Sunday, 26 February 2017

जनप्रियत्व .....



अपेक्षा हे सगळ्या दुःखांच मूळ असं म्हटलं जातं. पण तरी आपण त्या ठेवतोच. अपेक्षेप्रमाणे झालं तर आनंद होतो. पण अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर वाईट वाटतं. हा माणसाचा स्वभाव असतो. एखाद्या व्यक्तिवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास दाखवला आणि ती व्यक्ती अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर त्रास होतो. पण नीट विचार केला तर लक्षात येतं की, अपेक्षा आपली असते. ती व्यक्ती तिच्या स्वतःच्या अपेक्षेप्रमाणेच वागते. त्यामुळे त्रास तरी करून का घ्यायचा ? अपेक्षित सुख  - दुःखापेक्षा , अनपेक्षित सुख दुःखात माणसाची खरी कसोटी लागते. अनपेक्षित सुखाचा काही प्रॉब्लेम नसतो. कारण ते हवहवसं वाटतं. पण अनपेक्षित दुःखानी माणूस कोलमडतो. या सगळ्यातून सही सलामत सुटणं वाटतं तितकं सोप नाही. 
या समस्येवर देखील प्रेमानी मात करता येते. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे ? पण या सगळ्यावर रामबाण औषध म्हणजे प्रेमच. प्रेमानी जग जिंकता येतं. संतांकडून जनप्रियत्व शिकावं. कारण जो लोकांना आवडतो तोच देवाला आवडतो असं म्हटलं जातं. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपल्यापुरते न पहाता जगण्याचा प्रयत्न केला की हे सहज जमेल. प्रेमाची उत्कट अवस्था म्हणजे भक्ती. अशी भक्ती ज्याच्या मनात असेल त्याला असं वागणं सहज शक्य आहे. ज्या व्यक्तीवर, भावनेवर  आपलं प्रेम आहे तेच प्रेम आपल्या वागण्या - बोलण्यातही हवं. प्रत्येक माणूस कशावर ना कशावर प्रेम करतोच ना... कोणाचं व्यक्तीवर प्रेम, कोणाचं पैशावर, कोणाचं प्रतिष्ठेवर प्रेम तर कोणाचं कर्तृत्वावर, कोणाचं जातीवर प्रेम तर कोणाचं धर्मावर, कोणाचं स्वतःमधल्या सूडाच्या भावनेवर प्रेम तर कोणाचं स्वतःमधल्या क्षमाशील वृत्तीवर , कोणाचं निसर्गावर प्रेम तर कोणाचं देवावर, कोणाचं कलेवर प्रेम तर कोणाचं कामावर....  मग तेच प्रेम , तीच भावना सर्वत्र दिसायला लागली की अपेक्षा, दुःख, द्वेष, सूड या भावनांना काही अर्थ तरी उरतो का? 
आपलं कशावरच प्रेम नसेल तर मग कठीण आहे... सॉरी सोप्प आहे. मग आपण हवे नकोपणाच्या पुढे गेलोय असं म्हणायला हरकत नाही. मग आपल्या नजरेत सगळीकडे समता नांदायलाच हवी. अपेक्षा, दुःख , वेदना या गोष्टींच्या पुढे नेणारी अवस्था आहे ही. प्रेमात असाल किंवा प्रेमात नसाल काही प्रॉब्लेम नाही. जनप्रियत्व मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.  संतांसारखं जनप्रियत्व मिळवण्यासाठी आपल्या विचारांमध्ये परिवर्तन येण्याची गरज आहे. आपण तरी सगऴ्यांचं भलं व्हावं असा विचार करावा. समोरच्यानी काय करायचं हा त्याचा प्रश्न आहे. जशास तसे न वागता मला हवे तसे म्हणजे प्रेमानी वागायला काय हरकत आहे ? कारण प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी चांगलं वागावं, मी मात्र हवं तसं वागेन... This is not fair boss... 
 प्रेम (कशावरही आणि कोणावरही) करणा-यांना अपेक्षाभंगाच्या दुःखाचा सामना करणं सोप आहे. प्रेम न करणा-यांचा प्रश्नच नाही. कारण त्यांना या दुःखाचा सामना करण्याची वेळ येतच नाही. साधं, सोप्प जगण्याचा प्रयत्न,  आनंद आणि समाधान नक्कीच देईल. प्रयत्न करूया ? 

Monday, 13 February 2017



प्रेमाचा प्रवास ......






आज प्रेमाचा दिवस... तसा रोजच असतो तो. पण प्रेम म्हणजे काय हे कळायला हवं. नाहीतर बाह्य गोष्टींना भुलून प्रेम केलं जातं पण ते अल्पायुषी ठरू शकत. काही वेळा ज्या व्यक्तीवर प्रेम केलय ती सोडून जाते, विसरते किंवा जगातून निघून जाते. काहीही असो. व्यक्तीवर केलेलं प्रेम काळाच्या मर्यादेत  केलं जातं. कोणी कितीही प्रिय असलं तरी प्रेम करण्यालासुध्दा मर्यादा आहेत. आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणूनच हे सांगावसं वाटतं की, व्यक्तीवर प्रेम केलं तर त्याला मर्यादा आहेत हे लक्षात घेतलच पाहिजे. कारण नंतर होणा-या त्रासापेक्षा याचा आधीच विचार केलेला बरा. 
मग काय ? .... प्रेम करायचच नाही का ? जरूर करायचं. पण व्यक्तीवर नाही, प्रेम या भावनेवर. तसं असेल तर ते प्रेम टिकवणं आपल्या मनावर अवलंबून रहातं. समोरचं कोण कस वागतय याला महत्त्वच उरत नाही. अजून एक वाटतं, खरच ज्याला आपल्या प्रेमाची गरज आहे त्यांना ते द्यावं. प्रेमाचं दानही सतपात्री असावं. कारण नको त्याला जेवायला दिल्यानी अजीर्ण होणारच. त्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे त्यांना ते द्यावं. 
कालच हा अनुभव आम्ही घेतला. माझ्या कॉलेजमधल्या मुलींना घेऊन काल आम्ही वानप्रस्थाश्रम या वृध्दाश्रमात गेलो होतो. कॉलेजचा कोणता प्रकल्प म्हणून नाही. आजी आजोबांना कडकडून भेटायला. आत्ताच्या मुलांना मोठ्यांविषयी आदर , प्रेम, जिव्हाळा नाही हे विधान काल मुलींनी खोटं ठरवलं. अगदी योगायोगानी व्हॅलेंटाईन डे च्या आदल्या दिवशी ही भेट झाली. आपल्या घरापासून लांब राहीलेल्या या आजी आजोबांना आपल्या प्रेमाची, स्पर्शाची किती गरज आहे हे प्रकर्षानी जाणवलं. एकटेपणा फार वाईट असतो. विशेषतः वृध्दपणी सोबतीची गरज असते. आपला जीवनसाथी मरेपर्यंत साथ देईलच असं सांगता येत नाही. कारण जन्म आणि मृत्यूवर माणसाची सत्ता नाही. जोडीदार नसला तरी मुलं आहेत ही आशा असते. त्यांनी आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असते. पण अपेक्षा हेच दुःखाचं मूळ. अपेक्षाभंग होतो आणि या आजी आजोबांची रवानगी वृध्दाश्रमात केली जाते.
काल मुली आणि आजी आजोबा अक्षरशः रडले. मुलींनी केलेले कार्यक्रम बघून आजी आजोबांना त्यांच्या नातवंडांची आठवण आली. मुलींनाही आजी आजोबांच्या सहवासानी भरून आलं. निघताना फार वाईट अवस्था झाली होती. लहान मुलं आईचा पदर धरून ठेवतं तसं आजी आजोबा सोडतच नव्हते. आमचाही पाय निघत नव्हता. आजी आजोबांसाठी मुलींनी खाऊ आणला होता. उभं आयुष्य आपल्या संसारासाठी खर्च केलेल्या आजी आजोबांना याचं खूप नवल वाटलं. मुलींनी त्यांना प्रेमानी खाऊ भरवलासुध्दा. डोऴ्यात पाणी आणि मनात आठवणी घेऊन आम्ही निघालो. आजी आजोबांनाही माहिती होतं की हे प्रेम औटघटकेचं आहे. तरी त्यांनी या सगळ्याचा आनंद घेतला. काही आजी आजोबा अजिबात मिक्स होत नव्हते. सुरूवातीला वाईट वाटलं. पण नंतर मनात विचार केला की, त्यांची तरी काय  चूक ? प्रेम या भावनेवरचा त्यांचा विश्वासच उडाला असेल. त्यांच मन त्यांच्याच लोकांनी इतकं दुखावलं आहे की, आता पुन्हा नव्यानी गुंतण त्यांना नको असेल. 
भरभरून प्रेम करणं यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. फक्त ते कोणावर करावं हे लक्षात घ्यायला हवं. ज्यांना गरज आहे त्यांनाच ते द्यावं. अशा अनेक जागा आहेत जिथे आपण आपल्या प्रेमाची बरसात करू शकतो. व्यक्तीवर केलेलं प्रेम अल्पायुषी ठरण्याची भीती असते. पण प्रेम या भावनेवर प्रेम केलं तर त्याला अंत नाही. चला तर मग.... निघायचं प्रेमाच्या प्रवासाला.... 


Thursday, 9 February 2017

अस्तानंतर असते सुरूवात ....



           माझ्या अतिशय आवडीच्या विषयावर बोलण्याचा, लिहिण्याचा दिवस जवळ येतोय. अगदी बरोबर व्हॅलेंटाईन डे ...  काही जणं म्हणतील , त्यासाठी ठराविक दिवसाची काय गरज आहे? प्रेम तर कधीही व्यक्त करता येतं.प्रेम म्हणजे प्रियकर प्रेयसीचच नाही बरं का...   पण नीट विचार केला तर लक्षात येतं की प्रेम व्यक्त करायला  आपण खरंच उत्सुक असतो का ? किंवा आपल्याला यासाठी वेळ आहे का? किंवा काहींना वाटेल,  प्रेम आहे मग ते व्यक्त करण्याची काय गरज ? इतक्या सगळ्या प्रश्नांना एक प्रतिप्रश्न,  मग प्रेम व्यक्त करायला जर एखादा स्पेशल दिवस असेल तर काय हरकत आहे ? कारण धावपळीच्या आजच्या काळात सगळेच स्पेशल दिवस इव्हेंट झालेत.
           गेल्या काही दिवसात प्रेम या भावनेची चीड यावी असं काही पाहिलं, वाचलं, अनुभवलं. मग वाटलं, खरं प्रेम म्हणून जो टाहो आपण फोडत होतो ती चूक होती का? अगदी निरपेक्ष नसावं पण प्रेम आहे याची जाणीव करून देणारं खरं प्रेम या जगात अस्तित्वातच नाही का ? कारण सगळीकडे स्वार्थमिश्रित प्रेमच आहे असं वाटायला लागलं होतं. काहीतरी हवं असल्याशिवाय लोक स्नेह वाढवत नाहीतआणि ते काम होताच अनोऴखी होतात. असल्या लोकांना न ओळखता येणं ही चूकच म्हणायला पाहिजे. कारण माणसं  ओऴखता न येणं ही त्या माणसांची चूक असूच शकत नाही. ती चूक आपलीच. बरं हीच चूक पुन्हा पुन्हा घडत असेल तर अंतरंग तपासायलाच हवं. काही वेळा बिचारं मनं इतकं थकून जातं की विचार करण्याची ताकदच संपून जाते. असं वाटतं , जाऊदे जे आहे तेच बरोबर आहे. मनाचा, विचारांचा हा आजार फार धोकादायक. अशा वेळी अनेक लोक गृहित धरून गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते. विचारांची ही क्षीणता मन बधीर करून टाकते. अगदी लहान सहान बाबतीत विश्वास उडून गेल्याचं एक भयंकर फिलींग हऴुवार मनाला पोखरत रहातं. 
            पण प्रत्येक गोष्टीला अंत ठरलेला असतो. या फेजलाही तो असतोच. झालेली पडझड, पानगळती विसरून पुन्हा नव्याने आशेची पालवी फुटतेच. सगळ संपलय असं काही नसतं, तो असतो मनाचा खेळ. आशा बगे या माझ्या आवडत्या लेखिकेच्या कथेतलं हे वाक्य खूप प्रेरणादायी आहे.. ''ज्यात पुन्हा काही सुरू करण्याची ताकद असते तो खरा अस्त...''  असा अस्त झाल्यानंतर झालेली सुरूवात कसली विलोभनीय असते. पावसाने सारी घाण, कचरा वाहून जावा,  तसं जखमा, त्याचे व्रण हे सगळं संपून जातं. पुन्हा एकदा नव्यानी, आनंदानी जगण्याची उमेद घेऊन येणारी ही सुरूवात.. पुन्हा एकदा प्रेम, विश्वास, श्रध्दा  या हऴुवार भावनांवर प्रेम करायला लावणारी ही सुरूवात... मनाला माहिती असतं की या सुरूवातीला अस्त आहेच पण त्या अस्तानंतरही असेल एक आशादायी सुरूवात.... प्रेमाच्या या महिन्यात प्रेम या विषयावर लिहावसं वाटलं त्या आशादायी विचाराला दिलसे थॅंक्स.  कारण आपलं ब्रीदवाक्य ठरलय बॉस... जगायचं तर आनंदानी....