Saturday, 26 April 2014

                               

माझा मामा............


परमार्थ म्हणजे काय? तर आसक्ती सोडणे. ज्याने आपल्याला प्रपंच दिला तो त्याची काळजी घेईल. आपण आपले काम करीत रहावे याला परमार्थ म्हणतात. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्याकरीता नसून तो स्वतःकरीता असतो. हे सगळे ऐकण्यास सोपे वाटत असले तरी तसे वागणे कठीण आहे. कारण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक प्रपंचाची काळजी करण्यातच आपले सारे आयुष्य घालवतात. या सगळ्याची जाणीव होऊनही आपण स्वतःला बदलत नाही. मात्र सर्वसामान्यांना भक्तीमार्गाची ओढ लागावी म्हणून परमेश्वर गुरूची नियुक्ति करतो. गुरूंच्या आज्ञेचे पालन केल्याने प्रपंच करीत असतानाच परमेश्वराची प्राप्ती होते. भोर या एका लहानशा गावात डॉ. उदय पेंडसे हे असेच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांची नियुक्ती परमेश्वराने लोकांना भक्तीमार्गाला लावण्यासाठी केली आहे.
                                      डॉ. पेंडसे हे माझे मामा. त्यामुळे गुरू आणि माझा पालनकर्ता अशा दोन भूमिकांमध्ये माझा मामा मला नेहमीच भेटतो. त्याच्याबद्दल लिहायचे ठरविले तर एक मोठा ग्रंथ तयार होईल. आयुर्वेदाचे अफाट ज्ञान असलेला माझा मामा अतिशय निरागस, संवेदनशील, प्रेमळ, सतत दुस-यांना मदत करणारा आहे. त्याच्याकडे सगळ्यांना समान वागणूक मिळते. आम्ही भाच्चे मंडळी असोत किंवा त्याची मुले तो आम्हाला समान वागणूक देतो. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने मला साथ दिली आहे. अगदी निरपेक्ष भावनेने त्याने मला अनेक मोठ्या संकटांमधून वाट दाखविली आहे. मी आत्ता जे काही आहे ते फक्त माझ्या उदय मामामुळे. कारण असे म्हणतात की तुमच्या हालाखीच्या परिस्थितीत जे तुमच्याबरोबर असतात तेच तुमचे आप्त. माझा मामा आणि अर्थात माझ्यावर आईसारखे प्रेम करणारी माझी आशा मामी हे माझ्यासाठी म्हणूनच अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्याविषयी लिहिताना, बोलताना माझे डोळे नेहमीच पाणवतात. मामाविषयी एक वेगळीच ओढ मला वाटते. अगदी साध्या साध्या प्रसंगात सुध्दा त्याची नुसती आठवण काढली तरी मनाला धीर येतो. मनाची ही शक्तीच त्या संकटातून बाहेर पडायला मदत करते. माझ्या आईसाठी सुध्दा तो श्रीकृष्णासारखा धावून यायचा. मला आई, बाबा नाहीत त्यामुळे खर तर मी अनाथ आहे. पण माझ्या मामानी मी अनाथ असल्याची जाणीव मला कधीच होऊ दिली नाही. नाहीतर हल्ली नात्यांमधला दुरावा किती पराकोटीचा वाढतो आहे याचा अनुभव आपण सगळे घेतोच.
                                            अगदी माझ्या जन्मापासून आजतागायत मी मामाला खुप त्रास दिला आहे. पण त्यानी कधीच तो त्रास मानला नाही. त्याची 'नन्या' अशी प्रेमळ हाक ऐकली की एकटेपणा कुठच्याकुठे पळून जातो. मला माहित नाही तो माझा गुरू आहे, वडिल आहे, की आई, पण एक मात्र नक्की की जगाच्या या पसा-यात त्याच्या रूपाने मला एक असा आधार मिळाला आहे जो फार कमी लोकांच्या नशीबात असतो. या लेखात कोणताही एक प्रसंग लिहून माझे अनुभव शेअर करणे मला शक्य नाही. माझ्या आयुष्यात प्रत्येक चांगल्या - वाईट प्रसंगात त्याचे अस्तित्व मी अनुभवले आहे. त्यामुळे हा पट एवढा विस्तृत आहे की तो शब्दबध्द करणे अशक्य आहे. 'श्रीराम ग्रुप' या साधकांच्या समूहाला मामाचे गुरू म्हणून अनेक अनुभव आले असतील. पण माझ्या बाबतीत माझा मामा माझ्याबरोबर सावलीप्रमाणे असतो. त्यामुळे माझे असणे आणि माझे नसणे त्याच्याच हातात आहे. माझे यश त्याचेच आहे. कारण मला योग्य ती दिशा दाखवणारा तोच आहे. आपल्याला सगळ्यांनाच सगुण रूपात ईश्वर भेटावा असे वाटते. तसा तो प्रत्येकाच्या हृदयात असतोच. पण ज्याच्या हृदयात माया, ममता, प्रेम भरलेले असते त्याच्याकडे ईश्वराचे अस्तित्व अधिक असते. कदाचित त्यामुळेच मामा आपल्याला गुरूस्थानी आहे. त्यानेदेखील त्याच्या गुरूंच्या आज्ञेचे पालन केले आहे. मामा त्याच्या शिष्यांना किंवा त्याच्या कुटुंबियांना कधीच आज्ञा करीत नाही. त्याची विनंती असते की नामस्मरण करा. मामा म्हणतो,' सदगुरूच्या सांगण्याप्रमाणे नामस्मरण करा. त्याने नामाची गोडी लागते. पोटभर केलेल्या नामस्मरणानेच आत्मा तृप्त होतो.'

Friday, 25 April 2014

थेंबे थेंबे तळे साचे.....

घरातल्या स्वयपाकघराच्याही बाहेर न पडणारी सखुबाई जेव्हा तीन ते चार हजार महिलांसमोर धीटपणे उभी राहून आपले विचार मांडते तेव्हा कौतुक आणि आश्चर्य वाटते. अगदी खेडयात रहाणा-या या महिलांमध्ये हा आत्मविश्वास आलाय तो महिला बचत गटांच्या माध्यमातून. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी व त्यांच्यातला आत्मविश्वास वाढविण्यासाठी बचत गटांनी फार मोठे काम केले आहे. आपणही पैसे कमवू शकतो व आपल्या कुटुंबाला हातभार लावु शकतो या कल्पनेने व प्रत्यक्ष कृतीमुळे ग्रामीण भागातील महिला धाडसी बनल्या आहेत. शहरातील महिला आपापल्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवित आहेत . त्यांचे कौतुक आहेच पण खरे कौतुक आहे ग्रामीण भागातील या महिलांचे ज्यांनी बचत गटांच्या माध्यमातून आपल्या कतृत्वाचा ठसा उमटविलेला आहे.
      पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात साधारण दहा वर्षांपूर्वी बचत गट मोहिम सुरु झाली. या छोट्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. जिल्ह्यातील 80 टक्के कुटुंबे या मोहिमेत सहभागी झाली आहेत. दर वर्षी शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल करणारे बचत गट आता नवनवीन बाजारपेठांच्या शोधात आहेत. भारतातील बहुतेक सर्व राज्यात ही चळवळ पसरली आहे. यामध्ये महाराष्ट्र व पुणे जिल्हा आघाडीवर आहे. बचतगटांची संकल्पना स्वयंसहाय्यता गट यावर अवलंबुन आहे. ही संकल्पना प्रथम बांगलादेशात रुजली. नोबेल पारितोषिकाचे मानकरी डॉ. महमंद युनूस हे या संकल्पनेचे जनक. व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या या व्यक्तिला गरीबांबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर होता. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करताना बहुतांश लोक कर्जबाजारी असून सावकाराच्या पाशात अडकली आहे . हे त्यांच्या लक्षात आले. अशा गरजूंना छोटी कर्जे विनातारण द्यावीत अशी योजना त्यांनी बॅंकांसमोर मांडली. परंतु बॅंकांनी ती फेटाळली. इतर कोणावर अवलंबुन रहण्यापेक्षा स्वतःपासुनच सुरुवात करावी या विचारातून डॉ. युनूस यांनी पाच महिलांना आर्थिक मदत केली. त्यांना कर्ज दिल्यानंतर त्यांना असा अनुभव आला की, या महिला प्रामाणिकपणे कर्जफेड करीत आहेत. इतरांकडे याचना करण्यापेक्षा याच समुहांनी बॅंक तयार करावी अशी कल्पना डॉ. युनूस यांच्या मनात चमकून गेली. याच विचारातून 1983 साली ग्रामीण बॅंकेची स्थापना झाली.
     मावळ तालुक्यातही महिला बचत गट या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात महिलांचे सक्षमीकरण झाले आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिन्याला दोन ते तीन हजार रुपये महिला सहज मिळवतात. तसेच काही महिला बचत गटांकडून कर्जघेऊन आपला व्यवसाय सुरु करतात. अंगणवाडी, बालवाडीतील मुलांना अन्न शिजवून देणे ही एक रोजगाराची मोठी संधी महिलांना उपलब्ध झाली आहे. केवळ पापड आणि लोणच्यामध्ये न अडकता बचत गटातील महिला नवनवीन वाटा शोधत आहेत. तिकोना पेठ येथील महिलांचे हातसडीचे तांदुळ आता सर्वत्र लोकप्रिय झाले आहेत. त्याचबरोबर फिनेल तयार करणे, फाईल्स बनविणे, गणपतीचे साचे तयार करणे, पणत्या , आकाशकंदिल तयार करणे, राख्या बनविणे, नर्सरी चालविणे, केटरिंगच्या ऑर्डर्स मिळविणे, कपड्यांचा व्यवसाय, गांडूळ खत तयार करणे यांसारखे कितीतरी व्यवसाय महिला करीत आहेत. नाणे मावळातील आदिवासी भागातील महिलाही बचत गट संकल्पनेमुळे विकसित झाल्या आहेत. मावळ जत्रा, भीमथडी जत्रा आदीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना चांगली संधी मिळत आहे.
      बचत गटांमुळे महिलांना आता कोणापुढे हात पसरावे लागत नाहीत. बचत गटांचे मुख्य उद्देश आहेत महिलांना सावकाराच्या पाशात अडकावे लागू नये व दैनंदिन बचतीची सवय लागावी. अडचणीच्या वेळी एकत्रित बचतीतून कर्ज मिळविण्यासाठी व वैचारिक परिवर्तन घडवून स्वबळावर उभे रहाण्यासाठी बचत गट स्थापन झाले. या मोहिमेमुळे दहा वर्षांत सुमारे 76 हजार गरीब कुटुंबांना अर्थसहाय्य मिळाले आहे. बचत गटांमुळे महिला साहसी बनल्या. एकमेकींच्या सुख दुःखात सहभागी होऊ लागल्या. त्यांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. बॅंकांच्या कार्यपध्दतीची ओळख झाली. बचत गटांमुळे महिलाचे संघटन झाले. दहा पुरुष परवडले पण दोन बायका एकत्र येऊन काम करु शकत नाहीत. या विचाराला महिलांनी छेद दिला. 'थेंबे थेंबे तळे साचे' ही उक्ती प्रत्यक्ष जीवनात आली. या कार्याविषयी व बचत गटातील महिलांविषयी म्हणावेसे वाटते,
' बचतगटाने स्त्रियांच्या गुणांना मिळाला वाव,
घरात, समाजात तिचा वाढला की हो भाव '

Thursday, 24 April 2014

असाही वाढदिवस ....


 ' हॅपी बर्थ डे टू यू ,हॅपी बर्थ डे टू यू , मे गॉड ब्लेस यू डिअर भुजो. '  असा लहानग्यांचा किलबिलाट त्यातच मस्त मोठा केक, सजावटीचा थाटमाट व छान छान बर्थडे कॅप.  हे वर्णन आहे एका रंगलेल्या बर्थडे पार्टीचे. फक्त ही पार्टी कोणत्या मुलाची नव्हती तर होती एका कुत्र्याची. तळेगाव स्टेशन विभागातील वतननगर येथे नंदकुमार खंडागळे व मनिषा खंडागळे यांचा भुजो हा पाळलेला कुत्रा. अगदी घरातल्या एखाद्या सदस्याचा वाढदिवस आपण ज्या उत्साहात साजरा करतो तसा भुजोचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. कॉलनीतील भुजोचे सगळे मित्र वाढदिवसाला आले होते. रीतसर औक्षण, भेटवस्तूंचा मारा, मिसळ पावचा बेत  वाढदिवसानिमित्त करण्यात आला होता. 
लॅब्राडोर जातीचा एक वर्षाचा भुजो  कॉलनीत सर्वांचा लाडका बनला आहे.   भुजो रोज सकाळी सकाळचे वर्तमानपत्र आणण्यासाठी मुख्य रस्त्यावर जातो. दूधवाले काका आल्यावर त्यांच्याकडून स्वतःसाठी दूध घेतो.  नंदकुमार खंडागळे भुजोला आपल्या मुलाप्रमाणे वाढवतात. त्यामुळे त्याला सर्वात जास्त लळा त्यांचाच आहे. ते ऑफिसमधून येईपर्यंत तो वाट बघतो. गाडीवरुन चक्कर मारण्यासाठी हट्ट करतो. गाडीची चावी आणून देतो.   भुजो सकाळी घरातल्या सगळ्यांना उठवतो. घरात कधीही शी शू करत नाही. फूटबॉल मस्त खेळतो. त्याला पट्टा किंवा साखळी कधीच बांधली जात नाही हे विशेष. तो कधीही विनाकारण कोणावरही भुंकत नाही. कॉलनीतील लहान मुले त्याचा घोडा घोडा करतात,  त्याचे कान ओढतात पण भुजो त्यांना इजा करत नाही.  आदित्य आणि अक्षय या खंडागळे यांच्या दोन्ही मुलांचा तो मित्र आहे. सौ.  मनिषा त्याचे खाण्यापिण्याचे लाड आवडीने पुरवितात.  कॉलनीत तर तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. खंडागळे यांच्या घरावरुन जाताना कोणीही भुजोशी बोलल्याशिवाय जात नाही. 
  भाजी बाजारात विक्रेत्यांचा तो लाडका बनला आहे. सगळे भाजीविक्रेते त्याला टोमॅटो, गवार, काकडी खायला देतात. घरातही त्याची खाण्यापिण्याची अजिबात कटकट नाही. कारल्याच्या भाजीपासून सगळ्या भाज्या त्याला आवडतात. हो पण श्रीखंड पूरीचा बेत त्याला जास्त आवडतो. भुजोला रागाने कोणी खायला दिले तर तो अजिबात खात नाही. कोणी हिडीसफिडीस केले तर त्या व्यक्तिकडे तो ढुंकूनही बघत नाही. चाणक्याने कुत्र्यापासून शिकण्यासारखे गुण असे वर्णिले आहेत खूप भूक लागली असतानाही संतुष्ट रहाणे.