Wednesday, 22 October 2014

मनाचिये गुंती..........



मला माहिती आहे आज दिवाळी आहे. आज वेगळं, फ्रेश काहीतरी लिहावं असं मलासुध्दा वाटत होतं. पण आज पुन्हा एकदा मनातल्या भावनांमध्येच गुरफटून होते दिवसभर. माणसाचं मन अनाकलनीय आहे. एकाच वेळी हजारो विचार करणारं हे मन मला भेटलं पाहिजे. खरं तर मानवी मनाचा अभ्यास करावासा वाटू लागला आहे मला.
एखादा दिवस असा असावा असं मनात आपण डिझाईन आखतो. मात्र फारच वेगळं काहीतरी घडतं. तुम्ही म्हणाल , त्यात काय? आपल्या मनासारखं सगळच कधीच घडत नाही. यस्स ..... अगदी बरोबर. उलट कधी कधी मनात ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर काहीतरी आयुष्यात घडतं. 
पण एक प्रश्न कायम रहातो. आपलं काहीही चुकत नसताना लोक असे विचित्र का वागतात ? असं सांगतात की जी गोष्ट या निसर्गात फिट बसत नाही ती आपोआप नष्ट होते. ज्याअर्थी हा देह या पृथ्वीतलावर आहे, त्याअर्थी यस बॉस आपण फिट बसतो निसर्गात. मी पुन्हा एकदा मानवी स्वभावाकडेच येते. आपण जे बोलतो तसच वागण्याची क्षमता फार कमी लोकांच्यामध्ये आहे. पण हे मान्य करा ना राव. काय प्रॉब्लेम आहे ? उगाच मीच कसा शहाणा..... मीच किती भारी..... माझं मन कसं मोठं. कशाला उगाच ? माझं एक म्हणणं असत नेहमी. आहात तसेच प्रेझेंट व्हा ना. आपण जसे आहोत तसे आवडू शकतो काहींना.  या जगात परिपूर्ण असं काहीच नाहीये तर मग असं वाटण्याची गरज काय ? 
ठराविक वेळी समोरच्या माणसाला एकदम छान म्हणायचं, दुस-या वेळी तो माणूस एकदम निरूपयोगी होतो. बाय बाय म्हणण्याइतका ? असं नसत ना... बर परत लगेच काही दिवसांनी पुन्हा तोच माणूस लई भारी असतो. एकदा काय ते ठरवा यार.
अगदी घरातल्या लोकांचे सुध्दा असे गमतीदार अनुभव येतात. उगाच त्रागा, चिडचिड. त्यापेक्षा स्पष्टपणे सांगून का टाकत नाहीत लोक ? आपण एकदा आपलं मानलं की संपल. जे आहे ते बोलून प्रश्न मिटवता येतात ना. बरं समोरचा माणूसच आहे. परग्रहावरचा कोणी नाही. 
या सगळ्याचं उत्तर गोंदवलेकर महाराज फार छान देतात. ते म्हणतात, प्रारब्ध म्हणजे न समजणा-या गोष्टींचे कारण. आपलं ध्येय ठरवण्याची बुध्दि माणसाला आहे. पण आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रयत्नानी मिळवले नसून प्रारब्धानीच मिळाले आहे. असं मानण्याची क्षमता निर्माण करणं हाच मुद्दा आपल्याला आनंदी  ठेवू शकतो. रस्त्यावर शंभराची नोट पडली आहे. अशा परिस्थितीत ती उचलून घ्यावी असा मोह होणं स्वाभाविक आहे. पण ती उचलून घ्यावी का नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय आनंदी रहाणं हे आहे. मिळणं आणि जाणं या दोन्ही गोष्टी जर आपल्या हातात नाहीत तर नाही त्याचा शोक का करायचा ? 
यस्स...... मिळालं आनंदी रहाण्याचं उत्तर........ सुटला गुंता..........

No comments:

Post a Comment