Thursday, 4 June 2015


आला पाऊस..... 



काल रात्रीपासूनच तुझी मी वाट पहात होते. जेव्हा मला अगदी असह्य हुरहुर लागते तेव्हा तुझी आठवण येते. का ते माहिती नाही? तुझे नि माझे नाते काय ? हे जाणून घ्यावसंही वाटत नाही. कारण तू माझ्या मनात कधीही बरसू शकतोस. माझी परवानगी न घेता. कारण वेळेचं बंधन तुला मला नाहीच. कालपर्यंत होणारी जीवाची घालमेल तू कशी क्षणार्धात संपवलीस. जादुगार आहेस तू. वठलेल्या तनामनाला पालवी देणारा. सृजनाची पेरणी करणारा. तू आलास की तुझ्याविषयी काहीतरी बोलावसं वाटतच. मग सकाळीच घरातली कामं टाकून तुझं कौतुक करत बसले मी. तू आलास की माझं असच होतं. 
पाऊस सुरू झाला की हे असं काहीतरी होतं. एक मैत्रिण कायम चिडवते मला, '' या कवींना आणि लेखकांना पाऊस आला की काय होतं काय माहित ?  मला तर या पावसाचा राग येतो. चिकचिक, घाण. सगळे ड्रेस खराब होतात.''  पण तिचं या कानानी ऐकून त्या कानानी सोडून देते मी. कारण पाऊस खरच नवनिर्मितीची प्रेरणा घेऊनच येतो. 
पावसाची नुसती सुरूवात झाली की लगेच विविध भारतीला ''काली घटा छाये मेरा जिया तरसाये '' हे गाणं लागलं. अरे वा.... बाहेर  पाऊस बरसत असताना असलं सॉलिड गाणं ऐकताना काय मस्त वाटलं. लगेच व्हॉटस अॅप चे मेसेज बदलले. Happy Rainy Morning .... या पावसानीना सगळं बदलूनच जातं. सगळ्या वाईट , अप्रिय गोष्टींचा निचरा होऊन पाणी पुन्हा एकदा वहात होतं. पाण्याचं डबक जसं वाईट तसच मनातल्या विचारांच साचलेपणही वाईटच. पाऊस पडला की सगळच स्वच्छ होतं. पुन्हा एकदा नव्यानी जगायला शिकवतो पाऊस. आपण फार लहान गोष्टी मनाला लावून घेऊन आपलं जगण अवघड करतो. पाऊस या मनोवृत्तीला बदलतो. कोणताही भेदभाव न करता सगळीकडे बरसतो. हवेत गारवा आणतो. आपल्यालाही रागाच्या काही क्षणांना थंड करण्याची कला पावसाकडून शिकली पाहिजे. रागात राग मिसळून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा त्या रागावर प्रेमाचा शिडकाव केला तर पुढचे मोठे प्रश्न टळतील. नीट विचार केल्यानंतर आपल्यालाही पटत, उगाच चिडलो होतो आपण इतके. काही वेळा त्या त्या वेळेची परिस्थिती असते ती. ती वेळ गेली की सगळं नॉर्मल होतं. पण त्या वेळी असा विचार करणं कठीण असतं.  पावसाला आज हे छान जमलय. काल होणारी जीवाची काहिली कशी संपवूनच टाकली त्यानी.  पाऊस नसताना धुळीचे नुसते लोट उठत होते. पण पाऊस पडताच  सगळं कस शांत झालं. पाऊसच प्रेमाचा धडा शिकवतो. पाऊस आला की हवा ढगाळ आणि कुंद असली तरीही हवेत एक तजेला असतो. आयुष्यात असा ढगाळपणा हवाच नाही का ? 
तृप्त झाली शांत धरणी
मधुस्मिते हिरव्या कुरणी
रुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती
भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती

1 comment: