Friday, 21 May 2021

 

हवास मज तू…



काल परवाची गोष्ट, तुला कोणीतरी अवकाळी म्हणलं आणि अमानुष सुद्धा. म्हणे जरा माणसासारखा वाग…पण मला एक कळल नाही माणसासारखा म्हणजे कसा?  खर तर आत्ता तू माणसा सारखाच वागतो आहेस
, नाही का? बेभरोशी, माणुसकी सोडून, आत्मकेंद्री, स्वत:ला हवा तसा, अहंकारी… हे सगळं तुला नव्हतं हा,  प्लीज गैरसमज नको करून घेउस. माणूस माणसासारखा वागत नाही आणि तुला नावं ठेवतो ना म्हणून बोलले इतकं. नाही तर तुझ्यासारखा मित्र आहे का कोण?

मागे एकदा तू असाच आला होतास अचानक, धुंवाधार. माझ्याशी बोलायला. माझ्या मनातले आणि डोळ्यातले अश्रू स्वत:चे समजून माझ्या गालावरून ओघळला होतास. तुला कळल ते अश्रू आहेत पण सगळ्यांना वाटलं तू आहेस. मला तेव्हा सुद्धा तुझ्या सोबत असण्यानी किती आधार मिळाला होता, तुला बोलले सुद्धा मी, आठवतंय ना? मी तुला म्हणाले होते, ‘तू मला खूप आवडतोस. कारण माझ्या मनात आणि चेहेऱ्यावर असलेल्या खऱ्या भावना कोणाला कळू देत नाहीस. कारण त्या कोणाला कळू नयेत यासाठी खूप धडपड केलेली असते ना त्यावेळी. तुझ्यामुळे ती धडपड सफल होते.’

तू आलास की अजून एक फायदा होतो, मी किती लहान आहे. माझं अस्तित्व तुझ्यापुढे काहीच नाही याची जाणीव होते आणि सगळा मी पणा वाहून जातो, तुझ्या सोबत. तू धाडधाड कोसळतोस आणि सगळी दारं – खिडक्या आपटवून दाणादाण उडवून लावतोस. तेव्हा कळत आपण नीट लावून ठेवलेलं सगळं किती क्षणभंगुर आहे.

तुझ्या येण्याने आलेला गारवा, बदललेलं वातावरण माझ्यासाठी तर संजीवक असत. मला कधीच तू येण्याने झालेल्या चिखलाचा राग नाही आला. कारण प्रत्येक वेळी तुझा मोसम नसताना तू येतोस ना, तेव्हा माझ्यासाठी येतोस, मला माहितीय. या वर्षी मी जरा अतिपणा केला. म्हणजे तू येत होतास पण माझ्याच विचारांमध्ये इतकी अडकले होते की तू आपला सारखी धडधड करत होतास दाराशी. पण मीच जरा दुर्लक्ष केलं. पण आज तू जिंकलास, नेहमीप्रमाणे. दिवे नसताना मनातला दिवा लावलाच आज, तुझ्यासाठी.

आता सगळ छान होणार. मला माफ कर, बोलायला हवं होतं वेळेतच तुझ्याशी. पण हे किती छान आहे ना रे, आपल्या नात्यात इगो नाहीच. म्हणजे, मी कशीही वागले तरी तू परत परत येतोस आणि तू वेड्यासारखा वागलास तरी मला कायम नवा वाटतोस, तितकाच हवाहवासा.

Thursday, 20 May 2021

 


 

उर्जेचं आगार

“ काय मावशी, भेंडी कशी दिली?”

“घे बाय तुला काय हवी तशी”

“असं कसं हो मावशी? काही तरी सांगा ना”

“तशी १० रुपये पावशेर आहे. बर चल, दे ३० रुपये आणि घेऊन जा किलोभर. “

“छे, इतकी काय करू नेऊन. मला अर्धा किलो द्या आणि घ्या हे वीस रुपये”

“इतके काय करायचेत. ५ रुपये कमी दे”

“असुदेत, १ किलो घेत होते म्हणून ३० रुपये म्हणालात ना?”

“ हो ग बाय, पन घे तुला हवी तर”

“नको मावशी, अर्धा किलोच द्या. काय हो? कुठे राहता?”

“हे काय मागल्या अंगाला.”

“तुमच्याकडे लॉकडाऊन नाही का?”

“आमच्याकडे नाय ते तसलं काही. रेशनच दुकान चालू आहे, भाज्या बी मिळतात. काय नाय लॉक डाऊन बिक डाऊन”

“मावशी, तुमच्या भाषेत बोला कि माझ्याशी”

“माझी कातकरी भाषा , तुला नाय कळणार”

असं म्हणून सुरकुतलेल्या गालात गोड लाजलेली आजी डोळ्यासमोरून हालत नाही. परवा एका कामानिमित्त कर्जत फाट्यावरून येत असताना करवंद घेण्याचा मोह आवरला नाही. तिथे भेटली ही आजी. करवंद घेता घेता कोवळ्या लुसलुशीत भेंडीवर नजर पडली आणि टिपिकल गृहिणी जागी होऊन भाजी घ्यायला गेले. तिच्या बोलण्यावरून लगेच कळत होतं की अनुभवाची शिदोरी आहे या आजीकडे. या सगळ्या संवादात माझ्या लक्षात राहिलेलं तिचं वाक्य म्हणजे, “आमच्याकडे नाय ते तसलं काही. रेशनच दुकान चालू आहे, भाज्या बी मिळतात. काय नाय लॉक डाऊन बिक डाऊन”

किती कमी गरजा आणि त्यामुळे किती समाधानी आयुष्य होत त्या आजीच. मनात आलं, आपण किती बाऊ करतोय लॉक डाऊन आणि आलेल्या परिस्थितीचा. खर तर अन्न, वस्त्र आणि निवारा याच आपल्या मुलभूत गरजा आहेत हे आपण लहानपणी शिकलो. पण मोठे होत गेलो आणि बेसिक विसरून गेलो. त्यातल्या त्यात अशा कठीण काळात तरी या तीनच आपल्या गरजा असायला हव्यात आणि माझ्या सारखी मध्यम परिस्थिती असणाऱ्या बहुतांश लोकांच्या या गरजा नक्कीच पूर्ण होतायत. मग तरी आपण तक्रार का करतोय? असं मनात आलं. रेशन आणि भाज्या मिळतायत अजून काय हवं? हे आजीच साध सोपं तत्वज्ञान किती शिकण्यासारख आहे.

Online कुर्ता अजून आला नाही, मोबाईल मिळण्यासाठी पण वाट पहावी लागते आहे, घरात घालायची चप्पल (extra) आलीच नाही, हेडफोन पार कामातून गेलेत पण या लॉक डाऊन मुळे काहीच मिळत नाहीये. किती पुस्तकं घ्यायची आहेत यार, (जी आहेत त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचं नाहीये), लोकल नाही, हे नाही , ते नाही…. आपली यादी संपतच नाही.

मनोरंजनाची अमाप साधनं, तीन , चार वेळेस वेगवेगळ खायला, कपड्यांनी भरून वाहणारं कपाट, online सुविधेमधून जवळपास सगळं मिळण्याची परिस्थिती असं सगळ असताना आपल्याला अजून काय हवंय? मला वाटत, थोडं थांबून विचार करायला हवा. परिस्थती कधीच अशी राहत नाही, हे माहिती असून सुद्धा सकारात्मक राहण्यासाठी इतकी धडपड का करावी लागते आहे? यापैकी काहीही नसताना, सोयी – सुविधा नसताना ती आजी आनंदी कशी राहू शकते? विचार करायला हवा आणि आचरणात आणायला हवा. नाही का? अशा काळात एकमेकांना आधार देणं, समजून घेणं, समाजासाठी काही तरी करण्याची तयारी दाखवण आणि कृती करण, घरात आणि बाहेर सकारात्मक वातावरण तयार करण किती गरजेचं आहे असं आपण खूप बोलतो. पण रुपया, दोन रुपयात, कमी गरजांमध्ये समाधानी राहणाऱ्या आजी सारख्या लोकांकडून स्वत: आनंदी राहण्याची कला शिकलो तरी खूप झालं अस वाटत. करूया का प्रयत्न?  

 

Saturday, 5 December 2020

 

 



                                                     पुनर्जन्म

‘कंटाळले मी आता या आयुष्याला. कोणासाठी आणि का जगू? त्यापेक्षा मी स्वत:ला संपवते. फक्त नक्की संपेल ना हा त्रास?  निदान मेल्यावर तरी… हो , नक्कीच संपेल. आप मेला जग बुडाला, मला काय मग जगाची पर्वा. माझी कोणी केलीय? या सगळ्या गोळ्या घेते आणि संपवते सगळं.’

डोक्यातले विचार थांबून एकाच विचाराचं गारुड निर्माण झालं होतं. सगळं संपवायचं. तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं. तसं तिथे कोणीही नव्हतच म्हणा.

पण अचानक खिडकीवर बसलेला एक सुंदर पक्षी म्हणाला, ‘काय करते आहेस? म्हणजे इतक्या गोळ्या एकदम?’

ती चक्रावली, देव या संकल्पनेवर तिचा फार विश्वास नव्हता. पण हिंदी सिनेमामध्ये दाखवतात तसा देव प्रकटला की काय, असं वाटून चमकून तिने पाहिलं. चक्क तो पक्षी बोलत होता तिच्याशी,

‘तुला काय करायचंय?’

‘मी स्वत:ला संपवणार आहे.’

‘का?

‘कारण …. कारण…… ज्या ज्या लोकांवर विश्वास ठेवला आणि प्रेम केलं त्यांनी मला दुखावलं’

‘ बरं मग? त्यात काय?’

‘त्यात काय? म्हणजे तुला माझ्या भावना कळत नाहीयेत कदाचित. मी इतकी शिकलेली, संवेदनशील आणि हुशार. माझ्या वाट्याला हा अपमान. मला नाही सहन होत. खूप राग आलाय मला. ’

‘कोणी केला तुझा अपमान?’

‘सगळीकडून होतोय. घरी – दारी. किंमत नाहीये या लोकांना माझी. घरात सगळ्याचं सांभाळून घडवलं आहे मी माझ करिअर. जिथे काम करतीय तिथे सुद्धा मन लावून, जीव ओतून केलंय आजवर. त्याची ही फळं?’

‘फक्त यामुळे इतका टोकाचा विचार?’

‘तू कोण ठरवणार हे? हे फक्त आहे का? अजून पण आहे खूप…’

‘बर मग सांग तरी’

‘आपली म्हणवणारी माणस असं कस वागू शकतात? मी तर मुद्दाम कोणाला दुखवायला गेले नाही मग माझा अपमान करायचा अधिकार यांना कोणी दिला? आणि एक सांगू, एखाद्या वेळी झालं असत तर मी सुद्धा इतका टोकाचा निर्णय नसता घेतला. पण हे आता रोजचं झालंय. मी कशी चुकीची आहे, मला कस काहीच कळत नाही, मी जे करते ते काही उपकार करत नाही, गेलीस उडत – तुझ्यावाचून काही अडत नाही.. हे असल बोललं जातं मला. कोणासाठी करते इतक सगळं? घरात अशी तऱ्हा आणि बाहेर केलेल्या कामाचे पैसे देतात म्हणून काय वाट्टेल ते बोलायचं? यांना काय करायचंय माझ्या personal आयुष्यात काय चालू आहे?’

‘पण जर तुला माहिती आहे, तर का इतका त्रास करून घेतेस ?’

‘होतोय त्रास, करून नाही घेते. आणि हा त्रास असा नाही संपणार मी गेल्याशिवाय.’

‘बर मग तू गेल्यानी सगळं बदलेल ना?’

‘ते मला नाही माहिती. पण नाही समजू शकते मला कोणी. किती सांगायचा प्रयत्न केला तरी.’

‘मला एक सांग, तु तुला समजू शकते आहेस न?

‘म्हणजे काय? हो.’

‘त्रास कोण देतंय?’

‘सगळे’

‘कोण करून घेतंय?’

‘मी’

‘मी तुला म्हणतो, वेडी आहेस तू , आयुष्यात काही नाही करू शकलीसआणि करू शकणार पण नाहीस’

Mind your language, तुला कळतंय का काय बोलतो आहेस ते? अस अजिबात नाहीये. कोणी काहीही बोलावं आणि मी ऐकावं याला काय अर्थ आहे.’

‘तुझ्याच भाषेत बोलायचं तर, there you are … तुला कळतंय की माझ्या बोलण्याला इतकं महत्त्व द्यायची गरजच नाहीये. तेच सगळं तू इतर लोकांच्या बाबत का नाही करत मग?

‘तुझा आणि माझा काही संबंध नाही ना.. पण बाकीच्या लोकांचं तसं नाहीये.’

‘म्हणजे त्यांचा आणि तुझा संबंध आहे तर’

‘होच म्हणजे’

‘मग ते बोलले तर इतकं का रागवायचं?’

‘याला काय अर्थ आहे? आपले असले म्हणून वाट्टेल ते बोलतात, असं कस चालेल?’

‘जर ते तुझे आहेत, तर त्यांनी असं काही करायला नको, हा एक मुद्दा. दुसरं, जर तुला ते आपले वाटतात तर त्यांचं बोलणं मनावर लावून घ्यायला नकोय.’

हळू हळू त्याच्या बोलण्यात तिला तथ्य वाटू लागलं.

‘हे बघ, आपली माणस म्हणजे असं आपल्याला वाटत असत… जाऊदे…   हा तर आपली माणस बोलली तर इतक चिडायचं कारण नाही. आणि जी आपली नाहीत, म्हणजे माझ्यासारखी ती बोलली तर मघाशी जस मला ignore केलस तसं करायचं.’

‘पण मग अपमान आणि राग त्याच काय?’

‘इथे एक गम्मत सांगतो ऐक, राग काय किंवा कुठलीही भावना आपल्याला गुलाम बनवते. म्हणजे राग म्हणेल तसं आपण करतो. म्हणजे तु गुलाम आहेस का?’

‘अजिबात नाही, मला गुलामीचे जोखड मान्यच नाहीत’

Good, मग कोणाचीच गुलाम नको बनू. न व्यक्तीची, न भावनेची, स्वत: मालक हो. म्हणजे बघ आपण क्रिया करतो तेव्हा आपण मालक असतो आणि आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण गुलाम बनतो त्या भावनेचा. आपल्याला गुलाम बनवायला रोज नवीन जाळ तयार केलं जातंय. पण गुलाम न होता क्रिया करता यायला हवी. आम्ही पक्षी बघ घरट अगदी कष्टाने विणतो. पण ऊन, वारा, पाउस यामुळे घरट पडलं तर पुन्हा त्याच जोमाने नवीन घरट बांधतो.’

‘तुम्हा पक्षाचं बर आहे रे, तुम्हाला काय येत नाही depression वगैरे.’

‘वेडी आहेस, अस अजिबात नाही. भावना आम्हाला सुद्द्धा आहेतच की, पण आम्ही गुलाम बनून राहत नाही तुम्हा माणसांसारख. एक गोष्ट सांगतो तुला, एक वकील होते, अगदी निष्णात वकील.  त्यांना केस लढत असताना कोटाच्या बटणाशी खेळण्याची सवय होती. त्या सवयीने ते केस जिंकत होते का? तर नाही. त्यांना ती सवय लागली होती. पण त्यांची ही सवय त्यांच्या विरोधकांनी हेरली. पैसे देऊन त्यांच्या Assistantला ते बटण काढायला लावलं. वकील साहेब कोर्टात उभे राहिले आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं. पण त्यावेळी ते काहीच करू शकत नव्हते. ते अस्वस्थ झाले आणि घाम फुटला त्यांना. मटकन खाली बसले आणि चक्क केस हरले.’

‘कस काय पण? इतकं काय त्या बटणाच?’

‘हा… हे तुला आणि मला वाटतय, पण त्यांना त्या सवयीने पूर्ण व्यापलं होतं. परिणाम एकच झाला. इतके मोठे वकील पहिल्यांदाच केस हरले.’

‘बापरे, कसं न दुर्दैव?’

‘दुर्दैव? मला नाही वाटत.’

‘मग तुला काय म्हणायचं आहे?’

‘ती सवय, त्या सवयीची त्यांनी पत्करलेली गुलामी. यामुळे झालं सगळ. आपण सगळ करावं. अगदी काहीही, पण कशाचाही गुलाम न बनता. आयुष्यात आनंदी रहाव असं बरच काही आहे. करण्यासारख काही नाही ही भावना पण त्रासदायक आणि खूप काम आहे म्हणून येणारा ताणसुद्धा त्रासदायक. या त्रासाची गुलामी नाही स्वीकारायची.  कारण स्वत:ला हरवून मिळवण्यासारखं या जगात काहीही नाही.’

तिने त्या गोळ्या बाटलीत केव्हा भरल्या तिचं तिलाच समजल नव्हतं. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी… असं गुणगुणत टी उठली, आल्याचा चहा करायला. खिडकीवर तो सुंदर पक्षी नव्हता… उडून गेला मुक्तपणे उडण्यासाठी.  

 

 

 

 

 

 

 




Thursday, 10 September 2020

 


जादुगार....


कोण आहेस तू?  जादुगार आहेस का? आणि मनकवडा सुद्धा? तुला कसं कळत मला तुझी गरज आहे. या मोसमात खूप वेळा आलास तू मला भेटायला. पण मी माझ्याच धुंदीत, खरं तर माझ्याच रडगाण्यात मग्न होते. गेले काही महिने मनावर इतकी काजळी साचली होती की सगळं धूसर दिसायला लागल होतं. कळत होतं हे असच राहणार नाही. पण तरी मन मानत नव्हतं.

तसं आज सकाळपासून सुद्धा फार काही छान वाटत नव्हतंच. पण दुपारी एकदम मळभ आलं. तू मला खुणावत होतास खिडकीतून. तसं तू खूप वेळा खुणावलंस. पण मला कळून सुद्धा मी उगाच आपल्या कोशात होते. पण तू पण असा हट्टी आहेस ना... शेवटी माझा मूड बदलवण्यात तू बाजी मारलीस. आज तुला मन भरून पाहिलं. तुझ्या सरींमध्ये मन चिंब भिजवलं. तुझा शीतल शिडकावा एक वेगळा गारवा देऊन गेला. मनाची काहिली थांबली.

काही लोकांना वाटेल हा पहिला पाऊस थोडी आहे.. पण माझ्यासाठी हा पहिला पाऊस ठरलाय. कारण जगात कित्येक गोष्टी आधीपासून अस्तित्वात असतात. पण जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो तेव्हा तो आपला पहिला अनुभवच असतो. आज माझं तसं काहीस झालंय. तसा हा अनुभव सुद्धा नवा नव्हता. पण तुझी हीच तर जादू आहे, प्रत्येक वेळी तू  आनंदाची बरसात करतोस.

तुझं येणं किती वादळी, अगदी मला आवडत तसं. सगळं एकदम रानटी. चित्रच बदलून टाकतोस तू. रस्त्यावर अचानक जोरजोरात हॉर्न वाजायला लागतात. लोकांची धावपळ होते. भिजायचं नसत ना म्हणून. का तर म्हणे सर्दी, खोकला होईल. पण तुझ्यामुळे काही होत नाही. असं निदान मला तरी वाटत. कारण मी बऱ्याचदा तुला भेटायचं म्हणून छत्री न घेता बाहेर जाते. तुला खिडकीतून नुसत तासनतास पाहणं हा जबरदस्त अनुभव आहे. त्यापेक्षा जास्त छान आहे तुझ्या सरी अनुभवणं.

मनातलं सगळ अमंगल घालवतोस तू. गाडीला जसं सर्विसिंग लागतं ना तसं आहे तुझं. तू एकदा मस्त बरसून, भिजवून गेलास की मग चांगलं वाटायला आणि घडायला सुरुवात होते. हा पण हे त्यांना जाणवेल जे तुझ्यावर प्रेम करतात.. अगदी मी करते तितकं. हे प्रेम जरा वेगळ आहे. तू फक्त देतोस रे, काही नको असत तुला. रुसलेल्या प्रेयसीला जसं मनवतात ना तसं करतोस तू.  आधी मेघ गर्जना, मग झोंबणारा वारा, दार खिडक्या आपटतील इतका कांगावा हे सगळं work करत नाही असं कळल की धाडधाड कोसळतोस, इतका की मनातला राग कुठच्या कुठे पळून जातो. आणि तू बरसून गेल्यावर तर काय बोलणार बाबा? विकेट उडते. काय सुंदर वातावरण होतं. लबाड तर इतका आहेस ना, बरसून गेल्यानंतर इतका शांतपणे बघत असतोस आणि भासवतोस की जसं काही झालचं नव्हतं.

पण तुला काय माहित, तू काय देऊन जातोस ते. प्रेम, वात्सल्य, चैतन्य, आशा, उमेद अशा सगळ्या भावना तुझ्या येण्याने येतात. आपलं तर नातच वेगळं आहे. तुला thanks तरी कशी म्हणू... कारण तू काही कोणी परका नाहीस. मला हवं असताना किंवा नको असताना तुझं हे येणं आणि माझा मूड एकदम ओके करणं हे मात्र असच ठेव हं....

Wednesday, 25 March 2020



नवा संकल्प ......



गेलं वर्षभर किती कोसळलास. सगळे अगदी वैतागले इतका. पण मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी माझ्यातच मशगुल. खर सांगू का रे, तस सुद्धा नव्हत. मी माझ्यात मशगुल नव्हते. मी माझ्यातच नव्हते. कुठे होते? शोधते आहे स्वत:ला. माझं आणि तुझं नात फक्त मला आणि तुलाच माहिती आहे. मला ते तसच हवंय. या वर्षी वारंवार तू आलास रे. पण मी ? काय चालू होतं माझं? जगरहाटी प्रमाणे सगळ काही चालू होत. पण जगण्यातला अस्सलपणा तो कुठे तरी हरवला होता.

मी जरा विचित्र आणि हट्टी आहे. माझ्या मनातला कचरा साफ करण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस. त्या पायी सगळ्यांच्या शिव्या सुद्धा खाल्ल्यास. आज सुद्धा खाणार आहेस. पण माझ्या विचित्र वागण्याने मला तुझा इशारा कळलाच नाही. माणसांमध्ये अडकलेल्या खोट्या कल्पना विश्वात मी इतकी रममाण झाले की आपल्यामध्ये असलेल्या अव्यक्त नात्याचा मला विसर पडला. पण एक गोष्ट सांगते हा तुला, मी हे मुद्दाम नाही केलं. दिवस कुठे उजाडला आणि कुठे मावळला कळत नव्हत. सोबत होत एक बोजड ओझं. वाकून आणि दमून गेले. गेल्या काही दिवसांमध्ये मला हे प्रकर्षाने जाणवलं आहे की, मी खूप दुखावलं आहे तुला आणि स्वत:ला. न सुटणारी कोडी सोडवत बसले आणि उगाच कष्टी होत राहिले.

आज  तू पुन्हा आलास. अगदी अवेळी. पुन्हा सगळ्यांच्या शिव्या खायला. एक भयानक विषाणू धुमाकूळ घालतो आहे आणि त्यात तू आलास. सगळे म्हणतात तू हा आजार अजून वाढवणार. पण अगदी खर सांगू, मला नाही वाटत तस. कारण साचलेलं सगळं वाहून नेण्यासाठी येतोस तू. आत्ता सुद्धा तू तसच कर. माझ्या मनातील विचारांचा सुगावा तुला कसा लागती माहिती नाही. पण आज एक वेगळाच सूर मनात उमलला आहे. त्याचं सुरेल गाणं करायचय मला. माझ्यात दडलेल्या मला शोधून काढायचं आहे. अर्थात हे श्रेय तुला. ज्याच्याकडे हरण्यासारखं काहीच नसते तो जिंकतो. तू असच सांगतोस न मला नेहमी? आपल्या आनंदाचा रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊ नकोस. तू नेहमी सांगतोस मला. संवाद माझ्याकडून कमी झाला. तो वाढवण्यासाठी आज तू आलास. कोणताही अहंकार न बाळगता. नाही तर अहंकारी लोकांचाच पसारा आहे रे सगळा. मध्यंतरी मला कोणी तरी म्हणल, तू डोक्याने विचार करू लागलीस. तुझा तो वेडेपणा कुठे गेला?  ठेहेराव हवाय अस सुद्धा कोणी तरी म्हणल. सगळं संपल आहे असं वाटतं तेव्हा’ नव्याने फुलवणारा जादुगार आहेस तू. तापलेल्या धरणीला शांत करणारा सखा आहेस तू. वठलेल्या वृक्षांना नवी पालवी फुलवणारा आहेस तू.  तुझ्या संगतीचा इतका परिणाम व्हायला हरकत नाही, नाही का?  

आज प्रकर्षानी जाणवलं ... नव्या वर्षी नवा संकल्प...  मस्त असत वेडेपण, स्वस्त असत वेडेपण...



Saturday, 7 March 2020


मी माझी...


उद्या जागतिक महिला दिन आहे. तिच्याविषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातील, लिहिल्या जातील, तिच्याविषयी गौरवोद्गार काढले जातील. म्हणजे हे सगळं व्हायला हवंच. पण मुळात स्त्रीला, तिच्या मनाला नेमकेपणाने कोणी समजू शकलं आहे का? अगदी स्वत: ती तरी ओळखते आहे का स्वत:ला?
मला वाटत जागतिक महिला दिनी प्रत्येकीनी स्वत:चा शोध घ्यायला सुरुवात करायला हवी. नाव, आडनाव, पैसा, करिअर यापलीकडे जी आहे तिला शोधायला हवं.  स्वत:च्या गुणांचा, ताकदीचा स्वत:च्या आनंदासाठी उपयोग करायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीत स्वत:ला दु:खी करणं थांबवायला हवं. उलट लहान लहान गोष्टींमध्ये स्वत:चा आनंद शोधायला हवा. मला स्वत:ला माझ्या व्यतिरिक्त कोणीही सुखी किंवा दु:खी करू शकत नाही; ही खुणगाठ मनाशी बांधायला हवी. स्त्री स्त्रीची शत्रू असते हे वाक्य बदलणं आपल्या हातात आहे. एकमेकींना समजून घ्यायला हवं. आपणच एकमेकींना समजून घेतलं नाही तर पुरुष वर्गाकडून ही अपेक्षा करणं चूक आहे. ट्रेनमध्ये लेडीज डब्यापेक्षा जनरल डब्यात लगेच जागा करून दिली जाते किंवा समजून घेतलं जातं, अशी वाक्य थांबवणं आपल्या हातात आहे. संवेदनशीलता हा दागिना हौसेनी मिरवता येणं खूप आवश्यक आहे. मला कोणीही दुखावलं तरी माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं म्हणजे संवेदनशील असणं  ही चुकीची धारणा मनातून काढून टाकून, सहसंवेदना जपणारी मी संवेदनशील असं समीकरण जमलं पाहिजे.  असं म्हणतात की, “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” मग आपण एकमेकींना किती कळलो आहे हे समजून घ्यायला हवं. असं वाटत की, स्त्रीनी स्त्रीला समजून घेतलं तर पुरुषाला स्त्रियांना समजून घेणंसुद्धा सोपं जाईल.  मुळात कोणी आपल्याला समजून घ्यावं यापेक्षा मी मला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. माझ्यात असलेल्या गुण दोषांसहित मी मला स्वीकारलं की एक वेगळा आनंददायी प्रवास सुरु होईल. प्रत्येकीनी असं शोध सुरु केला की तेजस्विनीच्या कवितेप्रमाणे जाणवेल....  
खुशाल ती ही खुशाल आता, तिच्या नशेला रुबाब आहे.
तिला बिचारी करेल जो ही, तिचा तयाला नकार आहे.    

Friday, 1 November 2019


आपल्या अस्तित्वाचं महत्त्व...




