Tuesday, 24 March 2015


ग्रामीण रूग्णालय....



सगळीकडे औषधाचा वास, अस्ताव्यस्त पडलेली औषधं , पेशंटसची खुप गर्दी, त्या गर्दीतले वेगवेगळे वास, वसावसा अंगावर ओरडणारे कर्मचारी, स्वच्छता या गोष्टीचा आनंद.... या वर्णनावरून तुम्हाला कळलच असेल  मी कशाबद्दल बोलतीय.  मी लहानपणी पाहिलेल्या सरकारी दवाखान्याचं हे वर्णन आहे. माझी आई नर्स होती त्यामुळे या वातावरणाचा मी कित्येकदा अनुभव घेतलाय. इतके वर्ष अशा वातावरणात काम करूनही ती इतकी गोड आणि संवेदनशील कशी राहीली हे मोठ कोडच आहे. हे सगळ पाहूनच मी तिला कायम म्हणायची, ''मी कधीच मेडिकल लाईनला जाणार नाही.'' पण ती कायम म्हणायची , ''या पेशाकडे सेवा म्हणून बघितलस ना तर असं म्हणणार नाहीस.'' 
आईच्या या बोलण्याचा प्रत्यय मी परवा घेतला. सध्या स्वाईन फ्लूची जबरदस्त साथ आहे. त्यामुळे साधा ताप, घसादुखी झाली तरी टेन्शन येतं. मी तर घसादुखी आणि तापानी हैराण झाले होते. मला स्वाईन फ्लू झालाय की काय असच वाटायला लागल मला. सुरूवातीला घरगुती उपाय केले. पण बरं वाटेना म्हणून डॉक्टरकडे जाव लागल. स्वाईन फ्लू नव्हता झाला. पण तरीही काळजी घेतलेली बरी म्हणून त्यांनी मला सरकारी दवाखान्यात जायला सांगितलं. कारण स्वाईन फ्लूचं औषध तिथेच मिळतं. 
बापरे... माझ्या अंगावर काटा आला. म्हणलं परत तेच सगळे वास, आरडा ओरडा.. पण मी तिथे गेल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझी आई ज्या सेवाभावी वृत्तीने पेशंटकडे बघायची तीच वृत्ती, तीच काळजी मला तिथे अनुभवायला मिळाली. आईची प्रचंड आठवण आली. शिस्तीत केसपेपर करणे, मग डॉक्टरांनी तपासणे, योग्य ती औषधं , इंजेक्शन्स देणे हे सगळं छान चाललेलं होतं. थोडी गडबड, बेशिस्त होती. पण याला ती यंत्रणा जबाबदार नव्हती. गर्दी नसताना गर्दी करणं ही आपल्या लोकांना लागलेली सवय आहे. बसमध्ये, लोकलमध्ये  चढताना सुध्दा हा अनुभव येतो. उगाच ढकला ढकली.. मुळ मुद्दा हा आहे की त्या सरकारी दवाखान्यात एक वेगळा , आशादायी अनुभव आला. मला स्वाईन फ्लूची शक्यता असल्याने मला स्पेशल ट्रीटमेंट होती. मी लाईनमध्ये उभी होते. पण डॉक्टरांनी मला पुढे यायला सांगितलं.  तिथल्या वाघमारे  डॉक्टरांनी अगदी ठामपणे मला काहीही झालं नाहीये असं सांगितलं. ते म्हणाले, ''सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवा हो. तुम्ही अजिबात अॅंटिबायोटिक्स घेऊ नका. मी देतो त्याच गोळया घ्या. एक इंजेक्शन घ्या. ''
त्यांच ते आश्वासक बोलणं धीर देणारं होतं. लगेच तिथल्या नर्सनी इंजेक्शन दिलं. पुन्हा एकदा आईची आठवण झाली. तिनी इंजेक्शन दिलं की पेशंट म्हणायचे, ''बाई तुमचा हात लई हलका आहे बगा.'' मला पण त्या नर्स बाईंना असच म्हणावसं वाटलं. कारण इंजेक्शन कधी दिलं हे कळल सुध्दा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती औषधं फुकट होती. इंजेक्शनचं अगदी नाममात्र शुल्क होतं.  तिथलं कफ सिरप तर कमाल आहे. सगळयात चांगली गोष्ट तिथले डॉक्टर लोकांशी आपुलकीनी बोलत होते. त्यांचा मोबाईल नंबर सगळ्यांना देत होते. मला काहीही वाटलं तर कधीही कॉल करा असं सांगत होते. औषधं देणारे,  केस पेपर करून देणारे नीट बोलत होते. शंका विचारली तर चिडत नव्हते. उलट थो़डं बरं वाटल्यानंतर त्या डॉक्टरांना फोन न केल्याची कृतघ्नता माझ्याकडूनच झाली. 
हे सगळ शेअर करण्यामागे एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सरकारी यंत्रणेवर विश्वास ठेवायला पाहिजे. सरकारी यंत्रणा चांगल्या आहेत. त्या योग्य पध्दतीनी चालवल्या गेल्या पाहिजेत. सरकारी दवाखान्यात गरीबांनीच जावं. तिथे चांगली ट्रीटमेंट मिळत नाही. हे गैरसमज आहेत.  मला हे मान्य आहे की अगदी प्रायव्हेट इतकी पॉश जागा नसेल तिथे. पण दर आठवड्याला नवीन औषधांचा स्टॉक सरकारी दवाखान्यात येतो. या यंत्रणेत त्रुटी असतीलही. पण थोड्या बदलाने त्या नक्कीच कमी होऊ शकतील. गरज आहे या बदलाची. 
या अनुभवावरून माझं एक मत नक्की झालय. पूर्वग्रह मनात न ठेवता व्यक्ति, संस्था, यंत्रणा यांचा विचार करायला हवा. 

No comments:

Post a Comment