Wednesday, 3 December 2014


प्रामाणिकपणा.........



परवा एका कार्यक्रमाच्या निमित्तानी भंडारा डोंगरावर जायचा योग आला. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय, खरं तर मी शब्दांकन केलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. पण मला तुमच्याशी त्याबद्दल नाही बोलायचं. पुन्हा केव्हा तरी त्या पुस्तकाविषयी सांगेन. पण आज वेगळच काहीतरी सांगायचं आहे. त्या दिवशी वारकरी संप्रदायातले सगळे महाराज, कीर्तनकार, विणेकरी, टाळकरी, वारकरी आलेले होते. जवळपास दीड हजार लोक होते. तिथे पंढरपूरचे अतिशय विद्वान ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुरकर प्रमुख वक्ते म्हणून होते. त्यांनी बोलता बोलता एक मार्मिक मुद्दा मांडला. ते  कीर्तनकारांना उद्देशून म्हणाले, ''कीर्तनकारांनी पाकीटाच्या मागे न लागता, अध्यात्मिक विचारांचा प्रसार करण्यासाठी वचनबध्द असलं पाहिजे. प्रामाणिकपणे आपलं काम केलं पाहिजे. ''
फारच महत्त्वाचा मुद्दा वाटतो हा. प्रामाणिकपणा हा गुण आपल्याला आयुष्यात खूप काही मिळवून देतो. लहान मुलांना या गुणाचं महत्त्व पटवून देताना, आपणच या गुणापासून दूर चाललोय की काय असं वाटतं कधी कधी. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत हा प्रामाणिकपणा जपला जात नाही. पैसा मिळवणं महत्त्वाचं आहेच. पण त्या पैशापायी आपण काय काय गमवतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. ''आत्ताच्या काळात इतकं प्रामाणिकपणे वागून चालत नाही हो.'' असं म्हणणारे खूप भेटतात. पण मला वाटतं , आपल्या मनाचं ऐकाव. ते आपल्याला कधीच चुकीचा सल्ला देत नाही. मग ते बुध्दिशी ताडून बघावं. त्यानंतर जो काही निर्णय होईल तो प्रामाणिकच असेल. 
प्रामाणिकपणे काही गोष्टी कबूल केल्यानी मनावरचा कितीतरी भार हलका होतो. मग ती चूक असो की एखादी चांगली गोष्ट. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये अकारण खोटं बोलून उगाच संकटं वाढतात. त्यापेक्षा प्रामाणिकपणे कबुल केलेलं काय वाईट ?  मूल्यशिक्षण देताना प्रामाणिकपणा हे महत्त्वाचं मूल्य सांगितलं जातं. मूल्यशिक्षण शिकवणा-या शिक्षकांनी आणि पालकांनी लहान वयातच या मूल्याचं महत्त्व सांगितलं तर ब-याच मोठ्या चुका घडणार नाहीत. ट्रेनमधून स्टेशनवर उतरल्यावर टी सी ला तिकीट न काढणारी अप्रामाणिक माणसं लगेच दिसतात. मी आणि माझी मैत्रीण कायम असा विचार करायचो, ''इतकं प्रामाणिकपणे तिकीट काढलय पण हा टीसी कधी बघतच नाही. साला प्रामाणिकपणाचं काही चीजच नाही.'' बसमध्ये, बॅंकेत, दुकानात , रिक्षावाल्याला  उरलेले पैसे प्रामाणिकपणे देऊन टाकले की किती बरं वाटतं. तो कंडक्टर, दुकानदार, रिक्षावाला आपले उरलेले पैसे कुठे देतो ? मग आपण तरी का उगाच इतकं अति करायचं ? असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. पण  माझी आई तर  नेहमी म्हणायची , '' हा असा चुकून मिळालेला पैसा कधीच लाभत नाही.''
एका वेगळ्या मूल्यावर बोलताना नात्यातला प्रामाणिकपणा जपलाच पाहिजे. हे वेगळं सांगायला नको. जे वाटतं ते बोललं की मनावरचा ताण कमी होतो. काही वेळा प्रामाणिकपणे कबूल केल्यानी समोरच्याला राग येऊ शकतो. पण तो एकदाच. पुन्हा विचार केल्यानंतर त्या व्यक्तिला सुध्दा हे पटत. 
अरे हो........ प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगते हा. आज ब्लॉगवरचा हा 50 वा लेख आहे. खरं तर मला ब्लॉगवर 50 पोस्ट दिसत होत्या. पण लेख 49 होते. मग म्हणलं पन्नासावा लेख लिहावा. पण मनीमानसी काही येतच नव्हतं. उगाच ओढून ताणून कशाला लिहायचं ना ? विषय पण असा असावा ज्यातून हाफ सेंच्युरी झळकेल. काय ? आता तुम्ही सगळ्यांना प्रामाणिकपणे पोस्टला कमेंट करा बर........

1 comment:

  1. chhan, nehami pramane....& congratulation for 50....best wishes to complete upto 500 blogs.

    ReplyDelete