Thursday, 22 November 2018


संपल भांडण......



सुरेश वाडकरांची एक खूप छान गझल आज ऐकली,
सीने में जलन, आँखों में तूफ़ान सा क्यों है
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है.....
क्या कोई नयी बात नज़र आती है हममें
आईना हमें देख के हैरान सा क्यों है
मन हेलावून टाकतील असे सुन्दर शब्द आहेत हे. आपण सगळे या Phase मधून जात असतो. कधी कधी सगळं बरोबर चालू आहे असं वाटत असताना एक वेगळीच बेचैनी येते मनात. आणि जेव्हा मन बेचैन होतं तेव्हा सगळ बिघडून जात. वर वर सगळ अलबेल आहे असं वाटत असतं पण रोज एक काही तरी असं घडतं ज्यामुळे सगळं नकोसं होतं. मन पुन्हा उभारी घेतं.
आपलं आपलं असं वाटणार जर काहीच आपलं नाही, मग ते रोज नव्यानी आपलं का वाटतं? मन मोकळ करावं अशी जागा काल्पनिक असावी का? म्हणजे काय चूक आणि काय बरोबर याचं पुन्हा पुन्हा विच्छेदन होणार नाही. कारण झालेल्या चुका आपणच केलेल्या असल्या तरी सतत तुझं हे चुकलच हे ऐकायचा कंटाळा येतो. चुकल ना सांगितलं, कबूल केलं, झालेल्या चुकांची आठवण का द्यायची असते सतत? आणि बाहेरच्या लोकांकडून अपेक्षाच नाही. ज्यांना आपलं समजतो त्यांनीही समजून घेऊ नये असं का?
माझ्या सारख्या स्वभावाची माणस जितक्या लवकर अगदी क्षुल्लक कारणांनी आनंदी होतात, तितकीची फालतू कारणांनी कोशात जातात. हक्काच्या आणि आपल्या वाटणाऱ्या लोकांसोबत भांडतात, तितकच प्रेम करतात. समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि अशी अपेक्षा ठेवतात की त्यांनी ही समजून घ्यावं. मग कधी तरी समजूतदारपणा हा आपला दोष ठरावा अशी तोंडावर पडतात. Extreme हा शब्द आम्हाला एकदम सूट होतो. म्हणूनच ज्यांच्यावर सर्वात जास्त जीव लावलेला असतो त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. पण इथे प्रत्येकाला स्वत:च पडलेलं असतं. सगळ्यांना आपल्या वागण्याची Clean chit हवी असते. “मी असं बोलले किंवा बोललो पण मला असं म्हणायचं नव्हत असे dialogue ऐकवले जातात.” मग वाटत का करायचं भांडण, ते ही अशा लोकांशी ज्यांना Clean chit हवी आहे. ठीक आहे ... दिली..... नाही चुकलं तुमच काही, माझच चुकल.... संपल भांडण......

                                                                                                                           डॉ. विनया केसकर 

Wednesday, 12 September 2018


युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा.....



प्रेमाची गरज नाही असा जीव पृथ्वी वर असणं जरा दुर्मिळच नाही? पण तरी आपण म्हणजे समाज प्रेमाला विरोध करतोच. स्वधर्मीय, स्वजातीय प्रेम चालतं. लग्नाआधी केलेलं प्रेम allowed आहे. आजही प्रेम करण्यासाठी जात, धर्म, पंथ, वय, single असणं आणि gender याचा विचार केला जातोच. जग खूप पुढे गेलंय असं आपण म्हणतो. काही बाबतीत हे मान्य करता येईलही. पण आजही समाजात प्रेम या सहज सुंदर भावनेवर खूप बंधन आहेत. निरपेक्ष, जीवापाड प्रेम हे शब्द पुस्तकात वाचायला छान वाटतात. प्रत्यक्षात असं फार दुर्मिळ झालंय.
एरवी प्रेमावर भरभरून लिहिणारी मी आज अक्षरशः स्तब्ध झाले. खऱ्या प्रेमाची एक खूप छान आणि खरी गोष्ट वाचली. शर्मिला या माझ्या पत्रकार मैत्रिणीनी एक लेख share केला होता, माधुरी सरोदे आणि जय शर्मा यांच्या प्रेम कहाणीचा. तुम्ही म्हणाल त्यात काय मग इतकं स्तब्ध होण्यासारखं? normal प्रेम कहाणीपेक्षा एक वेगळी गोष्ट या दोघांच्या बाबतीत आहे. माधुरी तृतीयपंथी आहे. Transgender, TG, तृतीयपंथी हे सगळं सिनेमात आणि फार तर ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण पाहतो. आपल्यापैकी किती लोकांना या सगळ्यांच्या भावना, मन आणि जीवन माहिती असतं... घरातल्या आणि अगदी जवळच्या मित्र मैत्रिणींना समजून घ्यायला आपल्याला वेळ नाही, इच्छा नाही. असं एक वेगळ जीवन जगणाऱ्या लोकांशी आपला काय संबंध? संधी मिळेल तेव्हा टिंगल करण्याशिवाय, घाबरण्याशिवाय आणि विचित्रपणे बघण्याशिवाय काय करतो आपण? जाती-धर्मा बद्दल बोलताना आपण बोलतो, आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत. मग हे TG त्याचीच लेकरं आहेत ना?
माधुरी आणि जय यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेम कहाणीला सत्यात उतरवलं. अगदी normal लग्न होतात तस त्याचं लग्न झालं. आंतरजातीय विवाह केला तर त्याचे पडसाद किती तरी काळ भोगावे लागतात. मग या जोडप्याला समाजाचा किती विरोध पत्करावा लागला असेल. TG सोबत live in मध्ये राहणं किंवा वासना पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करणं हे अगदी common आहे. पण TG वर मनापासून प्रेम करणं आणि ते निभावणं हे किती वेगळ आहे. आपल्यावर प्रचंड प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा, सन्मानानी वागवणारा नवरा जय च्या रुपात माधुरीला मिळाला आणि स्वत:ला विसरून प्रेम देणारी, जोडीदारासाठी वाट्टेल ते करणारी आणि त्याच्या घराला आपलं म्हणणारी माधुरी जयला मिळाली. त्यांच्याविषयी वाचताना, you tube वर त्यांचे videos पाहताना कुठेही काहीही odd वाटलं नाही.
युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा, सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा.... हे गाण ते दोघ जगतायत. आपल्याला हवं तसं वागण्यासाठी जी किंमत द्यावी लागते आहे, ती हे दोघं आनंदानी आणि एकमेकांच्या साथीनी देत आहेत. प्रत्येक जीवाला प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे. हे पुस्तकी वाक्य जगून दाखवत आहेत. जय म्हणतो, “नवरा म्हणून जी कर्तव्य असतात ती सगळी मी पार पाडेन आणि माधुरीला सुखी ठेवेन.” तर माधुरी म्हणते, “जयच्या सुखात माझं सुख मानेन. TG लोकांना स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार कोर्टानी दिला आहे. पण सामान्य स्त्री सारखं लग्न व्हाव आणि संसार करावा हा अधिकार अजूनही मिळाला नाही. त्यामुळे marriage certificate मिळवून मुल दत्तक घेणं ही लढाई अजून बाकी आहेच.”
प्रेमात अहंकार, मी पणा, अपेक्षा गळून जाव्यात आणि आपल्या जोडीदाराच्या सुखात आपलं सुख मानावं हे फिल्मी संवाद जगणाऱ्या जय आणि माधुरीला प्रेमभरा सलाम...... 

                                              डॉ. विनया केसकर         

Monday, 3 September 2018


भीती .....


परवा बस स्टॉपवर एक खूप मस्त गम्मत बघायला मिळाली. एक छोटीशी मुलगी दिसली. फार तर बालवाडीत जात असेल. पाठीवर दप्तराच ओझं. दोन शेंड्या बांधलेल्या. अगदी छान तयार झाली होती ती. आजोबांचा हात धरून रस्ता क्रॉस करत होती. इतक्या गाड्या येत होत्या पण ती घाबरली नाही. अगदी धीटपणे आजोबांचा हात धरून, उलट त्यांनाच आधार देत देत तिनी रस्ता क्रॉस केला. पुढे बस स्टॉपवर आल्यावर रस्त्याच्या कडेला एक कुत्रा बसला होता. खरं तर तो तिला काहीही करत नव्हता. पण ती खूप घाबरली होती. धीटपणे रस्ता ओलांडणारी ती चिमुकली घाबरून गेली होती. तिच्या आजोबांना कळतच नव्हतं की हे काय चालू आहे? आपली नात हात सोडून उलट्या बाजूला का पळतीय? ती मात्र त्या कुत्र्याला  टाळून व्यवस्थित पुढे आली... हा सगळा प्रकार बघताना माझ्या मनात एका अनावर पण स्वाभाविक भावनेचा विचार आला. ती म्हणजे... भीती.
अगदी रोजच्या आयुष्यात बघितलं तर आपल्या लक्षात येतं की, भीतीनी आपल्याला किती ग्रासलेलं असतं नाही? किती तरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध भीतीपोटी आपण करतो. काही वेळा देवाधर्माचं करतो ते ही भीतीपोटी. मी असं केलं नाही तर माझ्या आयुष्यात काही अडचण तर येणार नाही? या भीतीनी. कित्येकदा कृती करायची म्हणून केली जाते.
नाती जपताना देखील आपण भीतीपोटी काही वेळा मनाविरुद्ध वागतो. कधी समाजाची भीती, तर कधी स्वत:ची. समाजाची वाटणारी भीती यावर मात करता येऊ शकते. पण स्वतःला वाटणाऱ्या भीतीवर मात कशी करायची? नाती तुटू नयेत, काही प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून मनात नसताना भीतीपोटी मनाविरुद्ध वागावं लागतं. कारण मनासारखं वागून आपण आपल्याबरोबर अनेकांची फरपट करू ही भीती. काय करणार? सगळ्यांनाच मनस्वी वागणं शक्य नसत ना? मनासारखं वागण्याची भीती.. न वागण्याचा त्रास. या सगळ्यात मनाची होणारी घालमेल..
एक गाणं सारखं मनात रुंजी घालत होतं..
भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...      


Tuesday, 14 August 2018


हाय हा हळवेपणा....



परवा एक खूप छान वाक्य ऐकलं. आपला हळवेपणा आपली ताकद बनायला हवा, कमजोरी नाही. माझ्यासारख्या हळव्या माणसांच्या डोळ्यात अंजन घालावं असं हे वाक्य आहे. कारण बऱ्याचदा हळवी माणसं फक्त भावनेपोटी निर्णय घेतात. मग या निर्णयामुळे नुकसान होतंय हेदेखील लक्षात येत नाही.
संवेदनशील असणं गरजेचं आहेच. कारण एक माणूस म्हणून जगताना संवेदनशीलता नसेल तर माणसात आणि प्राण्यात फरक तो काय राहिला...फक्त काय होतं.. संवेदनशील माणसांना व्यवहार जमत नाही. वाहात जाणे हा एक दुर्गुण असतो त्यांच्यामध्ये. कोणतही काम, व्यक्ती अगर विचार असो... त्यामागे वाहात जातात अशी माणसं. वेळ पडली तर स्वत:चा सुद्धा विचार करत नाहीत. ही समर्पित वृत्ती चांगली. पण सगळ्याच बाबतीत नाही. आपलं जगणं कठीण होऊन बसेल असं समर्पण कदाचित अडचणीत आणू शकतं. दानदेखील सत्पात्री असावं असं म्हणतात. मग संपूर्ण आयुष्य खर्ची घालताना विचार करायलाच हवा.
मन आणि बुद्धि या दोन्हीचा वापर करून निर्णय घेता येणं खूप आवश्यक आहे. हे बोलणं आणि लिहिणं खूप सोप आहे. पण तसं वागणं तितकंच अवघड. मन आणि त्याची ताकद याचा अनुभव आपण पूर्णपणे घेतच नाही. आपल्याला हवं असणारं चांगलं आणि नको असणारं वाईट. इतकी साधी व्याख्या करून चांगलं काय ते मिळवण्यासाठी धडपड सुरु होते. काही वेळा अशा परिस्थितीमध्ये हळवी माणसं अडचणीत येतात. आणि गम्मत म्हणजे हे जे चांगलं असं वाटत ते फक्त स्वत:साठी असतं असं नाही. naturally अपेक्षा वाढतात. अर्थात अपेक्षाभंग होतो आणि मग दु:ख वाट्याला येत. या सगळ्यातून हळवी माणसं खूप नाराज होतात आणि चांगुलपणावरचा विश्वास उडतो.
संवेदनशील, हळवं असणं चांगलं. फक्त आपलं आणि आपल्यामुळे नकळत दुसऱ्याच नुकसान होत नाहीये ना याचा विचार आवश्यक आहे.   

Sunday, 1 July 2018


अवस्था मनाची....


परिस्थिती  मुळे बदलणारं मन हा नेहमीच कुतूहलाचा विषय वाटतो मला. कारण एका क्षणात 
बदलणाऱ्या या मनाला म्हणाव तरी काय? कधी कधी परिस्थितीमुळे मन अगदी बोथट होतं तर कधी कधी जास्त संवेदनशील. कधी कधी तर बोथटपणा आणि संवेदनशीलता या दोन्हीचा काहूर अनुभवतं हे बिचारं मन.
आपण जसे नाही तसे वागतो अशा परिस्थितीत. एखादी व्यक्ती, परिस्थिती, काळ तर कधी आपण स्वत:जबाबदार असतो या सगळ्याला. सगळं छान मनासारखं चालू आहे असं असलं तरी हे काहूर जाणवतचं. एकसारखे किती अनुभव घेतो आपण. तरी पुढच्या वेळी, तशाच परिस्थितीत शहाणपणा सुचत नाही. वेळ निघून जाते, सगळं अगदी normal होतं. पण मनावर राहिलेल्या खुणा बराच काळ तशाच राहतात.
आकाशात दाटलेल्या मेघांप्रमाणे या सगळ्या भावनांचा कल्लोळ. हे मेघ धड बरसत नाहीत आणि वाऱ्याने निघूनही जात नाहीत. नुसता कोंडमारा. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक असतानाही त्या मार्गावर जाता येत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये मन रमत नाही. रेडीओवर गाणी सुद्धा काय लागतात.... मेरा वो समान लौटा दो, यारा सिली सिली, जिंदगीमें जब तुम्हारे गम नही थे...
मनाची घालमेल गाण्यांमधून ऐकताना नकळत डोळे पाणावतात, कोणासाठी? का? कळत नाही. या काहुरामधून सुटका होईल का? असा विचार मनात येतो. पण सुटकेलाही मन घाबरते...
पण परिस्थिती तशीच राहत नाही. काहीही न करता थोडा वेळ गेला की बऱ्यापैकी छान वाटायला लागतं. गाणीही बदलतात... हर घडी बदल रही है, दिल चीज क्या है, देखलो आज हम को जीभरके... मस्त चहाच्या घोट घेत घेत आलेली मरगळ घालवून मनात हे गाण रुंजी घालत... “एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी”.....   

Thursday, 7 June 2018


नेहमी आनंदी रहा...




आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हणतात. सुख सुध्दा  क्षणभंगुर  आणि दुःख सुध्दा. म्हणजे काय झालं... काल एका पुस्तकात मी वाचलं की, सुख मिळवण्याच्या आपल्या सगळ्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणजे एकच वस्तू एकाला  सुखस्वरूप तर,     दुस-याला दुःखस्वरूप वाटते. हे वाचून मी एकदम विचार करायला लागले. म्हणजे, सगळा गोंधऴच आहे म्हणायचा.पण नीट विचार केल्यावर जाणवलं,  हे सगळ अगदी खरं आहे. कारण असे अनुभव आपण सगळे सुध्दा घेतोच की. पण हे सगळ मान्य करणं थोड जड जातं. कारण आपल्याला आपलं दुःख मोठ वाटत. पण आपल्याला दुःख मिळाल्याने कोणाला तरी आनंद झालाय, किंवा सुख मिळालय अशी कल्पना आपण कधी करतो का ?
 अगदी साधी गोष्ट .... बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही तर आपली किती चिडचिड होते. पण जेव्हा आपण निवांत हेडफोन कानात घालून , गाणी ऐकत बसलेले असतो, तेव्हा उभ्या असणा-या माणसांकडे आपण बघून न बघितल्यासारख करतोच ना. हे सगळं खूप नॅचरल आहे. कारण प्रत्येक वेळी उठून जागा देणं शक्य नसत. दर वेळी मीच का ?  असे प्रश्न पडू शकतात. पण हाच प्रश्न जेव्हा आपण उभे असतो, तेव्हा बसलेल्याला पडत असेल ना ? आपल्याला मिळणा-या सुख दुःखाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे सुख मिळाल्यावर आनंद होणं आणि दुःख  झाल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण फक्त त्या सगळ्याचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवायला हवं. नाहीतर एखाद्याने ठरवल्याप्रमाणे फोन न केल्यानी किंवा भेटायला न आल्यानी प्रचंड डिप्रेशन यायचं कारण नाही. थोडसं लेट गो करायला शिकलं पाहिजे. कल्पना करून त्याचं सुख, दुःख बाळगणं चूक आहे. कारण कल्पनेचं खरे खोटेपण अनुभवांती कळतं. एखादी आनंद देणारी वस्तू, व्यक्ति कायम तशीच रहाते का ? तर नाही. कारण अमुक एक वस्तू किंवा व्यक्ति आपल्याजवळ आहे , म्हणून आपण सुखी आहोत. ही संकल्पना बदलायला हवी. शाश्वत आणि स्थिर असं काहीच नसलं तरी जीवनातला आनंद शोधला पाहिजे. कारण आपण इथे आनंदी रहायलाच आलोत. हो ना ? 

