मला वेड लागले.....
१४ फेब्रुवारी जवळ येतोय. माझ्या आवडत्या विषयावर बोलण्याचा दिवस. आता सगळीकडे वातावरण गुलाबी व्हायला सुरूवात झालीय. नव्यानी प्रेम करणारे, प्रेमात पडलेले आणि प्रेम जुनं झालेले असे सगळेच पुढच्या दोन , तीन दिवसात एकदम फुलऑन जागे होतील. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा की नाही, या वादात आपण नको पडायला. या मताशी मी सहमत आहे की प्रेम करण्यासाठी कोणत्या एका दिवसाची वाट बघण्याची गरज नाही. पण तरीही ते व्यक्त करण्यासाठी एखादा दिवस निवडला तर काय हरकत आहे ? महत्त्वाचं आहे प्रेम व्यक्त करणं.
आशाताई बगेंची एक मस्त कथा वाचली. प्रेमाचा वेगळा अर्थ सांगणारी. ती वाचुन प्रेमाचा अजुन एक अर्थ समजला. संकुचित अर्थानी प्रेम या भावनेकडे बघताच येणार नाही. एका विशिष्ट नात्यात अपेक्षित प्रेम मिळालं नाही तरी वेगळ्या नातेसंबंधातून ते मिळवता येतं. फ्रेमच्या बाहेर जाऊन, निरपेक्ष असं काहीतरी. दुस-याबरोबर स्वतःला घडवणारं प्रेम. या प्रेमाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे अपेक्षा ठेवण्याची इच्छाच होत नाही. कारण हे प्रेम कोणत्याही फ्रेममधलं नाही. अगदी निरपेक्ष असं जगात काहीच नसतं. पण या नात्यात त्या मानानी त्रास कमी होतो. आपल्याला हवं ते मिळालं तर आयुष्याची मजाच निघुन जाईल. कारण मग काहीतरी हवयं या इच्छेचा प्रवास संपेल. आपण आहोत तोपर्यंत इच्छा आकांक्षांचा हा प्रवास चालु रहातोच. त्या त्या वेळी पूर्ण न झालेल्या इच्छा कधीतरी डोकं वर काढतातच. त्यापेक्षा या इच्छांवर स्वार व्हायचं, आपण करत असलेल्या कामामधून. आजुबाजुला अशा अनेक गोष्टी, व्यक्ति असतात ज्या आपल्या त्या इच्छेपेक्षा कितीतरी पट महत्त्व द्याव्यात अशा असतात. कारण जगायचं तर आनंदानी असं एकदा ठरवलं की मग जगावर न रागवता प्रेम करावं अशा अनेक गोष्टी मिळतात.
मला वेड लागले प्रेमाचे.... असा भाव एकाच व्यक्तिपुरता ठेवला तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येऊ शकत. असं कोणी मिळालं आणि अपेक्षांची पुर्तता झाली तर प्रश्नच नाही. पण ब-याचदा असं होत नाही. पहिलं प्रेम, दुसरं प्रेम, तिसरं प्रेम असं काही नसतं . प्रेम हे प्रेम असतं, आपण गल्लत करतो ते एका ठराविक दृष्टीने त्याकडे बघुन. रस्त्यावरच्या कुत्र्याच्या छोट्याशा पिलाला थंडी वाजत असेल तर त्याच्या अंगावरून प्रेमानी हात फिरवणं, ज्यांना दोन वेळेस अन्न मिळत नाही अशा आपल्याच समाजातील काही लोकांसोबत सण साजरे करणं (फोटो काढुन घेण्यासाठी नाही), वृध्दाश्रमातल्या आजी आजोबांना वेळ देणं (देणग्या नाही), ओझं घेऊन जाणा-या एखाद्या कष्टक-याला मदत करणं, सगळ्यांकडे माणुसकीच्या नात्यानी पहाणं, आपण करत असलेल्या कामावर प्रेम करणं , आपलं एखाद्यावर प्रेम आहे का नाही याचा विचार न करता त्याला त्रास न देता त्याच्या सुखात आनंद मानणं याला प्रेमच म्हणतात ना ? मग असं प्रेमाचं वेड लागलं तर काय हरकत आहे ? हरिवंश राय बच्चन यांची ही कविता असं प्रेम करणा-यांसाठी आणि करू इच्छिणा-यांसाठी
प्यार किसी को करना लेकिन, कह कर उसे बताना क्या,
अपने को अर्पण करना पर, और को अपनाना क्या.
ले लेना सुगंध सुमनों की, तोड उन्हे मुरझाना क्या,
प्रेम हार पहनाना लेकिन,प्रेम पाश फैलाना क्या.
त्याग अंक में पले प्रेम शिशु,उनमें स्वार्थ बताना क्या,
दे कर हृदय हृदय पाने की, आशा व्यर्थ लगाना क्या....
No comments:
Post a Comment