Monday, 13 October 2014

प्रकाशवाट.........




गेल्या काही दिवसात मनी मानसी काही आलच नाही. म्हणजे बरच काही घडतय आजुबाजुला. पण त्याबद्दल काही लिहावं, काही बोलावं असं नाही वाटलं. अगदी मनाला आनंद देणा-या , त्रास देणा-या अनेक घटना घडल्या. निवडणूका, प्रचार याबद्दल तर काहीच नको बोलायला. निदान आत्ता तरी. या सगळ्याबददल खूप लिहिता येईल.... पण तरीही........... नाही वाटलं लिहावं. 
पण आज नाही थांबवू शकले स्वतःला. खरं तर काल रात्री १२ वाजताच लिहिणार होते. पण नेमका नेट प्रॉब्लेम आला. असो.... माझ्या मनावर प्रचंड कोरला गेलेला एक सिनेमा काल पाहिला. डॉ. प्रकाश बाबा आमटे.... द रियल हिरो. खरच, He is real hero. सिनेमा पाहिल्यापासून आत्तापर्यंत डोकं बधिर झालयं. मला माहिती नाही ही अवस्था अजून किती काळ राहील. काळाच्या ओघात ब-याच गोष्टी casually घेतो आपण. पण हा सिनेमा , म्हणजे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांचं काम डोक्यातून जाईल असं वाटत नाही. या सिनेमातल्या कलाकारांविषयी आणि तंत्राविषयी मी काहीच बोलू इच्छित नाही. कारण हे काही सिनेमाचं परीक्षण नाहीये. कलाकृती छान आहेच. प्रश्नच नाही. पण आमटे दांपंत्याचं काम मनात तळ ठोकून राहिलय. 
उच्चशिक्षित अशा या जोडप्यानी हेमलकसाला केलेलं काम प्रेरणादायी आहेच. पण अंगावर काटा आणणारं आहे. दोन वर्ष हेमलकसाला ते नुसते राहिले. एकही पेशंट नाही, लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. अशा अवस्थेत चिकाटीनं त्यांनी काम केलं. लोकांचा राग झेलून त्यांच्यासाठी सेवेचं व्रत घेतलं. किती पेशन्स ठेवले असतील या दोघांनी. कोणत्याही चांगल्या कामात अडचणी येतातच. हे काम तर अशक्य होतं. पिढ्यानपिढ्या आदिवासींच्या मनावर बिंबलेले विचार पुसून, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणं काही सोप्प आहे ? बरं हा सगळा थॅंकलेस जॉब. यातून काही मिळवायचं आहे ही भावनाच नाही. पेशंटसना बरं वाटतय हेच समाधान. गरजा इतक्या कमी की फक्त दीड हजार रुपये मासिक उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागत होता. 
सिनेमातले सगळे प्रसंग जसेच्या तसे अजून डोळ्यासमोर आहेत. गरीबी, दारिदद्य्र, अज्ञान यांचं साम्राज्य असलेल्या हेमलकसाला या उभयतांनी दुसरं आनंदवन उभं केलं. मला या सिनेमातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, मंदाताई आणि डॉ. प्रकाश यांचं सहजीवन. संसार म्हणजे काय ? हे अगदी परफेक्ट कळलेलं हे जोडपं आहे. एकमेकांवर प्रेम करणं म्हणजे काय ? हे यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. अग्निसमक्ष फेरे घेताना दिलेलं वचन पाळणं म्हणजे काय ? तर ही जोडी. नाहीतर मनाविरूध्द समाजासाठी आपल्या संसाराचं गाडं खेचणारी बरीचशी जोडपी आपण बघतोच की. आपल्या नव-याच्या स्वप्नासाठी त्याच्या मागे सावलीसारखी उभी रहाणारी मंदा मन हेलावून टाकते. अर्थात तिच्या त्यागाची किंमत असणारा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रकाश मनाला भावतोच. 
हा सिनेमा पाहून अनेक जण भारावले जाणार आहेत. माझं इतकच म्हणणं आहे की, नुसते भारावून जाऊ नका. आपण डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा होऊ शकणार नाही. पण आपल्या परीनी काय करू शकू याचा शोध घेऊया. नाहीतर नुसतं भारावून जाऊन काय उपयोग ? सिनेमा पाहिल्यावर हेमलकसा आणि आनंदनवला जाणा-यांची संख्या सुध्दा वाढेल. पण ते काही पर्यटन स्थळ नाही. तिथे त्यांच काम छान चालू आहेच. उगाच त्यांचं कौतुक करायला आणि काम बघायला जाण्याची गरज नाही. तिथे जाऊन गर्दी वाढवण्यापेक्षा , आपण काय करू शकतो हे बघुया. तिथे जायला हरकत नाही. पण एकदा जाऊन आलो, मुलांना सगळं दाखवलं, चला आता आपण मोकळे .... असं नको व्हायला. प्रत्येकाची प्रकाश वाट असतेच. रोजच्या जगण्यापलिकडची.... चला ती शोधूया........ 

No comments:

Post a Comment