थोडं समजून घे ना यार मला... 


थोडं समजून घे ना यार मला... अगदी सगळ्या नात्यांमध्ये नेहमी वापरलं जाणारं हे वाक्य आहे. मित्र - मैत्रिणी, नवरा – बायको, आई – मुलं, ऑफिस मधले सहकारी - बॉस, कुटुंबीय किंवा अगदी देवाला सुद्धा आपण सगळे असं म्हणतो.
काय असतं हे समजून घेणं. आपल्या मनासारखं समोरच्यानी वागणं म्हणजे समजून घेणं का? पण अगदी आपल्या मनासारखं सगळं चालू असलं तरी समजून घेतलं जातंच असं सांगता येत नाही. कारण या मनात नेमकं काय चालू आहे हे त्या – त्या व्यक्तीला तरी कळत का? एका क्षणापूर्वी आनंदानी बागडणारं मन दुसऱ्याच क्षणी निराशेच्या गर्तेत जातं. या दोन क्षणांमधल्या अंतरात काही तरी असं घडतं जिथे समजून घेण्याची नितांत गरज असते. मग ते समजून घेणं आपल्या मनासारखं वागणं असतं असं नाही. कारण प्रत्येक वेळी आपल्याला जे वाटतं ते योग्यच असतं असं नाही. त्यावेळी हवा असतो एक मानसिक आधार, ‘ठीक आहे यार... बोलू नंतर’ असं म्हणणारा.
कारण तो क्षण निघून गेल्यावर कळत आपलं आपल्याला. पण तेव्हा कोणी स्वत:च (कितीही खरं असलं तरी) घोडं दामटायला लागलं की मग त्रास होतो. Actually आपल्याला खरं समजून घेणारे लोक असं वागत नाहीत. पण खरच, आपल्याला कोणी समजून घेत का? बऱ्याचदा या एका क्षणाच्या आतीतायीपणामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात. अर्थात या सगळ्या गोष्टी आपल्यालाही लागू आहेतच.
बरेचसे छोटे – मोठे वाद या एका क्षणाच्या समजून घेतल्यानी टळू शकतात. कारण वादामुळे कटुतेशिवाय काहीही मिळत नाही. रागाच्या भरात जे बोलू नये ते बोललं जातं, मनं दुखावली जातात. मनात चाललेली विचारांची वादळं जास्तंच घोंघावू लागतात. काही वेळा ही वादळं छोटं नुकसान घडवतात तर काही वेळा माणूस म्हणून संपवतात. हे सगळं टाळता येईल का?  मान्य आहे की प्रत्येक वेळी हे समजून घेणं शक्य नाही. पण थोडा विचार करून समजून घ्यायला काय हरकत आहे?        



Monday, 14 May 2018


नातं घट्ट करणारी..स्पेस


नातं कितीही घट्ट असलं तरी प्रत्येक व्यक्तीला आपापली स्पेस हवी असते. काही काळापूर्वी स्पेस हा प्रकार फॅड वाटत होता. अगदी मला सुद्धा. पण आजूबाजूची गर्दी वाढत गेली तसं जाणवलं की, स्वत:चा वेळ मिळत नाहीये. स्वत:शी संवाद होत नाहीये. कुठेतरी खूप काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटत होतं. पण नेमकं काय? सगळं अगदी मनासारखं असताना सुद्धा रितेपणा का जाणवतो? नीट विचार केल्यावर मला जाणवलं की, स्वत:ला वेळ देणं ही गोष्ट missing आहे.
एरवी एकटेपणाला घाबरणारे आपण एकटेपणा हवा असा वाटू लागतं. घरी, बाहेर, कामाच्या ठिकाणी सगळीकडे गर्दी. रस्त्यानी निघालं तर कोणी ना कोणी ओळखीचं भेटतचं. कधी कधी याचाही वैताग येतो. जेव्हा असं वाटतं असतं की कोणी ओळखीचं भेटू नये तेव्हा नेमकी खूप लोक रस्त्यात दिसतात आणि विचारतात, काय आज एकदम निवांत? आणि गाडी नाही का आज, चक्क चालत? अशा वेळी असं वाटत, please यार थोडी स्पेस द्या ना.
लोकलमध्येही कित्येकदा असं होत की असं वाटत नेहमीच्या लोकलच्या डब्यात न बसता वेगळ्या ठिकाणी बसावं म्हणजे ओळखीच कोणी भेटणार नाही आणि शांतपणे डोळे मिटून बसता येईल. पण नेमकं तेव्हाच बऱ्याच महिन्यांनी भेटणारी मैत्रीण सगळी स्पेस व्यापून टाकते.
कामाच्या ठिकाणीही नेमकं जेव्हा असं वाटतं की आज शांतपणे बसावं तेव्हा अचानक नको ती टार्गेट्स उपटतात. लक्ष देऊन मनापासून (मनाविरुद्ध) काम करावं लागतं. असं काम केल्याची acting करता येत नाही. स्वतःसाठी जो वेळ देण्याचं निश्चित केलेलं असतं त्या वेळात काम करावं लागल्यानी मनातल्या मनात झालेली चिडचिड गिळण्यापलीकडे काही नसतं.
का हवी असते ही स्पेस? शांत व्हायला... स्वत:शी संवाद साधायला... कारण so called प्रेमळ माणसांमध्ये ही काही वेळा जीव गुदमरतो. हे सगळं का होतं? हे नाही कळतं. अपेक्षा एकच असते, निदान जवळचे असे आपण ज्यांना समजतो त्यांनी तरी समजून घ्यावं. ही स्पेस कायम हवी असते असं नाही. किंबहुना मनाची ही अवस्था अगदी थोडा वेळ टिकते. पण तेवढा वेळ हवा असतो. संगीतात सुद्धा ताल देताना कालाला किती महत्त्व आहे हे आपण जाणतोच. भरतकाम किंवा विणकाम करतानाही कापडावरील काही भाग रिकामा ठेवला जातो. त्यामुळेच त्या डिझाईनचं सौंदर्य वाढतं.  थोडी स्पेस जरूर असावी. तिचा अतिरेक होऊ देऊ नये. नाही तर एकटेपणा वाढेल. एकमेकांना समजून घेतलं तर आयुष्य किती सुंदर असेल नाही?                  

Sunday, 15 April 2018


बाळा आम्हाला माफ कर.... 

सगळं बरं चाललय असा फील येताच मन हेलावून टाकणारं, मनस्ताप देणारं आणि हतबलतेची भावना वाढवणारं काहीतरी घडतं. आपल्या आजुबाजुला त्रासदायक असं बरच काही घडतच असतं. पण जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा एखाद्या घटनेबाबत मनस्ताप करून घेण्यापलिकडे आपण काहीच करू शकत नाही.  माणूस म्हणून लाज वाटावी आणि त्यासाठी आपण काहीच करू शकत नसावं ही हतबलता अशी भावना या क्षणी जोर धरून आहे. हो मी असिफाबद्दल बोलतीय. आत्ता हे लिहिताना सुध्दा डोळ्यात पाणी येतय. काय झालं असेल त्या पिल्लूला ते सगळं सहन करताना ? काय चुकलं होतं तिचं? आपल्या शरीराशी कोणी असं घाणेरडं काहीतरी करतय हे कळल तरी असेल का तिला? ती एवढीशी पोर काय प्रतिकार करणार अशा हीन लोकांचा. 
ती एक असहाय्य मुलगी होती म्हणून तिच्या बाबतीत असं घडलं. ज्या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला त्यांना काय सुख मिळालं असेल त्या अपरिपक्व शरीरातून? स्त्रीच्या शरीराचा भोग घेताना पुरुष म्हणून मिळणारं समाधान तर नक्कीच नाही. मग ही वृत्ती कुठून आली असेल ? एका कोवळ्या जीवाचा असा बाजार मांडताना जनाची जाऊदे मनाची लाज वाटायला हवी होती यांना. काही वेळा मुलींच्या कपड्यांवरून असं बोललं जातं की, आजकाल मुली कमी कपडे वापरतात, नको त्या फॅशन्स करतात.  मग मुलांनी - पुरूषांनी त्रास दिला की ओरडतात. पण असिफाच्या बाबतीत काय झालं होतं? हेच काय कोणतीही चूक नसताना तिच्या वाट्याला हे का आलं मग? 
असिफासाठी आता खूप मोर्चे निघतील. लोक हळहळतील. सोशल मिडियावर, पेपरमधून लेख येतील. पण असिफा तर गेली. काहीही कारण नसताना. हा सगळा प्रकार कुठे घडला यापेक्षा हे सगळं करणा-यांच्या मानसिकतेचा संताप येतोय. कारण माणसाचं मन बेडर झालं की देऊळ काय आणि घर काय . त्याला काही फरक पडत नाही. पवित्र अशा धार्मिक उत्सवात दारु पिऊन झिंगणारे आपल्यासाठी नवीन नाहीत. त्यामुळे धर्म, जात, ठिकाण या सगळ्यापेक्षा हे घाणेरडं कृत्य करणा-यांच्या हीन मानसिकतेचा राग येतोय. 
या हरामखोरांना अशी शिक्षा व्हायला हवी ही यापुढच्या काळात असा विचार मनात आला तरी हातपाय चळाचळा कापायला हवेत. काय होईल माहित नाही. काही दिवस चर्चा, वर्षभरानी काहीतरी शिक्षा. दरवर्षी याच दिवशी मोर्चा. यापलिकडे काय होणार? कधी कधी वाटतं,  हिंदी सिनेमात दाखवतात तसं सामान्य लोकांच्या ताब्यात द्या यांना. ज्या वेदना त्या छोट्या जीवानी सहन केल्या त्या या राक्षसांना सुध्दा करूदेना. ती परत येणार नाही. तिच्या आई बाबांना कितीही संताप आला तरी दडपणांमुळे ते काय करू शकतील माहिती नाही. ही अस्वस्थता मात्र त्रास देत राहील. एकच म्हणावसं वाटतं, असिफा, बाळा, अश्रू ढाऴण्यापलिकडे आणि संताप व्यक्त करण्यापिलकडे तुझ्यासाठी आम्ही काहीही करू शकत नाही. प्लीज , बाळा आम्हाला माफ कर. 

Saturday, 24 February 2018

हवाहवाई.....



आज मी खूप ऱडले... कोणाला कळेल असं नाही... आतल्या आत...नेहमी आनंदी रहा असं म्हणणारी मी आजची घटना डील करू शकले नाही. आज माझी सर्वात आवडती अभिनेत्री गेली.. हो.. श्रीदेवी गेली.. काही लोक नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतात. प्रत्यक्षपणे involved असतातच असं नाही. श्रीदेवीचं आणि माझं असंच काहीसं नातं होतं. अगदी पाचवीत असल्यापासून मी तिची फॅन आहे. काही वेळा तिच्या आवाजावरून तिची टिंगल करणा-या माझ्या अनेक मैत्रिणींना मी गप्प केलं आहे. 
ती या जगात  नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हा खूप पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं. इतक्या सगऴ्या अभिनेत्रींमध्ये मला तीच का आवडते माहिती नाही .अगदी सुरूवातीच्या काळातले तिचे सिनेमे असो की इंग्लिश विंग्लिश असो सिनेमात श्रीदेवी आहे म्हणून मला तो आवडायचा. तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचा डान्स सगळच लाजवाब. सौंदर्य आणि अभिनय याचा ती सुंदर मिलाफ होती. काही वेळा मला चिडवायचे सुध्दा, खरं तर एखादा हीरोदेखील आवडायला हरकत नव्हती. पण श्रीदेवीइतकं मला कधीच कोणीही आवडलं नाही. 
मला आठवतय पाचवीपासून मी तिचे वेगवेगवळे फोटोज जमा केले होते. आम्हा मैत्रिणींमध्ये डिलही व्हायचं. माझ्या एका मैत्रिणीला अमीर खान खूप आवडायचा. मला श्रीदेवी. मग माझ्याकडे अमीर खानचे फोटो असतील तर मी तिला द्यायची आणि तिच्याकडे श्रीदेवीचे असतील तर ती मला द्यायची. पण त्यामध्ये २ अमीर तर ४ श्रीदेवी असं असायचं. आत्ताही हे सगळं लख्ख आठवतय. मला ती आवडायची , पण तिला प्रत्यक्ष भेटावं असं कधी नाही वाटलं. तिचा सदमा हा सिनेमा मी ८ वेळा पाहिलाय. ''हरिप्रसादको पट्टा मिलेगा''  म्हणणारी निरागस श्रीदेवी आणि सिनेमाच्या शेवटी ट्रेनमध्ये बसून जाणारी सुंदर श्रीदेवी.. लाजवाब अभिनय... अर्थात या सगळ्यात कमल हसनचाही वाटा आहे. 
वैयक्तिक आयुष्यात इतकी दुःखी असणारी ही अभिनेत्री पडद्यावर किती Full of life होती. परवाच तिचा चांदनी पुन्हा एकदा पाहिला. भुरळ पाडणारं  नैसर्गिक सौंदर्य, निरागसपणा, तितकाच खोडकरपणा, आर्मीमधला तिचा सूड घेण्याची इच्छा असणारा चेहरा, सदमा मधला भाबडेपणा, हवाहवाई म्हणून तिनी केलेली जादू, चालबाजमधला डबल रोल अशी कितीतरी  रूपं धडाधड डोळ्यासमोर तरळून गेली. 
पण एक बरं वाटलं श्रीदेवीला खितपत राहून मृत्यू आला नाही. सतत हसणारी श्रीदेवी हसतमुखानीच गेली. ''ना जाने कहा से आयी है ना जाने कहाको जायेगी... दिवाना हमे बनायेगी ये लडकी'' असं तिचे रसिक आजही म्हणतील. पण तिचं तिनी खरं केलं..'' किसीके हात ना आयेगी ये लडकी... ''
तिची आठवण माझ्यासारख्या असंख्य रसिकांच्या मनात कायम रहाणार आहे. त्या  आठवणींच्या रूपात ती जिवंतच असणार आहे.... 

Tuesday, 13 February 2018


या जन्मावर शतदा प्रेम करावे...




आज प्रेमदिन आहे आणि आज काही लिहावं वाटू नये असं होऊचं शकत नाही. ‘पीनेवालो को पिने का बहाना चाहिये’ तस आहे. प्रेम या भावनेवर लिहिण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज काय? पण तरी आज प्रेमदिनाच्या दिवशी काही तरी लिहावं असं मनात आलं. प्रेम या भावनेवर प्रेम करावं असं मला नेहमी वाटत. व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला खूप मर्यादा आहेत. मुळात संपूर्णपणे आपली वाटावी अशी व्यक्ती मिळणच दुरापास्त. फार कमी नशीबवान लोकांना असं प्रेम मिळतं. पण असं प्रेम मिळाल नाही तर .... आयुष्यात इतर अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण प्रेम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या स्वत:च्या जीवनावर, जगण्यावर प्रेम करणं.
काल एक खूप छान गोष्ट समजली. चित्रकार जेव्हा चित्र काढतो तेव्हा तो त्याच्या मनातले विचार चित्रातून मांडत असतो. चित्रकाराच्या मन:स्थितीचं, विचारांचं चित्रण त्या चित्रात असतं. खर तर प्रत्येक कलाकृतीचं तसच आहे. पण चित्राच्या बाबतीत काल एक खूप छान गोष्ट समजली. जी आपल्या जीवनात लागू पडते. माझ्या एका चित्रकार मित्रानी सांगितलं, ‘जेव्हा एखाद चित्र up to the mark होत नाही किंवा अगदी साध्या भाषेत बिघडतं तेव्हा ते चित्रं दुरुस्त करणं फार कमी चित्रकारांना जमत. बऱ्याचदा कॅनवास फेकून देण्याकडे कल असतो.’ आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात ज्यामुळे आयुष्याचा कॅनवास फेकून द्यावासा वाटतो. पण खरा चित्रकार बनून त्या बिघडलेल्या चित्रावर काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कॅनवास फेकून देणं तुलनेनी सोपं आहे. एकदा असं बिघडलेलं चित्र पुन्हा एकदा डोळ्यांना आनंद देणारं झालं की त्या चित्राची किंमत काय असेल हे आपण सांगूच शकत नाही.
प्रेमदिनाच्या निमित्तानी हा संदेश मनात कायम मनात ठेवायला हवा. जीवन एकदाच मिळतं, काही कारणांनी ते अगदी नकोसं झालं तरी त्यामध्ये हवेपणाचे रंग भरणं आपलच काम आहे. स्वत:वर, आपल्या जीवनावर प्रेम करण्यानी हे सहज शक्य होईल. कारण प्रेमात खूप ताकद असते. अगदी नव्हत्याचं होतं करण्याची. अनेक वेळा आपल्या मध्ये असणाऱ्या ताकदीचा आपल्यालाच अंदाज नसतो. कारण आपलं स्वत:वर प्रेमच नसतं. सगळ्या जगाची काळजी घेता घेता आपण आपल्याकडे कसं दुर्लक्ष करू लागतो ते कळतच नाही. आज प्रेमदिनाच्या निमित्तानी जगावर प्रेम करता करता स्वत:कडे लक्ष देऊया का?