Monday, 15 June 2015

मना तुझे मनोगत .........




आज आशा बगे यांची एक खुप छान कथा वाचली.  ''अनोळखी ''  आशा बगे यांच्या सगळ्या कथा अगदी आपल्या जीवनात घडाव्यात इतक्या सहज आणि तरल आहेत. त्यांच्या कोणत्याही कथेत मुख्यत्वे स्त्रीच्या मनोव्यापाराचा विचार केला जातो.  कदाचित म्हणून मला त्या जास्त आवडत असतील. ''अनोळखी'' कथेनी माझ्या आवडत्या विषयाचा वेध घेतला.  आपलं मन एखाद्या डोहासारखं असत. कितीतरी वेळा मनात आलेले विचार योग्य की अयोग्य हे कळतच नाही. त्यांना थांबा म्हणलं तर ते थांबत नाहीत. कित्येकदा उगाच कातर, हळवं होत हे मन. आपल्या आजुबाजुला सगळ असूनही एकटं पाडतं. आणि अशा वेळी कोणतीही साधी गोष्ट मनाला खूप लागते. मनाच्या या डोहात माकडासारखे उड्या मारणारे काही विचार अस्वस्थ करून गेले. 
रोज आपल्याला भेटणारे सगळे अचानक अनोळखी असल्यासारखे वागतात. अर्थात हा सुध्दा मनाचा खेळच असावा. कारण ज्यावेळी तीव्रतेने आपल्या मनात आग लागलेली असते , नेमकं त्याच वेळी कोणालाच वेळ नसतो. एरवी उगाच डोकं खाणारे सगळे कुठे गायब होतात काय माहिती? कित्येकदा आपलं ओळखीचं , सुरक्षित जग अनोळखी वाटू लागतं. पुन्हा एकदा पूर्णपणे अनोळखी जगात जाण्यासाठी कंबर कसली जाते. कारण अनोळखी आणि ओळखीच्या जगाला सामोरं जाण्यावाचून दुसरा पर्यायच नसतो आपल्याला. 
आपण आपलं एकटच आयुष्य जगायचं असेल तर प्रेम या भावनेला काही अर्थच उरत नाही. प्रेमही व्यवहार पाहून करायचं असतं. काय वाईट दिसेल ? काय चांगलं दिसेल ? काय चौकटीत बसेल ? यावर सगळ अवलंबून आहे. अगदी मनाच्या तळातून    वाटणा-या अनेक गोष्टींना अर्थच नसतो. आपण जन्म दिलेल्या आपल्या मुलांवरसुध्दा प्रेम करताना विचार करायचा असतो म्हणे. आमच्या ओळखीच्या एक आजी कायम सांगायच्या, ''आपल्या मुलांना समोरचं ताय द्याव, पण बसायचा पाट देऊ नये.''  बापरे... किती व्यवहारी प्रेम. पण काही वेळा अनुभवच माणसाला शहाणपण शिकवतो. आपल्या आजुबाजुला असणारी माणसांची फौज, ओळखी, अनोळखी सगळेच एका मर्यादेपर्यंतच असतात. म्हणजे एखाद्याला आपल्याबद्दल किंवा आपल्याला एखाद्याबद्दल कितीही वाटत असलं तरी प्रत्येकाच्या काही मर्यादाअसतात. मुलावर आईचं किती प्रेम असतं. पण तेच मुलं मोठं झालं की आईनी मन्या, पिल्या असं म्हणलेलं त्याला आवडत नाही. हल्ली मुलांना आपले पालक शाळा - कॉलेजात आलेले आवडत नाहीत. आमच्या लहानपणी आई शाळेत येत नाही म्हणून वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याच मुलांवर प्रेम करायची पण एक मर्यादा आहे. ही मर्यादा ओळखली पाहिजे. तसं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्याला लहान वाटणारं आपलं पिल्लू आता मोठ्ठ झालेलं असत. बहुतांश नात्यांमध्ये ही मर्यादा येतेच. तिचा स्वीकार करणं यातच खरं शहाणपण आहे. नाहीतर आपल्याच अपेक्षांच्या ओझ्याखाली आपल्यालाच गुदमरायची वेळ येते. 
तुटून आणि लुटून प्रेम करणं ही शंभरातल्या एखाद्या माणसाची गरज असू शकते. बाकीच्यांना फक्त व्यवहार हवा असतो. मग आपले शंभर टक्के उगाच वीस - तीस टक्के वाल्यांना का द्यायचे ? त्यापेक्षा खरच गरज आहे अशा ठिकाणी आपलं असणं हेच चांगल. हे सगळ कितीही म्हणलं तरी आपल्याला हव्या असणा-या गोष्टींमध्ये गुंतणं हा स्वभाव मन सोडायला तयार नाही. अशा वेळी मनाला विचारावसं वाटत, ''मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? ''

Monday, 8 June 2015

माझा दादू......




