Saturday, 13 December 2014


नाती जपूया..........


आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे. अलिकडे मुलांना त्यांच्या आई बाबांबरोबर फारस कुठे जायला आवडत नाही. हा विषय डोक्यात येण्याचं कारण अगदी कालच एका लग्न समारंभात माझ्या काही मैत्रिणी खुप मोठेपणानी सांगत होत्या की, ''माझी मुलगी मला म्हणाली, मम्मा प्लीज तू जा बाई त्या बोअर लग्नात. मी त्यापेक्षा घरीच एन्जॉय करते.'' मी मात्र माझ्या मुलाला थोडं रागवूनच लग्नाला नेलं होतं. तो सुध्दा म्हणत होता , ''आई प्लीज मी येत नाही. कारण तिथे माझ्या वयाचं कोणीच नसत.'' त्यावर मी माझं ज्ञान पाजळून त्याला सांगितलं , ''अरे असं कसं करून चालेल? या निमित्तानी ओळखी होतात. हल्ली एरवी कोण कोणाकडे जातय.'' तिथे गेल्यावर त्याचचं म्हणणं खरं झालं. अगदी जवळची नात्यातली मुलं सोडली तर कोणीही तिथे आलेलं नव्हतं. 
थोडं वाईट वाटलं. पिढीच्या अंतरानी परिस्थिती बदलणार आहे . हे मला मान्य आहे. पण एकमेकांना भेटण्याच्या प्रसंगातदेखील असं घडू लागलं तर कसं होणार ? एकमेकांकडे कारणाशिवाय जाणं  दुर्मिळ झालयं. हल्लीच्या बिझी शेड्युल्डमुळे विनाकारण कोणाकडेही जाणं शक्य नाही. पण निदान लग्ना कार्याच्या निमित्तानी तरी मुलांना आपल्या नातेवाईकांशी ओळख झाली पाहिजे. फार लांब कशाला अगदी माझ्या सगळ्या आत्ये, चुलत भावंडांना माझा मुलगा ओळखत नाही. वाईट वाटतं. नाती जपायचं विसरतोय का आपण ?
 तुम्ही इतक्या लांबून कसे येणार ? म्हणून मी बोलवलच नाही लांबच्या कोणाला. असं म्हणतात लोक. काही अंशी बरोबर पण आहे. लांबच्या कार्याला जातच नाहीत. घरातून कोणीतरी एकच जातो. मग यजमानांच ताटाचं गणित कोलमडत असावं. सगळच अवघड असतं. स्पष्ट विचाराव लागत किती लोक येणार तुमच्याकडून ?  हे व्यवहार्य असेलही. पण का कोणास ठाऊक या परिस्थितीची मी  माझ्या लहानपणाशी तुलना करू लागते. आम्ही आईबरोबर सगळीकडे जायचो. अगदी दहावी बारावीत सुध्दा. हा काळ फार आदिम जमान्यातला नाही. त्यामुळे आमच्या आई वडीलांच्या माघारीसुध्दा आम्हाला आवर्जून बोलवणारे नातेवाईक आहेत. पण आमची पिढी कमी पडतीय नाती जपायला. सोशल मिडियाशी सोशल झालेली ही पिढी ख-या आयुष्यात सोशल व्हायला हवी. आत्ताची पिढी सोशल आहे, त्यांना कनेक्ट व्हायला आवडतं. नाहीतर फेसबुक आणि अन्य माध्यमात इतक्या ग्रुप्समधून ही मंडळी चॅटली असती का ?  फक्त त्यांना बरोबर घेऊन चालायला हवं. त्यांच्या कलानी घ्यायला हवं. नातेसंबंध जपायला शिकवायला हवं . त्यासाठी आधी आपण नाती जपायला शिकायला हवं. वेळ नाही हे कारण थोडं बाजुला ठेवायला हवं. असं नाही केलं तर परिस्थिती कठीण होईल . मुळात हल्ली एक एक अपत्य. त्यामुळे तसही कुटुंब लहान झालय. त्यातून कुठे गेलोच नाही तर कसं होणार ? 
''आम्ही ना सुट्टीत नातेवाईकांकडे जातच नाही. त्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं ''  असं म्हणत नातेवाईकांकडे जाण कमी झालय. पर्यटन करायला हवच. पण नात्यांच विघटन थांबवायला हवं. जिथे असं विघटन होत नसेल त्यांना मनापासून सलाम. पण जिथे होत असेल त्यांनी हे विघटन थांबवून नात्यांच संघटन करायला हवं. काय वाटतं तुम्हाला ? 

2 comments: