Friday, 21 May 2021

 

हवास मज तू…



काल परवाची गोष्ट, तुला कोणीतरी अवकाळी म्हणलं आणि अमानुष सुद्धा. म्हणे जरा माणसासारखा वाग…पण मला एक कळल नाही माणसासारखा म्हणजे कसा?  खर तर आत्ता तू माणसा सारखाच वागतो आहेस
, नाही का? बेभरोशी, माणुसकी सोडून, आत्मकेंद्री, स्वत:ला हवा तसा, अहंकारी… हे सगळं तुला नव्हतं हा,  प्लीज गैरसमज नको करून घेउस. माणूस माणसासारखा वागत नाही आणि तुला नावं ठेवतो ना म्हणून बोलले इतकं. नाही तर तुझ्यासारखा मित्र आहे का कोण?

मागे एकदा तू असाच आला होतास अचानक, धुंवाधार. माझ्याशी बोलायला. माझ्या मनातले आणि डोळ्यातले अश्रू स्वत:चे समजून माझ्या गालावरून ओघळला होतास. तुला कळल ते अश्रू आहेत पण सगळ्यांना वाटलं तू आहेस. मला तेव्हा सुद्धा तुझ्या सोबत असण्यानी किती आधार मिळाला होता, तुला बोलले सुद्धा मी, आठवतंय ना? मी तुला म्हणाले होते, ‘तू मला खूप आवडतोस. कारण माझ्या मनात आणि चेहेऱ्यावर असलेल्या खऱ्या भावना कोणाला कळू देत नाहीस. कारण त्या कोणाला कळू नयेत यासाठी खूप धडपड केलेली असते ना त्यावेळी. तुझ्यामुळे ती धडपड सफल होते.’

तू आलास की अजून एक फायदा होतो, मी किती लहान आहे. माझं अस्तित्व तुझ्यापुढे काहीच नाही याची जाणीव होते आणि सगळा मी पणा वाहून जातो, तुझ्या सोबत. तू धाडधाड कोसळतोस आणि सगळी दारं – खिडक्या आपटवून दाणादाण उडवून लावतोस. तेव्हा कळत आपण नीट लावून ठेवलेलं सगळं किती क्षणभंगुर आहे.

तुझ्या येण्याने आलेला गारवा, बदललेलं वातावरण माझ्यासाठी तर संजीवक असत. मला कधीच तू येण्याने झालेल्या चिखलाचा राग नाही आला. कारण प्रत्येक वेळी तुझा मोसम नसताना तू येतोस ना, तेव्हा माझ्यासाठी येतोस, मला माहितीय. या वर्षी मी जरा अतिपणा केला. म्हणजे तू येत होतास पण माझ्याच विचारांमध्ये इतकी अडकले होते की तू आपला सारखी धडधड करत होतास दाराशी. पण मीच जरा दुर्लक्ष केलं. पण आज तू जिंकलास, नेहमीप्रमाणे. दिवे नसताना मनातला दिवा लावलाच आज, तुझ्यासाठी.

आता सगळ छान होणार. मला माफ कर, बोलायला हवं होतं वेळेतच तुझ्याशी. पण हे किती छान आहे ना रे, आपल्या नात्यात इगो नाहीच. म्हणजे, मी कशीही वागले तरी तू परत परत येतोस आणि तू वेड्यासारखा वागलास तरी मला कायम नवा वाटतोस, तितकाच हवाहवासा.

Thursday, 20 May 2021

 


 

उर्जेचं आगार

“ काय मावशी, भेंडी कशी दिली?”

“घे बाय तुला काय हवी तशी”

“असं कसं हो मावशी? काही तरी सांगा ना”

“तशी १० रुपये पावशेर आहे. बर चल, दे ३० रुपये आणि घेऊन जा किलोभर. “

“छे, इतकी काय करू नेऊन. मला अर्धा किलो द्या आणि घ्या हे वीस रुपये”

“इतके काय करायचेत. ५ रुपये कमी दे”

“असुदेत, १ किलो घेत होते म्हणून ३० रुपये म्हणालात ना?”

“ हो ग बाय, पन घे तुला हवी तर”

“नको मावशी, अर्धा किलोच द्या. काय हो? कुठे राहता?”

“हे काय मागल्या अंगाला.”

“तुमच्याकडे लॉकडाऊन नाही का?”

“आमच्याकडे नाय ते तसलं काही. रेशनच दुकान चालू आहे, भाज्या बी मिळतात. काय नाय लॉक डाऊन बिक डाऊन”

“मावशी, तुमच्या भाषेत बोला कि माझ्याशी”

“माझी कातकरी भाषा , तुला नाय कळणार”

असं म्हणून सुरकुतलेल्या गालात गोड लाजलेली आजी डोळ्यासमोरून हालत नाही. परवा एका कामानिमित्त कर्जत फाट्यावरून येत असताना करवंद घेण्याचा मोह आवरला नाही. तिथे भेटली ही आजी. करवंद घेता घेता कोवळ्या लुसलुशीत भेंडीवर नजर पडली आणि टिपिकल गृहिणी जागी होऊन भाजी घ्यायला गेले. तिच्या बोलण्यावरून लगेच कळत होतं की अनुभवाची शिदोरी आहे या आजीकडे. या सगळ्या संवादात माझ्या लक्षात राहिलेलं तिचं वाक्य म्हणजे, “आमच्याकडे नाय ते तसलं काही. रेशनच दुकान चालू आहे, भाज्या बी मिळतात. काय नाय लॉक डाऊन बिक डाऊन”

किती कमी गरजा आणि त्यामुळे किती समाधानी आयुष्य होत त्या आजीच. मनात आलं, आपण किती बाऊ करतोय लॉक डाऊन आणि आलेल्या परिस्थितीचा. खर तर अन्न, वस्त्र आणि निवारा याच आपल्या मुलभूत गरजा आहेत हे आपण लहानपणी शिकलो. पण मोठे होत गेलो आणि बेसिक विसरून गेलो. त्यातल्या त्यात अशा कठीण काळात तरी या तीनच आपल्या गरजा असायला हव्यात आणि माझ्या सारखी मध्यम परिस्थिती असणाऱ्या बहुतांश लोकांच्या या गरजा नक्कीच पूर्ण होतायत. मग तरी आपण तक्रार का करतोय? असं मनात आलं. रेशन आणि भाज्या मिळतायत अजून काय हवं? हे आजीच साध सोपं तत्वज्ञान किती शिकण्यासारख आहे.

Online कुर्ता अजून आला नाही, मोबाईल मिळण्यासाठी पण वाट पहावी लागते आहे, घरात घालायची चप्पल (extra) आलीच नाही, हेडफोन पार कामातून गेलेत पण या लॉक डाऊन मुळे काहीच मिळत नाहीये. किती पुस्तकं घ्यायची आहेत यार, (जी आहेत त्यांच्याकडे ढुंकूनही बघायचं नाहीये), लोकल नाही, हे नाही , ते नाही…. आपली यादी संपतच नाही.

मनोरंजनाची अमाप साधनं, तीन , चार वेळेस वेगवेगळ खायला, कपड्यांनी भरून वाहणारं कपाट, online सुविधेमधून जवळपास सगळं मिळण्याची परिस्थिती असं सगळ असताना आपल्याला अजून काय हवंय? मला वाटत, थोडं थांबून विचार करायला हवा. परिस्थती कधीच अशी राहत नाही, हे माहिती असून सुद्धा सकारात्मक राहण्यासाठी इतकी धडपड का करावी लागते आहे? यापैकी काहीही नसताना, सोयी – सुविधा नसताना ती आजी आनंदी कशी राहू शकते? विचार करायला हवा आणि आचरणात आणायला हवा. नाही का? अशा काळात एकमेकांना आधार देणं, समजून घेणं, समाजासाठी काही तरी करण्याची तयारी दाखवण आणि कृती करण, घरात आणि बाहेर सकारात्मक वातावरण तयार करण किती गरजेचं आहे असं आपण खूप बोलतो. पण रुपया, दोन रुपयात, कमी गरजांमध्ये समाधानी राहणाऱ्या आजी सारख्या लोकांकडून स्वत: आनंदी राहण्याची कला शिकलो तरी खूप झालं अस वाटत. करूया का प्रयत्न?