Friday, 21 November 2014


नेहमी आनंदी रहा.....




आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हणतात. सुख सुध्दा  क्षणभंगुर  आणि दुःख सुध्दा. म्हणजे काय झालं... काल एका पुस्तकात मी वाचलं की, सुख मिळवण्याच्या आपल्या सगळ्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणजे एकच वस्तू एकाला  सुखस्वरूप तर,     दुस-याला दुःखस्वरूप वाटते. हे वाचून मी एकदम विचार करायला लागले. म्हणजे, सगळा गोंधऴच आहे म्हणायचा.पण नीट विचार केल्यावर जाणवलं,  हे सगळ अगदी खरं आहे. कारण असे अनुभव आपण सगळे सुध्दा घेतोच की. पण हे सगळ मान्य करणं थोड जड जातं. कारण आपल्याला आपलं दुःख मोठ वाटत. पण आपल्याला दुःख मिळाल्याने कोणाला तरी आनंद झालाय, किंवा सुख मिळालय अशी कल्पना आपण कधी करतो का ?
 अगदी साधी गोष्ट .... बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही तर आपली किती चिडचिड होते. पण जेव्हा आपण निवांत हेडफोन कानात घालून , गाणी ऐकत बसलेले असतो, तेव्हा उभ्या असणा-या माणसांकडे आपण बघून न बघितल्यासारख करतोच ना. हे सगळं खूप नॅचरल आहे. कारण प्रत्येक वेळी उठून जागा देणं शक्य नसत. दर वेळी मीच का ?  असे प्रश्न पडू शकतात. पण हाच प्रश्न जेव्हा आपण उभे असतो, तेव्हा बसलेल्याला पडत असेल ना ? आपल्याला मिळणा-या सुख दुःखाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे सुख मिळाल्यावर आनंद होणं आणि दुःख  झाल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण फक्त त्या सगळ्याचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवायला हवं. नाहीतर एखाद्याने ठरवल्याप्रमाणे फोन न केल्यानी किंवा भेटायला न आल्यानी प्रचंड डिप्रेशन यायचं कारण नाही. थोडसं लेट गो करायला शिकलं पाहिजे. कल्पना करून त्याचं सुख, दुःख बाळगणं चूक आहे. कारण कल्पनेचं खरे खोटेपण अनुभवांती कळतं. एखादी आनंद देणारी वस्तू, व्यक्ति कायम तशीच रहाते का ? तर नाही. कारण अमुक एक वस्तू किंवा व्यक्ति आपल्याजवळ आहे , म्हणून आपण सुखी आहोत. ही संकल्पना बदलायला हवी. शाश्वत आणि स्थिर असं काहीच नसलं तरी जीवनातला आनंद शोधला पाहिजे. कारण आपण इथे आनंदी रहायलाच आलोत. हो ना ? 

Wednesday, 19 November 2014

आवडते मज माझी शाळा...........



काल एक खूप धमाल अनुभव घेतला. मी काल माझ्या शाळेत गेले होते. माझी शाळा भोरला आहे. '' राजा रघुनाथराव विद्यालय '' खरं सांगू, माझा वीकपॉईंट आहे ही शाळा. या शाळेनी जे भरभरून दिलं आहे, तेच आत्ता उपयोगी पडतय. 
भोरमध्ये जातानाच विलक्षण आनंद होत होता. नदीवरचा तो पूल. तिथे घडलेल्या गमती जमती सगळं आठवत होतं. शाळेत गेले तेव्हा तर मला कसं रिअॅक्ट व्हावं तेच कळत नव्हतं. तो नोटीस बोर्ड, ती बाकं, ते ग्राऊंड. सगळे बोलत होते माझ्याशी. मी माझ्या शाळेशी खूप गप्पा मारल्या. तिथल्या बेंचवरून हात फिरवला. माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. तिथे मी म्हणलेली गाणी, नाट्यवाचनातला भाग, महाराष्ट्राची लोकधारा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा सगळ आठवलं. माझ्या वर्गातल्या मित्र मैत्रिणींना, त्या वेळच्या शिक्षकांना, शिपाई काकांना खूप मिस केलं. पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं.
आमच्या आत्ताच्या मुख्याध्यापकांनी बावीकर सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं. शाळेसाठी एक चांगलं काम करण्याची संधी मला मिळतीय. ती मी कशी सोडेन? सर म्हणाले, '' ये विनया.....''  धडधडायलाच लागलं मला. खरं तर मी घाबरायचं काही कारण नव्हतं. पण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये काहीतरी उद्योग केल्याशिवाय जायला मिळायचं नाही. आज तर मी सो कॉल्ड मार्गदर्शन करायला जाणार होते. सरांसमोर काहीच बोलता येईना मला. शेवटी तेच म्हणाले, ''अगं, तू काही विद्यार्थिनी नाहीयेस आता. आज तू आमची पाहुणी आहेस.'' पोटात गोळाच आला. मी कसली पाहुणी ? तुम्ही सगळ्यांनी भरभरून दिलय आम्हाला. तेच पेरतोय आता. त्यानंतर आमच्या ढवळे सरांनी, ' ए विने' अशी हाक मारली. एक नंबर वाटलं मला. तिथले शिपाई काका मला मॅडम म्हणत होते. हसूच आलं मला. 
त्यानंतर माझ्या सगळ्या शिक्षकांना नाट्य अभिवाचनाविषयी काही सांगायला मला बोलवलं होतं. ही एक मोठी गंमत होती. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांना मी काय सांगणार ? पण तरीही मनाचा निर्धार करून उठले. बोलायला सुरूवात केली. नॉन स्टॉप एक तास बोलत होते मी. तेही माझ्या शिक्षकांसमोर. नंतर एक वर्कशॉप घेण्याचं ठरवलं आम्ही. मुलांना हे सगळ सांगायला मिळणार, या कल्पनेनी मी खुष झाले होते. तेव्हा तर पूर्ण दिवसभर मी शाळेत थांबणारे........... यस्स........ त्यानंतर आमच्या एका सरांनी माझं कौतुक केलं. सगळ्याच शिक्षकांनी माझ्या शाळेत असताना केलेल्या गमती जमतींचा उल्लेख केला.  छान वाटलं. कोणी कितीही कौतुक केलं तरी शाळेत कौतुक होण्यासारखं भाग्य नाही. खरचं मी खूप भाग्यवान आहे. हा अनुभव मला मिळावा यासाठी मला शाळेत बोलवण्याची कल्पना ज्यांच्या मनात आली, त्या विनोद वाघ सरांना मनापासून धन्यवाद..........

Thursday, 13 November 2014


नातं........



नातं म्हणजे काय हो ? दोन माणसांचे , दोन मनांचे  संबंध . नातं निर्माण करायचं , ते टिकवायचं हे कोण ठरवतं ? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न ? अर्थात ती दोन माणसं. पण कित्येकदा असं होतं की कोणतही नातं डेव्हलप होण्याआधी समोरची व्यक्तिच ठरवून टाकते की हे शक्य नाही बाबा. इतकं सोप कसं वाटतं लोकांना... 
अहो अगदी रोज संपर्कात येणा-या निर्जीव वस्तूंवर सुध्दा आपला जीव जडतो. आपलं पेन, आपलं घर, घराच्या भिंती, आपली गाडी. आम्हा बायकांचा जीव तर चमचा , वाटीवर सुध्दा जडतो. अशा  स्वभावाच्या लोकांचा ख-या खु-या जिवंत माणसांवर किती जीव जडत असेल ? नाही सांगता येणार शब्दांत. मला मान्य आहे प्रॅक्टिकली वागणा-या लोकांना हे सगळ फार बालिश वाटेल. 
प्रत्येक जण आपल्याला हवं असलेलं काहीतरी  मिळवण्यासाठी आयुष्यात येतो. तो भाग मिळाला की आपसुक निघून जातो. हे कितीही खरं असलं तरी, एक वेगळा विचार मला मिळाला , तो तुमच्याशी शेअर करते. कदाचित या  शेअरिंगमुळे आपलं नात घट्ट होईल. आपल्या आयुष्याला प्रवासाची उपमा दिली तर आपल्याला भेटणारे सगळे सहप्रवासी. प्रत्येक सहप्रवासी किती काळ आपल्या सोबत असेल सांगता येत नाही. फक्त इच्छित स्थळ एक असणारे सहप्रवासीच शेवटपर्यंत आपल्याबरोबर रहातात. मग इच्छित स्थळ एक नसणा-यांनी प्रवास करायचा नाही का ? हो करायचा ना.  एक तर आपलं इच्छित स्थळ बदलायचं. किंवा त्या इच्छित स्थळानंतरचा प्रवास पुन्हा नव्याने सुरू करायचा. फक्त अट एकच,  त्या काळापुरते आपले रस्ते बदलत आहेत हे त्या दोघांनाही माहिती हवं. ते कुणा एकानीच ठरवून प्रवास अर्धवट सोडणं योग्य नाही. 
यापुढे जाऊन अजून एक गोष्ट जी अगदी अध्यात्मिक पातळीवर सुध्दा सांगितली जाते. शांत राहून या प्रवासाची मजा लुटता यायला हवी. जे आपलं असतं ते आपल्यापासून कधीच दूर जात नाही. जे आपलं नाही ते आपल्याजवळ रहात नाही. हा नियम अगदी वस्तूंपासून व्यक्तिंपर्यंत सगळ्यांना लागू होतो.  आपल्या मनाला हे सांगणं थोड कठीण जातं. कारण मनाची कृती आपल्या कृतीच्या शंभर पट पुढची असावी. फार वेगानी धावत ते. प्रवीण दवणे या माझ्या आवडत्या लेखकाचे हे विचार  यावेळी पटकन आठवले. अनेकदा व्यक्तिंची सोबत अधूरी वाटते. मन मोकळ करण्यासाठी मनाचीच सोबत होते. उत्कट सुखाचा एखादा वेडा क्षण असो की हुरहुरत्या सांजवेळेची सल. मनच जिवलग होतं. मनाचे सूर मनाच्या मैफुलीत दरवळू लागतात आणि इथेच कुठेतरी जगण्याचं कारण सापडत. 

