Thursday, 30 October 2014

मन का बुध्दि.......



आत्ता खरं तर अजिबात वेळ घालवू नये इतकं काम आहे. पण काय करणार .... काही गोष्टी तुमच्याशी शेअर केल्याशिवाय बर वाटत नाही. गेले दोन दिवस एक विचार डोक्यात घोळतो आहे. तुम्ही पण विचार कराल असाच विषय आहे तो. ''मनाला बुध्दिचा लगाम घालायला हवा'' हाच तो विचार. कारण मनात येईल तसं वागल्यानी ब-याचदा वाट चुकण्याची भीती असते. पण मनातल्या विचारांना बुध्दिच्या तराजूत तोलल्याने बरेच प्रॉब्लेम टळू शकतात. 
आपल्या आयुष्यात कधीही न घडणा-या गोष्टींचं हवेपण आपल्याला असतच. मनही याच गोष्टींकडे धाव घेतं. पण प्रॅक्टिकली , सद्य परिस्थितीमध्ये हे हवेपण आपण कसं मिळवू शकू हे आपल्याला बुध्दिच सांगु शकते. कारण मनाचं तंतर लईच न्यार असतय हो. त्याला काय काहीही हवं असतं. पण आपल्या बुध्दिला विचारायला हवं एकदा तरी, की काय गं बाई , हे सगळ शक्य आहे का ? कदाचित बुध्दि जे उत्तर देईल ते आपल्या मनाविरूध्द असेलही. पण भावना, विचार, संवेदना ताडून बघायला हवं. कारण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा कितीही विचार केला तरी उपयोग होत नाही. त्यापेक्षा निदान आयुष्यातले अति महत्त्वाचे निर्णय घेताना तरी मन आणि बुध्दि दोन्हीचा विचार करायला हवा. काही जण म्हणतील, आपलं मन आपल्याला कधीच फसवू शकत नाही. पण मित्र मेत्रिणींनो या मनाचं काही सांगता येत नाही बर का ..... त्याला हवी असणारी गोष्ट मिळवण्यासाठी ते आपल्याला बिनधास्त सांगत, अरे जा पुढे .... काही नाही होत... जास्तीत जास्त काय होईल? मग काय आपल्याला तेच हवं असत. काही वेळा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. मन आपल्याला चुकीचा निर्णय देतं असं नाही. पण मनाला जरा दोन मिनीट होल्ड करून बुध्दिशी कॉन्टॅक्ट करून  निर्णय घ्यावा. तिनी हिरवा कंदिल दाखवला ना की मग गाडी सोडायला हरकत नाही. त्यानी होणा-या दुर्घटना टळतातच असं नाही . पण निदान आपण नीट विचार करून निर्णय घेतला आहे याचं समाधान तरी मिळत. संत तुकाराम या प्रॅक्टिकली अध्यात्म सांगणा-या संतानी आपल्या अभंगातून हाच विचार मस्त मांडला आहे... 
शुध्‍द करा मन देहातित व्‍हावे । वस्‍तु ती ओळखावें तुका म्‍हणे ॥

Tuesday, 28 October 2014

आधार......