आजही तो दिवस आठवतो जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला. माझ्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी. तो आला आणि माझं जग बदललं. आता मागे वळून पहाताना तो दिवस आजही चेहे-यावर आनंद आणतो. किती खुष होते मी त्या दिवशी, जेव्हा माझं बाळ माझ्या हातात होतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता तो.  मला मुळातच छोट्या पिल्लांची खूप आवड. त्यात आपल्याच हातात इवल्याशा त्याला पाहून मी अक्षरशः वेडी झाले होते. त्याचं पहिल्यांदा पालथं पडणं, चालणं, बोलणं, शाळेचा पहिला दिवस , स्टेजवर पहिल्यांदा उभं रहाणं हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. त्यासाठी बांधिलकीची नोकरी केली नाही. 
मला चांगल आठवतय . तो शाळेत जाताना त्याच्याबरोबर पावसाच्या डबक्यात पाय आपटताना मीदेखील लहान व्हायचे. त्याच्या बोबड्या बोलांनी मला कितीतरी सुख दिलं. माझं पिल्लू आज माझ्या खांद्यापेक्षा मोठ्ठ झालय.त्याच्या जन्माच्या वेळी जी हुरहुर मनात होती तीच आत्ता आहे. त्याचं कारण ,आज त्याचं जग बदलेल असा दिवस आहे. अर्थात त्याच्या जगाबरोबर माझंही.  आज त्याचा दहावीचा निकाल लागला. त्याला  89 टक्के पडले. ते मार्क्स किती आहेत? त्याचं करियर कसं असेल ? याबाबत मला आत्ता अजिबात टेन्शन  नाही. फक्त एकच इच्छा आहे , त्यानी चांगला माणूस व्हावं. आपल्या संवेदना जागृत ठेवून जगावं. कारण करियर, पैसा या गोष्टी मिळतातच. पण संवेदना जागृत ठेवणं गरजेचं आहे. कारण संवेदनशील माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. 
आज तो खुप खुष आहे. त्याला चांगले मार्क्स पडलेत. सगळेच खुष आहेत. त्याच्या आयुष्यात त्याला खुप समाधान मिळो. तो सदैव आनंदी राहो . हाच माझा आशिर्वाद आणि शुभेच्छा. आज पुन्हा एकदा माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या सगळ्या जिवलगांची आठवण येतीय. मला खात्री आहे ते सगळे जिथे आहेत तिथून त्याला आशिर्वाद देत असणार.... प्रणव पुन्हा एकदा अभिनंदन... खुप मोठा हो. बदललेल्या या नव्या जगात तुला कणखरपणे उभं रहाता यावं ही सदिच्छा.....


Thursday, 4 June 2015


आला पाऊस..... 



काल रात्रीपासूनच तुझी मी वाट पहात होते. जेव्हा मला अगदी असह्य हुरहुर लागते तेव्हा तुझी आठवण येते. का ते माहिती नाही? तुझे नि माझे नाते काय ? हे जाणून घ्यावसंही वाटत नाही. कारण तू माझ्या मनात कधीही बरसू शकतोस. माझी परवानगी न घेता. कारण वेळेचं बंधन तुला मला नाहीच. कालपर्यंत होणारी जीवाची घालमेल तू कशी क्षणार्धात संपवलीस. जादुगार आहेस तू. वठलेल्या तनामनाला पालवी देणारा. सृजनाची पेरणी करणारा. तू आलास की तुझ्याविषयी काहीतरी बोलावसं वाटतच. मग सकाळीच घरातली कामं टाकून तुझं कौतुक करत बसले मी. तू आलास की माझं असच होतं. 
पाऊस सुरू झाला की हे असं काहीतरी होतं. एक मैत्रिण कायम चिडवते मला, '' या कवींना आणि लेखकांना पाऊस आला की काय होतं काय माहित ?  मला तर या पावसाचा राग येतो. चिकचिक, घाण. सगळे ड्रेस खराब होतात.''  पण तिचं या कानानी ऐकून त्या कानानी सोडून देते मी. कारण पाऊस खरच नवनिर्मितीची प्रेरणा घेऊनच येतो. 
पावसाची नुसती सुरूवात झाली की लगेच विविध भारतीला ''काली घटा छाये मेरा जिया तरसाये '' हे गाणं लागलं. अरे वा.... बाहेर  पाऊस बरसत असताना असलं सॉलिड गाणं ऐकताना काय मस्त वाटलं. लगेच व्हॉटस अॅप चे मेसेज बदलले. Happy Rainy Morning .... या पावसानीना सगळं बदलूनच जातं. सगळ्या वाईट , अप्रिय गोष्टींचा निचरा होऊन पाणी पुन्हा एकदा वहात होतं. पाण्याचं डबक जसं वाईट तसच मनातल्या विचारांच साचलेपणही वाईटच. पाऊस पडला की सगळच स्वच्छ होतं. पुन्हा एकदा नव्यानी जगायला शिकवतो पाऊस. आपण फार लहान गोष्टी मनाला लावून घेऊन आपलं जगण अवघड करतो. पाऊस या मनोवृत्तीला बदलतो. कोणताही भेदभाव न करता सगळीकडे बरसतो. हवेत गारवा आणतो. आपल्यालाही रागाच्या काही क्षणांना थंड करण्याची कला पावसाकडून शिकली पाहिजे. रागात राग मिसळून काहीच मिळत नाही. त्यापेक्षा त्या रागावर प्रेमाचा शिडकाव केला तर पुढचे मोठे प्रश्न टळतील. नीट विचार केल्यानंतर आपल्यालाही पटत, उगाच चिडलो होतो आपण इतके. काही वेळा त्या त्या वेळेची परिस्थिती असते ती. ती वेळ गेली की सगळं नॉर्मल होतं. पण त्या वेळी असा विचार करणं कठीण असतं.  पावसाला आज हे छान जमलय. काल होणारी जीवाची काहिली कशी संपवूनच टाकली त्यानी.  पाऊस नसताना धुळीचे नुसते लोट उठत होते. पण पाऊस पडताच  सगळं कस शांत झालं. पाऊसच प्रेमाचा धडा शिकवतो. पाऊस आला की हवा ढगाळ आणि कुंद असली तरीही हवेत एक तजेला असतो. आयुष्यात असा ढगाळपणा हवाच नाही का ? 
तृप्त झाली शांत धरणी
मधुस्मिते हिरव्या कुरणी
रुसट चुंबनासम ओल्या सरी येती जाती
भुईसवे आभाळाची जुळे आज प्रीती