हारणं कोणाला आवडतं? तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न? जिंकायलाच आवडतं सगळ्यांना पण काल एक दुर्दैवी घटना घडली. I will win, not immediately, but definitely असं  माझी लाडकी मैत्रीण निशा कायम म्हणायची. पण दुसऱ्यांना जिंकणं शिकवणारी निशा स्वत:च्या भावनांवर विजय मिळवू शकली नाही. निशाच्या जाण्यानी मन सुन्न झालंय. हजारो प्रश्न मनात निर्माण करून निशा गेली. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आता?
निशानी आत्महत्या केली या घटनेमुळे माणसाचं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा कळलं. एरवी खंबीर, निर्भीड आणि कणखर वाटणारी निशा इतका टोकाचा निर्णय घेऊ शकते यावर विश्वास बसला नाही. निशा गेलीय, काहीही केलं आणि कितीही रडले तरी ती परत येऊ शकणार नाही. पण अजून अशा कितीतरी "निशा" मृत्युच्या दरीत लोटल्या जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण अतिशय प्रगल्भ अशी निशा जर असं वागू शकते तर मनानी कमकुवत मैत्रिणींची काळजी वाटायला लागते. अगदी स्वत:ची सुद्धा...
अशा व्यक्ती जाणं फक्त त्यांच्या कुटुंबाच्या नाही तर समाजाच्या दृष्टीनी हानिकारक आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे मग? कारण निराशेचे क्षण सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहेतच. घटना, परिस्थिती किंवा आपल्या जवळची वाटणारी माणसं आपण खोल गर्तेत जाण्याला कारणीभूत होऊ शकतात. त्यावेळी स्वत:ला महत्त्व देणं विसरून असे प्रकार घडू शकतात. अगदी शहाणी, शिकली सवरलेली माणस असं वागू शकतात. मनात दु:ख दाबून आनंदी राहण्याचा आभास निर्माण करणाऱ्या माणसांच्या बाबतीत अशा घटना अनाकलनीय होऊन बसतात. त्या त्या वेळी मनानी जगणं नाकारणं हे कसं घडतं माहित नाही. पण हा निर्णय अचानक झालेला नसतो. प्रोसेस असते ती. एखादी अशी घटना घडते आणि मग मृत्यूच जवळचा वाटतो. खरं म्हणजे तिने लढायला हवं होतं. जीव काही इतका वर आलाय का? या आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया अगदी बरोबरच आहेत. पण स्वत:चं जगणं नाकारण्याइतकी निराशा किती भयंकर असेल. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच आपण सुरु केलेल्या कामाचं काय होईल हा विचार सुद्धा मनाला शिवत नसेल का? हो... नसेल शिवत हा विचार. कारण मी जाण्यानी सगळे प्रश्न सुटतील असं वाटू लागत असेल. अशा वेळी मन आणि बुद्धी असे दोन भाग न राहता, एक विचित्र गारुड मनावर राज्य करत असेल.   
पण एक नक्की, या भयानक विचारांवर मात करता आली पाहिजे. अगदी बेसिक म्हणजे आपलं स्वत्व हरवू देता काम नये. आपल्या स्वत:पेक्षा अशी कोणतीही व्यक्ती महत्त्वाची नसायला हवी. कारण ज्या व्यक्तीसाठी आपण स्वत:ला संपवण्याचा विचार करतो तिला खरच काही फरक पडणार आहे का? ज्या घटनेमुळे आपण असा निर्णय घेतला त्या घटनेत आपल्या जाण्याने आपल्याला अपेक्षित बदल घडणार आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारण्याचं भान कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहायलाच हवं. स्वत:वर प्रेम केलं पाहिजे आधी, तर दुसऱ्यावर प्रेम करता येईल. आत्मकेंद्री असणं आणि स्वत:वर प्रेम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हं. पण बऱ्याचदा बाह्य गोष्टींना आपण इतकं महत्त्व देतो की त्यापुढे आपलं अस्तित्व लक्षातच घेत नाही. एक मात्र प्रकर्षाने जाणवलं, मनानी खंबीर किंवा हळव असं काहीही अशा प्रसंगात उपयोगी पडत नाही. अशा वेळी उपयोगी पडणार आहे ते म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपल्याला उमजलेलं महत्त्व. आपलं चांगलं किंवा वाईट दुसऱ्या कोणामुळे होत नाही. त्याला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आयुष्याची बिघडलेली चव दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आहे. पदार्थ फेकून देणं हा पर्याय योग्य नाही. कारण उत्तर नाही असा एकही प्रश्न या जगात नाही.  
                                                                                                                    डॉ. विनया केसकर