कित्येक वेळा आपल्याला आधाराची गरज वाटते. म्हणजे कोणी कितीही स्ट्रॉंग , सक्षम असलं तरीही. म्हणजे भावनिक आधार ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण कित्येक वेळा नेमक्या अशा वेळीच कोणी नसतं. असं का होतं ? या प्रश्नाचं उत्तरदेखील मिळत नाही. एरवी बोलायला , भेटायला अगदी व्याकूळ असणारी माणसं अचानक गायबच होतात. त्यांच्या जागी त्यांच्या अडचणी कितीही बरोबर असल्या तरी...... वरातीमागून घोडं काय कामाचं ? ......असंच होत खूपदा.
मन मनास उमगत नाही.... आधार कसा शोधावा ...... हे गाणं ... हो....... हीच ती भावना....... स्वप्नातील पदर धुक्याचा..... हातात कसा हो यावा....... आधार कसा शोधावा ...... पण काय करणार ? मनातल्या अनेक भावनांची, प्रश्नांची उत्तरं आपली आपल्यालाच शोधायला लागतात. 
मला ना खूपदा असं वाटतं. जेव्हा जे हवं तेव्हा ते न  मिळणं यालाच जीवन म्हणतात. कारण हवं तेव्हाहवं ते  मिळालं तर कदाचित त्याची मजा निधून जाईल. पण प्रत्येक वेळी नाही बॉस. कधी तरी,  दे साद दे हृदया...... असं होऊ दे की राव. 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं असतं , अरे आमच्या बाबतीत सुध्दा असच होतं. हवं तेव्हा हवं ते मिळतच नाही. हे ऐकून फार बरं वाटलं . म्हणलं चला आपल्याच घरात लाईट नाहीत असं नाहीये. सगळ्या गावाचीच वीज बंद आहे. मग हरकत नाही. कारण माणसाची ही सहज प्रवृत्ती आहे. नगरपालिकेचं पाणी फक्त आपल्याच घरात नसेल तर त्रास होतो. पण आख्ख्या बिल्डींगला पाणी नाही म्हणलं की मग बरं वाटतं.... म्हणजे अहो, टॅंकर वगैरे आणता येतो. तुम्हाला काय वाटतं , 
दुस-याचं दुःख पाहून मला आनंद होतो. नाही हो....तसं नाही. पण निदान काही दुःख तरी कॉमन असावीत म्हणून बोलले. 
आत्ता हे सगळ लिहितानाच एका मैत्रिणीचा अनपेक्षित फोन आला. चक्क आधार वाटला. ती मला खूप मिस करतीय असं ती म्हणाली. अगं काय हे कुठे आहेस तू ? असं म्हणाली. तुझा आवाज ऐकावासा वाटतोय गं... असं म्हणाली. कंटाळा आला असेल तर माझ्याकडे ये गं, असं सुध्दा म्हणाली. 
म्हणजे हे सुध्दा खरं आहे की आधार असतो. फक्त आपल्याला हव्या त्या व्यक्तिने दिला नाही म्हणून आपण उगाच रडतो.  असं वाटत असत की , समोरच्या माणसाला आपली किंमत नाहीये. या विचारानी मन  अस्वस्थ  असतं. पण त्याच वेळी दुसरं कोणीतरी स्ट्रॉंगली आपली आठवण काढत असतं. किंबहुना आपल्याशी बोलायला आतुर असतं. वा ..... हे छान आहे. मग मी मनाला समजावलं.......जो है वो पल जी ले..... 

Wednesday, 22 October 2014

मनाचिये गुंती..........



मला माहिती आहे आज दिवाळी आहे. आज वेगळं, फ्रेश काहीतरी लिहावं असं मलासुध्दा वाटत होतं. पण आज पुन्हा एकदा मनातल्या भावनांमध्येच गुरफटून होते दिवसभर. माणसाचं मन अनाकलनीय आहे. एकाच वेळी हजारो विचार करणारं हे मन मला भेटलं पाहिजे. खरं तर मानवी मनाचा अभ्यास करावासा वाटू लागला आहे मला.
एखादा दिवस असा असावा असं मनात आपण डिझाईन आखतो. मात्र फारच वेगळं काहीतरी घडतं. तुम्ही म्हणाल , त्यात काय? आपल्या मनासारखं सगळच कधीच घडत नाही. यस्स ..... अगदी बरोबर. उलट कधी कधी मनात ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर काहीतरी आयुष्यात घडतं. 
पण एक प्रश्न कायम रहातो. आपलं काहीही चुकत नसताना लोक असे विचित्र का वागतात ? असं सांगतात की जी गोष्ट या निसर्गात फिट बसत नाही ती आपोआप नष्ट होते. ज्याअर्थी हा देह या पृथ्वीतलावर आहे, त्याअर्थी यस बॉस आपण फिट बसतो निसर्गात. मी पुन्हा एकदा मानवी स्वभावाकडेच येते. आपण जे बोलतो तसच वागण्याची क्षमता फार कमी लोकांच्यामध्ये आहे. पण हे मान्य करा ना राव. काय प्रॉब्लेम आहे ? उगाच मीच कसा शहाणा..... मीच किती भारी..... माझं मन कसं मोठं. कशाला उगाच ? माझं एक म्हणणं असत नेहमी. आहात तसेच प्रेझेंट व्हा ना. आपण जसे आहोत तसे आवडू शकतो काहींना.  या जगात परिपूर्ण असं काहीच नाहीये तर मग असं वाटण्याची गरज काय ? 
ठराविक वेळी समोरच्या माणसाला एकदम छान म्हणायचं, दुस-या वेळी तो माणूस एकदम निरूपयोगी होतो. बाय बाय म्हणण्याइतका ? असं नसत ना... बर परत लगेच काही दिवसांनी पुन्हा तोच माणूस लई भारी असतो. एकदा काय ते ठरवा यार.
अगदी घरातल्या लोकांचे सुध्दा असे गमतीदार अनुभव येतात. उगाच त्रागा, चिडचिड. त्यापेक्षा स्पष्टपणे सांगून का टाकत नाहीत लोक ? आपण एकदा आपलं मानलं की संपल. जे आहे ते बोलून प्रश्न मिटवता येतात ना. बरं समोरचा माणूसच आहे. परग्रहावरचा कोणी नाही. 
या सगळ्याचं उत्तर गोंदवलेकर महाराज फार छान देतात. ते म्हणतात, प्रारब्ध म्हणजे न समजणा-या गोष्टींचे कारण. आपलं ध्येय ठरवण्याची बुध्दि माणसाला आहे. पण आपण जे मिळवले आहे ते आपल्या प्रयत्नानी मिळवले नसून प्रारब्धानीच मिळाले आहे. असं मानण्याची क्षमता निर्माण करणं हाच मुद्दा आपल्याला आनंदी  ठेवू शकतो. रस्त्यावर शंभराची नोट पडली आहे. अशा परिस्थितीत ती उचलून घ्यावी असा मोह होणं स्वाभाविक आहे. पण ती उचलून घ्यावी का नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचं ध्येय आनंदी रहाणं हे आहे. मिळणं आणि जाणं या दोन्ही गोष्टी जर आपल्या हातात नाहीत तर नाही त्याचा शोक का करायचा ? 
यस्स...... मिळालं आनंदी रहाण्याचं उत्तर........ सुटला गुंता..........

Wednesday, 15 October 2014

मतदार राणी........


आज सगळीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय. छान वातावरण आहे सगळीकडे. टी. व्हि चॅनेल्सवर बातम्यांचा भडिमार चालू आहे. सकाळी सकाळी पहिल्यांदा वोटिंग कोणी केलं हे सांगणारे फोटो व्हॉटस अॅपवर पडतायत. एकदंरच सोशल मिडियामुळे निवडणूकसुध्दा इव्हेंट झालीय. 
कोण निवडून येईल, कोणाची सत्ता येईल हे लवकरच कळेल. पण मला आज खूप वेगळा अनुभव आला. आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडणा-या कोणत्याही वेळी जी भावना मनात असते ना तीच आज होती. म्हणजे हे माझं पहिलं मतदान नव्हतं , तरीही..........
म्हणजे कॉलेजमधला पहिला दिवस, जत्रेतल्या चक्रात बसतानाचा क्षण, गाडी शिकल्यानंतर पहिल्यांदा घेतलेली राईड, दाखवण्याचे म्हणजे चहा पोह्याचे कार्यक्रम, माझ्या पिल्लाचा जन्म, आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा केलेली उद्घोषणा, कलापिनीच्या स्टेजवर केलेलं पहिलं निवेदन , अनुपम खेर यांच्यासारख्या दिग्गजानी केलेलं कौतुक ...... या आणि अशा ब-याच प्रसंगी पोटात येणारा गोळा आज सुध्दा आला. हे सगळे प्रसंग चांगलेच होते. त्यामुळे आज पोटात आलेला गोळा भीतीचा नाही तर उत्सुकतेचा होता. 
आज मतदान करायला गेल्यावर मी आजच्या सिनेमाची म्हणजे १५ ऑक्टोबर या दिवसाच्या सिनेमाची हिरॉईन आहे की काय असं फिलींग येत होतं. खरं म्हणजे आपल्याकडे कोणी बघत नसत. पण उगाच असं वाटत होतं की यस्स... सगळे आपल्याकडेच बघतायत. म्हणजे मतदाराला मतदार राजा म्हणतात ना, तशी मी आज मतदार राणी झाले होते. एखादा सिनेमा पाहून बाहेर पडलं की त्या सिनेमाची हिरॉईन मीच आहे की काय असं उगाच वाटत. तुम्हाला वाटत का नाही मला माहिती नाही. किंवा मुलांना मीच हिरो आहे असं वाटतं. तस आज वाटत होतं. मतदान केंद्रात जाताना अगदी गर्वानी मान ताठ झाली होती. बोटावर असलेली शाई पुसली जाऊ नये म्हणून नंतर कितीतरी वेळ बोट अगाच उभं राहिलं होतं. मी तर अगदी फुंकर मारून मारून शाई सुकवली.
निवडणूक आणि मतदान हे काही नवीन नाहीये खरं तर. पण का कोणास ठाऊक गेल्या काही महिन्यांमध्ये मतदान करण्याचा खरा उद्देश समजलाय असं वाटतं. आपल्या मताला किती किंमत आहे हे समजल्यासारखं वाटतयं. मतदान केंद्रावर लागलेल्या रांगा हेच तर सांगतात. सत्ता कोणाची येईल माहिती नाही. पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न करूया. जर ही लोकांनी, लोकांसाठी, आणि लोकांकरवी निवडलेली कार्यपध्दती आहे तर ती तशी जाणवूदे. सरकार करेल काय ते, आपल्याला काय करायचय ? अशी बघ्याची भूमिका सोडायला हवी. सक्रियपणे आपापल्या परीने काय करता येईल ते केलं पाहिजे. कोणताही एक माणूस चमत्कार घडवून सगळ बदलू शकणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं तर उन्नतीकडे वाटचाल अशक्य नाही. 
मतदार राजा किंवा राणी म्हणून आलेला हा फील कायम टिकवूया.... आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श लोकशाही प्रणाली जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेऊया.... 