गाढ झोपेत असतानाही जागृक रहाणे.मालकाप्रती वफादारी आणि शूरपणा दाखविणे. सदैव कृतज्ञता व्यक्त करणे.तमाम प्राणीमात्रात आपल्या प्रमाणिकपणासाठी आणि मालकाप्रती कृतज्ञता बाळगण्यासाठी कुत्र्याची ख्याती जगन्मान्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही युरोपात पाळीव प्राण्यांच्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असे अहवालात म्हटले आहे. 
     खंडागळे यांना भुजो इतका प्रिय आहे की एक बाई पंधरा हजार देऊन भुजोला मागत असतानाही त्यांनी तो दिला नाही. खंडागळे म्हणाले, 'भुजो माझ्या मुलासारखा आहे. माणसांनाही जे कळत नाही ते या मुक्या जनावराला कळत. त्याच्यामुळे आमच्या घरात वेगळच चैतन्य आल आहे. इतकच नाही आता तर आमच्या घरात भांडणंच होत नाहीत.' पाळीव प्राण्यावरचे प्रेम आणि त्या प्राण्यातला प्रामाणिकपणा या गोष्टी  आपल्याला नक्कीच विचारप्रवृत्त करायला लावण्यासारख्या आहेत नाही?  

Wednesday, 23 April 2014







किती वेगळ्या आहेत या भावना
ज्या मला शब्दांत बांधता येत नाहीयेत
कोणत्याही चांगल्या सुंदर गोष्टींचा आस्वाद घेताना
तुझी इतकी आठवण का येते?
या जगाच्या नियमावलीत माझं हे प्रेम बसत नसेलही
पण खरच मी त्याला काही करू शकत नाही
कारण खळाळत्या नदीसारखं माझं हे निरागस प्रेम
समु्द्राकडे धाव घेणारच ना
कितीही डोंगर. अडथळे आले
तरी शेवटी नदी समुद्राला मिळतेच ना
एका ठराविक चौकटीत वहा
असं वा-याला सांगता येईल का?
मग या मनाला कसं सांगु, बाबारे आता तुझे हे विचार बसव बर एका चौकटीत
करतीय प्रयत्न, पण खरच जमत नाहीये
कुणालाही त्रास न होता नदीला वहाण्याची इच्छा असते.
तसच माझं आहे
पण जसा नदीच्या नकळत पूर येतो आणि ब-याच गोष्टी वाहून नेतो
तसच माझं झालय.
माझी इच्छा नसताना माझ्या हातून बरच काही निसटुन गेलय
पण , जे आहे शाश्वत ठिकाण
ते मात्र तसच राहिलय तुझ्या रूपानी
म्हणूनच जे गेलय त्याचं दुःख करण्यापेक्षा
जे राहीलय तेच टिकवायचय मला.

नमस्कार


मनी मानसी या ब्लॉगच्या निमित्तानी आपण नेहमी भेटूयात.

माझ्या मनातलं काही जे मी तुम्हाला सांगू इच्छिते असं सगळ असेल यामध्ये.

मस्त गप्पा आणि हो तुमच्या कॉमेंटस हव्यातच .....


विनया