Wednesday, 5 November 2014


अपेक्षा......


आज ना मी ठरवून  टाकलय बरं का.... कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही ठेवायची. अगदी खरं सांगु.... असं मी रोज ठरवते. पण या बाबतीत मला कधीच यश मिळत नाही. कारण आपल्या सहवासात येणा-या प्रत्येक माणसाकडून आपण काही ना काही अपेक्षा ठेवतोच. निदान मी तरी ठेवते. चुकत असेलही कदाचित. पण उगाच खोटं कशाला बोलू ? फार मोठ्या नसतात हो माझ्या अपेक्षा. पण काय करणार ?  कळतच नाहीत समोरच्याला.... काय सांगणार हो...
म्हणजे अगदी साधी अपेक्षा. आपल्या मैत्रिणींनी आपल्याला समजून घ्यावं. अगदी जरी आपलं चुकलं तरी. पण छे हो. इथे सगळे तलवारी घेऊन तयारच. व्हॉटस अॅप वर एखाद्या दिवशी, एखाद्या मुद्यावरून जरा जास्त बोललं गेलं , लगेच ग्रुपमधल्या इतरांना म्हणे डिस्टर्ब होतं. एरवी तुम्ही कितीतरी वेळा उगाच गप्पा मारत असता , तेव्हा आम्हाला पण होतं डिस्टर्ब. पण ग्रुप म्हणलं की असं होणारच ना.... बरं सगळ्या माझ्याच आहेत. हा उगाच माझा गैरसमज.. त्यामुळे नंतर कोणीतरी थोडा मस्का मारावा.....  हीच ती साधी अपेक्षा

एखाद्या वेळी एखादी सिरिअल अगदी मनापासून पहावीशी वाटते. पण नेमकं तेव्हाच कोणीतरी येत तरी. मला तरी कुठेतरी इच्छा नसताना जावं लागत. भरीत भर म्हणजे टाटा स्कायचे पैसे भरायची लास्ट डेट उलटून गेलेली असते. म्हणजे काय ? झालं........ गेलीच की हो सिरियल.... सिरियल शांतपणे बघायला मिळावी .....  हीच ती साधी अपेक्षा.

दुकानात साडी घ्यायला गेलं की तर असा अपेक्षा भंग होतो म्हणून सांगु.... नेमका जो रंग आवडतो, त्यात पॅटर्न पटत नाही. पॅटर्न पटला तर रंग आवडत नाही. दोन्ही जमलं तर बजेटमध्ये बसत नाही. अरे काय चाललय ? मला जेव्हा साडी घ्यायची तीव्र इच्छा आहे,  तेव्हाच नेमक्या इतक्या अडचणी ? 

आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याला हवं तेव्हा फोन न करणं. हा तर खूप मोठा अपेक्षाभंग. एरवी अगदी प्रेम उतू जात असत. पण जेव्हा मला गरज आहे, तेव्हा... इस लाईन की सभी लाईने व्यस्त है.... एखादा दिवसच असा उजाडतो ना की काही विचारू नका....

आश्चर्य म्हणजे मी बिझी आहे. म्हणून माझ्यावर चिडलेले असंख्य लोक. मला वाटलं तुला वेळ नसेल म्हणून नाही निरोप दिला. असं म्हणणारे. पण मला कोणी विचारलच नाही.... मला वेळ नाहीये ना. ठीक आहे. मग तुम्ही करा ना फोन... काय हरकत आहे... हा काय गोंधळ आहे ? दया,  कुछ तो गडबड है...
निरपेक्ष का काय ते कठीण आहे बाबा.... आता तुमचच बघा ना... तुम्हाला मी नेहमी सांगते की, कमेंटस टाका , पण तुम्ही नुसतं लाईक करता... किती हो माझी साधी अपेक्षा....अपेक्षा ठेवणं म्हणजे दुःखाला आमंत्रण... हे कळतं हो पण वळत नाही ना... आज मी माझ्याकडूनच ही अपेक्षा ठेवते की, मी यापुढे कमी अपेक्षा ठेवीन.... 

Saturday, 1 November 2014


संस्कार.........


आपल्यापैकी सगळ्यांनाच असं नेहमी वाटतं  की काय हे .... आता जगात फार काही अर्थ राहीला नाहीये. सगळीकडे निराशा आहे.... कोणाला कोणाच्या सुख- दुःखाशी काहीही देणं - घेणं नाहीये...... संस्कारांचा अभाव आहे....... असं बरच काही. सगळ्यांबद्दल प्रेम , करूणा मनात असावी हे शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. पण या परिस्थितीतदेखील आशेचे बरेच किरण आहेत. आजच एका कार्यक्रमाला गेले होते. स्वरूपवर्धिनीचं शिबीर होतं. तिथे आनंद सराफ सरांच व्याख्यान होतं. 
समोर बसलेली मुलं पाचवी ते दहावी वयोगटातली होती. सर जे काही सांगत होते ते समजण्याची त्यांची मानसिकता होती असं नाही. पण मुलं शांतपणे ऐकत होती. सरांनी आपल्या आजुबाजुला रहाणा-या संवेदना टिपायला शिकवलं. आपल्या भोवताली अशी कितीतरी माणसं असतात जी समाजासाठी खूप काही तरी करत असतात. विदाऊट जाहिरातबाजी... यामध्ये पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या अनेकांची उदाहरणं त्यांनी सांगितली. विलक्षण आहेत ही माणसं. आपलं सुख  - सुविधा सोडून समाजासाठी काहीतरी करणारे देवदूतच आहेत हे सगळे. आपण उगाच फार रडतो याची जाणीवदेखील झाली. 
 ठराविक काळानंतर चुळबुळ सुरू झाली.  सहाजिकच होतं म्हणा. त्यांची जेवायची वेळ झाली होती. अशा वेळी कोणी कितीही चांगल बोलत असलं तरी ते चुळबुळ न करता ऐकणं जरा कठीणच.  त्या मुलांपैकी एक दोघांनी नंतर येऊन  शंका विचारल्या. मला खूप बरं वाटलं. हाच तो आशेचा किरण..... रेणू गावस्कर कोण आहेत ? रिमांड होम म्हणजे काय ? त्या मुलांचे आई बाबा कुठे रहातात मग ? असे प्रश्न त्या वयात पडले हेच खूप. त्या मुलाने आणखी एक चांगला प्रश्न विचारला . आम्हाला पण असंच काम करायच आहे. तर आम्ही काय करू ? त्यावर सरांनी सांगितलेलं उत्तर फार छान आहे. ते म्हणाले, ''शाऴेमध्ये जर एखाद्या मुलाने डबा आणला नसेल आणि तुझ्या आईनी गोडाचा शिरा डब्यात दिला असेल तर काय करशील ?''  तो मुलगा पटकन म्हणाला, ''मी शेअर करीन.''     वा वा मिळाला आशेचा किरण. ५० मुलांपैकी एकाला हा विचार पटला... त्याच्या मनात रूजला.... मस्त वाटलं मला. 
यावरून एक जाणवलं . आपणच आपल्या मुलांच्या मनात संवेदना जागृत ठेवायला कमी पडतोय. रस्त्यावर, ट्रेनमध्ये फिरणारी अनाथ मुलं पाहून आपल्या डोळ्यातली करूणा संपल्यासारखी झालीय. मला मान्य आहे की काळ बदलला आहे. काही वेळा अशा लोकांकडून धोका हेईल की काय असे दिवस आलेत. पण तरीही मला वाटतं आपण संवेदवा जागृत ठेवायला हव्यात. फार मोठं समाजकार्य शक्य नसेल तर निदान आपल्या मुलांमध्ये तरी करूणेचा, मायेचा झरा जिवंत ठेवूयात. कारण हीच मुलं पुढची पिढी घडवणार आहेत. 
समाजात प्रचंड विषमता आहे. अति गरीबी आणि अति श्रीमंती अशी टोकं आहेत. तरीही आपल्या परीने समाजाचं देणं देण्याचा प्रयत्न करूयात. मुलांवर वेगळे संस्कार करण्याची गरज नसते. आपलं पाहूनच मुलं शिकत असतात. त्यामुळे संस्कार करायचे असतील तर ते स्वतःच्या मनावर करायला हवेत.