Monday, 13 October 2014

प्रकाशवाट.........




गेल्या काही दिवसात मनी मानसी काही आलच नाही. म्हणजे बरच काही घडतय आजुबाजुला. पण त्याबद्दल काही लिहावं, काही बोलावं असं नाही वाटलं. अगदी मनाला आनंद देणा-या , त्रास देणा-या अनेक घटना घडल्या. निवडणूका, प्रचार याबद्दल तर काहीच नको बोलायला. निदान आत्ता तरी. या सगळ्याबददल खूप लिहिता येईल.... पण तरीही........... नाही वाटलं लिहावं. 
पण आज नाही थांबवू शकले स्वतःला. खरं तर काल रात्री १२ वाजताच लिहिणार होते. पण नेमका नेट प्रॉब्लेम आला. असो.... माझ्या मनावर प्रचंड कोरला गेलेला एक सिनेमा काल पाहिला. डॉ. प्रकाश बाबा आमटे.... द रियल हिरो. खरच, He is real hero. सिनेमा पाहिल्यापासून आत्तापर्यंत डोकं बधिर झालयं. मला माहिती नाही ही अवस्था अजून किती काळ राहील. काळाच्या ओघात ब-याच गोष्टी casually घेतो आपण. पण हा सिनेमा , म्हणजे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा यांचं काम डोक्यातून जाईल असं वाटत नाही. या सिनेमातल्या कलाकारांविषयी आणि तंत्राविषयी मी काहीच बोलू इच्छित नाही. कारण हे काही सिनेमाचं परीक्षण नाहीये. कलाकृती छान आहेच. प्रश्नच नाही. पण आमटे दांपंत्याचं काम मनात तळ ठोकून राहिलय. 
उच्चशिक्षित अशा या जोडप्यानी हेमलकसाला केलेलं काम प्रेरणादायी आहेच. पण अंगावर काटा आणणारं आहे. दोन वर्ष हेमलकसाला ते नुसते राहिले. एकही पेशंट नाही, लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. अशा अवस्थेत चिकाटीनं त्यांनी काम केलं. लोकांचा राग झेलून त्यांच्यासाठी सेवेचं व्रत घेतलं. किती पेशन्स ठेवले असतील या दोघांनी. कोणत्याही चांगल्या कामात अडचणी येतातच. हे काम तर अशक्य होतं. पिढ्यानपिढ्या आदिवासींच्या मनावर बिंबलेले विचार पुसून, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवणं काही सोप्प आहे ? बरं हा सगळा थॅंकलेस जॉब. यातून काही मिळवायचं आहे ही भावनाच नाही. पेशंटसना बरं वाटतय हेच समाधान. गरजा इतक्या कमी की फक्त दीड हजार रुपये मासिक उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागत होता. 
सिनेमातले सगळे प्रसंग जसेच्या तसे अजून डोळ्यासमोर आहेत. गरीबी, दारिदद्य्र, अज्ञान यांचं साम्राज्य असलेल्या हेमलकसाला या उभयतांनी दुसरं आनंदवन उभं केलं. मला या सिनेमातली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, मंदाताई आणि डॉ. प्रकाश यांचं सहजीवन. संसार म्हणजे काय ? हे अगदी परफेक्ट कळलेलं हे जोडपं आहे. एकमेकांवर प्रेम करणं म्हणजे काय ? हे यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. अग्निसमक्ष फेरे घेताना दिलेलं वचन पाळणं म्हणजे काय ? तर ही जोडी. नाहीतर मनाविरूध्द समाजासाठी आपल्या संसाराचं गाडं खेचणारी बरीचशी जोडपी आपण बघतोच की. आपल्या नव-याच्या स्वप्नासाठी त्याच्या मागे सावलीसारखी उभी रहाणारी मंदा मन हेलावून टाकते. अर्थात तिच्या त्यागाची किंमत असणारा आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रकाश मनाला भावतोच. 
हा सिनेमा पाहून अनेक जण भारावले जाणार आहेत. माझं इतकच म्हणणं आहे की, नुसते भारावून जाऊ नका. आपण डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा होऊ शकणार नाही. पण आपल्या परीनी काय करू शकू याचा शोध घेऊया. नाहीतर नुसतं भारावून जाऊन काय उपयोग ? सिनेमा पाहिल्यावर हेमलकसा आणि आनंदनवला जाणा-यांची संख्या सुध्दा वाढेल. पण ते काही पर्यटन स्थळ नाही. तिथे त्यांच काम छान चालू आहेच. उगाच त्यांचं कौतुक करायला आणि काम बघायला जाण्याची गरज नाही. तिथे जाऊन गर्दी वाढवण्यापेक्षा , आपण काय करू शकतो हे बघुया. तिथे जायला हरकत नाही. पण एकदा जाऊन आलो, मुलांना सगळं दाखवलं, चला आता आपण मोकळे .... असं नको व्हायला. प्रत्येकाची प्रकाश वाट असतेच. रोजच्या जगण्यापलिकडची.... चला ती शोधूया........ 

Wednesday, 1 October 2014



मन मनास उमगत नाही...........



माणसाच्या मनाचा थांग लागणं फार अवघड असतं नाही का ? मन, प्रेम, पाऊस हे माझे आवडते विषय. कारण हे तीनही विषय आपल्या आतल्या भावनांना जागृत करतात. त्यातल्या त्यात 'मन' हा विषय खूप गुंतागुंतीचा. आपल्याच मनात चाललेल्या विचारांचा थांग लागत नाही. कित्येक वेळा आपण आनंदी असल्यासारख वाटतं पण तसं नसतच ते. मनातल्या या सगळ्या भावना क्षणभंगुर असतात. एखाद्याचा आपल्याला प्रचंड राग आला असेल तर तो तसाच टिकून रहात नाही. निदान माझ्या मनात तरी रहात नाही. तेवढ्यापुरता मात्र ज्वालामुखीच असतो तो. 
कित्येक वेळा आदल्या दिवशी झालेलं कडाक्याचं भांडण का झालं ? हेच आठवत नाही. देवाने ही चांगली सिस्टिम बनवली आहे. सगळच लक्षात राहिलं तर जगण अवघड होईल. वाईट आठवणींमध्ये सुध्दा चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तरच  जीवन सोप होईल. कारण ते वाईट आठवून मनस्तापाखेरीज काहीच मिळत नाही. आपल्यातली नकारात्मकता वाढते. बरं ज्या व्यक्तिशी हे सगळं जोडलेलं असतं, ती मजेत असते, सगळ्या चुकांचं खापर आपल्या माथी फोडून. ज्यानी त्यानी फक्त चूक कबुल केली तरी बरेच प्रश्न सुटतील. पण माझं काहीच चुकलं नाही . असा दावा करणा-यांबद्दल काय बोलणार ?
काहीही कारण नसताना मन उदास होतं. कित्येकदा हा अनुभव येतो. उगाच मन हळवं होतं. कातर होतं. आजुबाजुच्या सगळ्या गोष्टी भकास वाटू लागतात. काहीही केलं तरी मन रमत नाही. त्यातून जर अशा वेळी एकटेपणा वाट्याला आला तर काही खरं नाही. आपल्या आजुबाजुची लोकं तितकी सुज्ञ नसतात. त्यांना काहीच कळत नाही. अशा वेळी एरवी कधीही न चिडणारे आपण का चिडलो असू हेच त्यांना कळत नाही. अशा वेळी फार बडबड करणा-यांचाही त्रास होतो आणि गप्प रहाणा-यांचा तर खूप राग येतो. आपल्या मूडचा विचार कोणीतरी करावा असं वाटतं. पण माणसांवर असलेलं अवलंबन निराशा  देतं. 
काय बरं कराव? ध्येय ठरवावं . प्रत्येकाच्या आयुष्याला ते असतच. आपल्या मनाला पटेल तेच करावं. मायेचा ओलावा मिळाला तर मनापासून त्याचा आस्वाद घ्यावा. मनातली निराशा दूर करण्यासाठी बाहरेच्या कोणाचीही मदत घेण्यात अर्थ नाही. आपलं मनच आपल्याला आधार देतं. स्वच्छ , मोकळं जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे निराशेच्या क्षणी मनाचे फाजील लाड न करता, जीवनाच्या ध्येयाचा विचार करावा. कारण ते ध्येयच पुन्हा उभं रहाण्याची उमेद देतं.