळीकडे जायचो. अगदी दहावी बारावीत सुध्दा. हा काळ फार आदिम जमान्यातला नाही. त्यामुळे आमच्या आई वडीलांच्या माघारीसुध्दा आम्हाला आवर्जून बोलवणारे नातेवाईक आहेत. पण आमची पिढी कमी पडतीय नाती जपायला. सोशल मिडियाशी सोशल झालेली ही पिढी ख-या आयुष्यात सोशल व्हायला हवी. आत्ताची पिढी सोशल आहे, त्यांना कनेक्ट व्हायला आवडतं. नाहीतर फेसबुक आणि अन्य माध्यमात इतक्या ग्रुप्समधून ही मंडळी चॅटली असती का ?  फक्त त्यांना बरोबर घेऊन चालायला हवं. त्यांच्या कलानी घ्यायला हवं. नातेसंबंध जपायला शिकवायला हवं . त्यासाठी आधी आपण नाती जपायला शिकायला हवं. वेळ नाही हे कारण थोडं बाजुला ठेवायला हवं. असं नाही केलं तर परिस्थिती कठीण होईल . मुळात हल्ली एक एक अपत्य. त्यामुळे तसही कुटुंब लहान झालय. त्यातून कुठे गेलोच नाही तर कसं होणार ? 
''आम्ही ना सुट्टीत नातेवाईकांकडे जातच नाही. त्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं ''  असं म्हणत नातेवाईकांकडे जाण कमी झालय. पर्यटन करायला हवच. पण नात्यांच विघटन थांबवायला हवं. जिथे असं विघटन होत नसेल त्यांना मनापासून सलाम. पण जिथे होत असेल त्यांनी हे विघटन थांबवून नात्यांच संघटन करायला हवं. काय वाटतं तुम्हाला ? 

Thursday, 11 December 2014

बंद करा प्लीज..........


परवा  पेपरमध्ये एक बातमी वाचली. एका मॉलमध्ये चाललेल्या कार्यक्रमात कर्कश्श आवाजात लावलेल्या डीजेवर रसिकांनी बंदी आणली.  आणि हे सुध्दा आवडलं की त्या कार्यक्रमाला जवळपास हजार प्रेक्षक होते. बरं वाटलं वाचून.... म्हणजे एक लक्षात आलं की आपण ठरवलं तर चुकीच्या गोष्टी बंद करू शकतो. नुसतं भाषणबाजी आणि परिसंवाद घेऊन उपयोग नाहीये. विशेष करून आपल्या आजुबाजुला घडणा-या चुकीच्या गोष्टी आपण एकत्र आलो तर बंद करू शकतो. 
मागे एकदा मी डीजे या एका कर्णकर्कश्श आणि प्रचंड छळवादी गोष्टीबद्दल लिहिलं होतं. मला तर हा डीजे नामक प्रकार मागील कित्येक जन्मांचा वैरी वाटतो. तीच तीच गाणी, नुसता कहर आहे डीजे म्हणजे. याचे वाईट परिणाम, त्याचा होणारा त्रास याविषयी पुन्हा पुन्हा कितीही सांगितलं तरी त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. कारण आपण सगळे एक होऊन विरोध करत  नाही. सध्या लग्नाचा सिझन जोरात आहे. पण  ''लग्न''  हा  त्रास ज्याचा त्यानी भोगावा. त्याचा दुस-यांना का त्रास ? म्हणजे नंतर    होणा-या  ढॅंड ढॅंडचा आधीच इतका गजर का करायचा ? एक तर त्या नवरा नवरीला या सगळ्यात अजिबात रस नसतो. उगाच , ''बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना'' याप्रमाणे बाकीचे सगळेच नाचत असतात. कोणी मुलींना इंप्रेस करायला, कोणी मुलांना  इंप्रेस करायला, कोणी उगाच, कोणी घेतलेली जिरवायला. काय काय विचित्र प्रकार आहेत हे. निदान आजुबाजुच्या लोकांचा तरी विचार करा. डीजे जितका जोरात तितकं लग्न जोरात , अशी काही भोळी समजूत आहे का ? 
कोणी निवडून आलं डीजे, कोणाचं लग्न असल डीजे, कोणाकडे कसलाही आनंदाचा प्रसंग असला डीजे, कोणाची मिरवणूक असली डीजे, गणेशोत्सव किंवा गोकुळाष्टमी या दिवसांमध्ये डीजे वाजवणं तर जन्मसिध्द हक्कच आहे. बर गमंत ही आहे की, त्रास सगळ्यांना होतो. पण पुढे जाऊन बोलणार कोण? हा प्रश्न आहे. मी असं ऐकलय की हे डीजे प्रचंड महागडे असतात. अरे मग का , का पैसे उधळता असे ? ध्वनीपातळीचा विचार तरी करा. हौसेला मोल नाही हे मान्य. पण आपल्या हौसेमुळे कित्येकांना त्रास होतोय, हे लक्षात घ्या. नेतेमंडळी म्हणतात, ''कार्यकर्ते ऐकत नाहीत.'' कार्यकर्ते म्हणतात, ''मग,  निवडणूकीच्या काळात इतकं काम केलं. काही मागितलं का ? आता डीजे हवाच. ''डीजे आणि आनंद याचं काय कनेक्शन? डीजे आणि त्याचा ढणढणाट नसेल तर आनंद व्यक्त करता येत नाही का ? डीजे या यंत्राला विरोध नाहीये. पण त्याच्या आवाजाच्या पातळीला विरोध आहे. कायमच कर्णबधिर होणं परवडेल का ? त्यापेक्षा, आनंद व्यक्त करण्याचा मार्ग बदलुया का ? हे गाणं पीजे म्हणून डीजेवर लावायला हरकत नाही.... 
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई.........
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी.............. खेळ मांडला......  मांडला (डी..........जे......)

नॉट आऊट 100 ..............


काल एका खुप मस्त कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. आमच्या तळेगावला एक वृध्दाश्रम आहे ''वानप्रस्थाश्रम'',  तिथे मोहोळकर आजींचा शंभरावा वाढदिवस साजरा केला होता. त्या वृध्दाश्रमाला वेगळाच साज चढवला होता. एरवी डोळ्यात दुःखाची किनार असणा-या सगळ्या आजी आजोबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवली. त्या वृध्दाश्रमाला लाईटच्या माळा लावल्या होत्या. फुगे, फुलांच्या माळा आणि रोषणाईनी सगळा परिसर सजला होता. छोट्याश्या स्टेजवर छान फ्लेक्स लावले होते. एरवी स्वतःला मान्यवर म्हणवणारे समोरच्या खुर्चीवर बसले होते. स्टेजवर काही मान्यवर होते. पण इतर वेळी असतो तसा त्यांचा बडेजाव नव्हता. आजींचा सत्कार करायला 105 वर्षांचे अंबोरे आजोबा आले होते. आजही शेतात खुरपं घेऊन काम करणारे ते आजोबा पाहिले आणि थक्क झाले. डोक्यावर पागोट, धोतर, पैरण असा साधा वेश घातलेले आजोबा सॉलिड होते. स्माईलिंग हार्टस नावाच्या तरूणांच्या एका ग्रुपनी आणि आमच्या उर्मिला ताईंनी सगळा कार्यक्रम आखला होता. अर्थात आश्रमातल्या सगळ्या सदस्यांची त्यांना साथ होतीच. 
या कार्यक्रमाला आल्यानी शंभरीतल्या एका युवतीचं दर्शन घडलं. वयाच्या 14 व्या वर्षी लग्न झालेल्या आजींना खूप लवकर म्हणजे तिशीच्या आतच वैधव्य आलं. किती भयंकर आहे हे सगळं. आजकाल तिशीत मुली लग्न सुध्दा करत नाहीत. तारूण्यात कोसळलेल्या या संकटाला आजींनी झुंज दिली. मशिनवर कपडे शिवून संसार केला. मुलांना शिकवून आपल्या पायावर उभं केलं. 
इतकं सगळ सोसून त्या गेली 15 वर्ष वृध्दाश्रमात आहेत. आता ते का ? कसं ? या वादात आपण न पडलेलं बरं. तो एक स्वतंत्र विषय आहे. पण वृध्दाश्रमातदेखील त्या आनंदानी रहातायत. तिथल्या सगळ्या उपक्रमात सहभागी होतायत. आपला आहार, व्यायाम हे सगळ अगदी योग्य पध्दतीनी पाळतायत. सत्काराला उत्तर देताना त्यांनी अगदी थोडक्यात आपल्या मनातले भाव व्यक्त केले. तिथे त्यांच्यासाठी आणलेले सगळे हार, पुष्पगुच्छ त्या आनंदानी स्विकारत होत्या. मस्तपैकी ऐटीत केक सुध्दा कापला. कुठेही आपल्या वार्धक्याच्या खुणा त्यांच्या वर्तनातून दिसत नव्हत्या. आहे त्या परिस्थितीत आनंदानी रहायचं इतका साधा सोपा मंत्र त्यांनी जपला आहे. 
मोहोळकर आजींसारख जगता आलं तर आयुष्यात निराशा कधीच जाणवणार नाही. कोणत्याही काउन्सिलरकडे जाण्याची गरज भासणार नाही. जीवन आपल्याला कसं जगायचं हे शिकवत. फक्त आपली ते शिकण्याची तयारी नसते. कोणी तरी आधार द्यायला असावं असं वाटण चूक नाही. पण कोणी नाही म्हणून थांबण हे चूक आहे. आपल्याला आधार देणारे अनेक जण भेटतात. आपल्याला हवा तोच आधार मिळत नाहीये म्हणून आकांडतांडव करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा आत्ता जे आहे त्यामध्ये आनंदी रहाता आलं पाहिजे. प्रेम मिळवण्यासाठी आधी ते द्यावं लागतं. अशा अनेक संस्थांमध्ये कितीतरी जण आपली वाट बघतायत. तिथे आपल्या मनातल्या आनंदाची उधळण करूयात. दोन दोन तास व्हॉटस अॅपवर आणि फेसबुकवर घालवा. पण आठवड्यातला एक तास अशा संस्थांना देता आला तर. आपण नॉट आऊट 100 इतकं जगू का नाही माहिती नाही. पण जितकं आयुष्य आहे त्यात दुस-यांच्या       चेहे-यावर आनंद, हसु आणण्याचा प्रयत्न करायचा. इतकं आज ठरवुयात का  ?