आज मौसम बडा बेईमान है.....
आज मौसम कितना खुश गवार हो गया, खत्म सभी का इंतजार हो गया ;
बारिश की बुंदे गीरी कुछ इस तरहसे; लगा जैसे आसमान को जमीन से प्यार हो गया
काल संध्याकाळपासून कोसळणारा हा पाऊस किती छान शब्दबध्द केलाय. व्हॉटस अप चे काही मेसेजेस खरच खुप छान असतात. फेब्रुवारी महिन्यात पडणा-या पावसाला उन्हसाळा वगैरे म्हणून झालय. किंवा अगदी बरेच विनोद करून झालेत या पावसावर. पण पावसाला काही बोललं ना की वाईट वाटतं. सृजनाची निर्मिती करणारा पाऊस हवासाच वाटतो. मला हे मान्य आहे की असा अवेळी पडलेला पाऊस नुकसान घेऊन येईल कदाचित. लोकं आजारी पडतील. पण तरीही पाऊस छानच असतो.. नाही का ?
अवेळी पडलल्या पावसानी काही पूर्वनियोजित कार्यक्रमांचा फज्जा उडवला. अगदी सकाळपासून ढग दाटून आलेले असले तरीदेखील तो पावसाळ्यासारखा बरसेल असं वाटलं नव्हतं. पण संध्याकाळी मातीचा सुगंध मन भरून गेला. बघता बघता सगळा आसमंत ओला चिंब झाला. मनातल्या आठवणी ढगांसारख्या दाटून आल्या. पावसाच्या सरींप्रमाणे या आठवणी बरसू लागल्या. पावसाळ्यामध्ये सृजनाची, नवनिर्मितीची फार मोठी ताकद आहे. जमिनीवर तो बरसतो तेव्हा सृष्टी सुंदर दिसते. आजुबाजुचं वातावरण पाहून, तन - मनाला पालवी फुटते. 2015 मधला हा पहिला पाऊस..
धुंद आणि कुंद अशा या रोमॅंटिक हवेमध्ये विं. दा. करंदीकरांची ही कविता आठवली,
'' हिरवे हिरवे रान मोकळे,ढवळ्या पवळ्या त्यावर गायी.
प्रेम करावे अशा ठिकाणी, विसरूनी भीती विसरूनी घाई.
प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊनिया तृण,
प्रेम करावे असे परंतु, प्रेम करावे हे कळल्याविन. ''
वाहवा... अगदी एखाद्या हिरव्यागार, सुंदर डोंगरावर गेल्यासारखं वाटलं.
या पावसात काय जादू आहे तेच कळत नाही. त्याचा कितीही राग आला तरी रागवता येत नाही. तो अवेळी आला तरी त्याचं स्वागतच करावसं वाटतं. त्याला कोणी रागानी काही बोललं तर वाईट वाटतं... कारण पाऊस हा वठलेल्या तना - मनाला पुनरूज्जिवीत करतो. त्याला बोल लावलेले कसे सहन होतील ? आणि सगळा राग त्याच्यावरच का ? हल्ली माणसं तरी कुठे शहाण्यासारखं वागतायत ? मनात येईल तसंच वागतात ना ? मग निसर्गालाच सगळे नियम का ? माणसानी वागाव नियमाप्रमाणे. अशा वेळी मात्र, '' दुनिया बदल गयी है '' असं ऐकवलं जातं ना? मग आमच्या पावसाची पण मर्जी बदललीय, असं म्हणलं तर.
असा अवेळी पाऊस पडणं म्हणजे विनाशाकडे वाटचाल वगैरे सगळं मान्य आहे. पण हा विनाश टाळण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करूया ना... उगाच पावसाला नावं का ठेवायची ? जे आहे त्याचा आनंद घेत घेत... काय असायला हवं याचा विचार करून कृती करूया.
No comments:
Post a Comment