Thursday, 7 June 2018


थोडं समजून घे ना यार मला... 


थोडं समजून घे ना यार मला... अगदी सगळ्या नात्यांमध्ये नेहमी वापरलं जाणारं हे वाक्य आहे. मित्र - मैत्रिणी, नवरा – बायको, आई – मुलं, ऑफिस मधले सहकारी - बॉस, कुटुंबीय किंवा अगदी देवाला सुद्धा आपण सगळे असं म्हणतो.
काय असतं हे समजून घेणं. आपल्या मनासारखं समोरच्यानी वागणं म्हणजे समजून घेणं का? पण अगदी आपल्या मनासारखं सगळं चालू असलं तरी समजून घेतलं जातंच असं सांगता येत नाही. कारण या मनात नेमकं काय चालू आहे हे त्या – त्या व्यक्तीला तरी कळत का? एका क्षणापूर्वी आनंदानी बागडणारं मन दुसऱ्याच क्षणी निराशेच्या गर्तेत जातं. या दोन क्षणांमधल्या अंतरात काही तरी असं घडतं जिथे समजून घेण्याची नितांत गरज असते. मग ते समजून घेणं आपल्या मनासारखं वागणं असतं असं नाही. कारण प्रत्येक वेळी आपल्याला जे वाटतं ते योग्यच असतं असं नाही. त्यावेळी हवा असतो एक मानसिक आधार, ‘ठीक आहे यार... बोलू नंतर’ असं म्हणणारा.
कारण तो क्षण निघून गेल्यावर कळत आपलं आपल्याला. पण तेव्हा कोणी स्वत:च (कितीही खरं असलं तरी) घोडं दामटायला लागलं की मग त्रास होतो. Actually आपल्याला खरं समजून घेणारे लोक असं वागत नाहीत. पण खरच, आपल्याला कोणी समजून घेत का? बऱ्याचदा या एका क्षणाच्या आतीतायीपणामुळे सगळे प्रश्न निर्माण होतात. अर्थात या सगळ्या गोष्टी आपल्यालाही लागू आहेतच.
बरेचसे छोटे – मोठे वाद या एका क्षणाच्या समजून घेतल्यानी टळू शकतात. कारण वादामुळे कटुतेशिवाय काहीही मिळत नाही. रागाच्या भरात जे बोलू नये ते बोललं जातं, मनं दुखावली जातात. मनात चाललेली विचारांची वादळं जास्तंच घोंघावू लागतात. काही वेळा ही वादळं छोटं नुकसान घडवतात तर काही वेळा माणूस म्हणून संपवतात. हे सगळं टाळता येईल का?  मान्य आहे की प्रत्येक वेळी हे समजून घेणं शक्य नाही. पण थोडा विचार करून समजून घ्यायला काय हरकत आहे?        



1 comment: