Wednesday, 12 September 2018


युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा.....



प्रेमाची गरज नाही असा जीव पृथ्वी वर असणं जरा दुर्मिळच नाही? पण तरी आपण म्हणजे समाज प्रेमाला विरोध करतोच. स्वधर्मीय, स्वजातीय प्रेम चालतं. लग्नाआधी केलेलं प्रेम allowed आहे. आजही प्रेम करण्यासाठी जात, धर्म, पंथ, वय, single असणं आणि gender याचा विचार केला जातोच. जग खूप पुढे गेलंय असं आपण म्हणतो. काही बाबतीत हे मान्य करता येईलही. पण आजही समाजात प्रेम या सहज सुंदर भावनेवर खूप बंधन आहेत. निरपेक्ष, जीवापाड प्रेम हे शब्द पुस्तकात वाचायला छान वाटतात. प्रत्यक्षात असं फार दुर्मिळ झालंय.
एरवी प्रेमावर भरभरून लिहिणारी मी आज अक्षरशः स्तब्ध झाले. खऱ्या प्रेमाची एक खूप छान आणि खरी गोष्ट वाचली. शर्मिला या माझ्या पत्रकार मैत्रिणीनी एक लेख share केला होता, माधुरी सरोदे आणि जय शर्मा यांच्या प्रेम कहाणीचा. तुम्ही म्हणाल त्यात काय मग इतकं स्तब्ध होण्यासारखं? normal प्रेम कहाणीपेक्षा एक वेगळी गोष्ट या दोघांच्या बाबतीत आहे. माधुरी तृतीयपंथी आहे. Transgender, TG, तृतीयपंथी हे सगळं सिनेमात आणि फार तर ट्रेनमध्ये प्रवास करताना आपण पाहतो. आपल्यापैकी किती लोकांना या सगळ्यांच्या भावना, मन आणि जीवन माहिती असतं... घरातल्या आणि अगदी जवळच्या मित्र मैत्रिणींना समजून घ्यायला आपल्याला वेळ नाही, इच्छा नाही. असं एक वेगळ जीवन जगणाऱ्या लोकांशी आपला काय संबंध? संधी मिळेल तेव्हा टिंगल करण्याशिवाय, घाबरण्याशिवाय आणि विचित्रपणे बघण्याशिवाय काय करतो आपण? जाती-धर्मा बद्दल बोलताना आपण बोलतो, आपण सगळे ईश्वराची लेकरं आहोत. मग हे TG त्याचीच लेकरं आहेत ना?
माधुरी आणि जय यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या प्रेम कहाणीला सत्यात उतरवलं. अगदी normal लग्न होतात तस त्याचं लग्न झालं. आंतरजातीय विवाह केला तर त्याचे पडसाद किती तरी काळ भोगावे लागतात. मग या जोडप्याला समाजाचा किती विरोध पत्करावा लागला असेल. TG सोबत live in मध्ये राहणं किंवा वासना पूर्ण करण्यासाठी त्यांचा वापर करणं हे अगदी common आहे. पण TG वर मनापासून प्रेम करणं आणि ते निभावणं हे किती वेगळ आहे. आपल्यावर प्रचंड प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा, सन्मानानी वागवणारा नवरा जय च्या रुपात माधुरीला मिळाला आणि स्वत:ला विसरून प्रेम देणारी, जोडीदारासाठी वाट्टेल ते करणारी आणि त्याच्या घराला आपलं म्हणणारी माधुरी जयला मिळाली. त्यांच्याविषयी वाचताना, you tube वर त्यांचे videos पाहताना कुठेही काहीही odd वाटलं नाही.
युगायुगांचे नाते आपुले नको दुरावा, सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा.... हे गाण ते दोघ जगतायत. आपल्याला हवं तसं वागण्यासाठी जी किंमत द्यावी लागते आहे, ती हे दोघं आनंदानी आणि एकमेकांच्या साथीनी देत आहेत. प्रत्येक जीवाला प्रेम मिळवण्याचा अधिकार आहे. हे पुस्तकी वाक्य जगून दाखवत आहेत. जय म्हणतो, “नवरा म्हणून जी कर्तव्य असतात ती सगळी मी पार पाडेन आणि माधुरीला सुखी ठेवेन.” तर माधुरी म्हणते, “जयच्या सुखात माझं सुख मानेन. TG लोकांना स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार कोर्टानी दिला आहे. पण सामान्य स्त्री सारखं लग्न व्हाव आणि संसार करावा हा अधिकार अजूनही मिळाला नाही. त्यामुळे marriage certificate मिळवून मुल दत्तक घेणं ही लढाई अजून बाकी आहेच.”
प्रेमात अहंकार, मी पणा, अपेक्षा गळून जाव्यात आणि आपल्या जोडीदाराच्या सुखात आपलं सुख मानावं हे फिल्मी संवाद जगणाऱ्या जय आणि माधुरीला प्रेमभरा सलाम...... 

                                              डॉ. विनया केसकर         

Monday, 3 September 2018


भीती .....


परवा बस स्टॉपवर एक खूप मस्त गम्मत बघायला मिळाली. एक छोटीशी मुलगी दिसली. फार तर बालवाडीत जात असेल. पाठीवर दप्तराच ओझं. दोन शेंड्या बांधलेल्या. अगदी छान तयार झाली होती ती. आजोबांचा हात धरून रस्ता क्रॉस करत होती. इतक्या गाड्या येत होत्या पण ती घाबरली नाही. अगदी धीटपणे आजोबांचा हात धरून, उलट त्यांनाच आधार देत देत तिनी रस्ता क्रॉस केला. पुढे बस स्टॉपवर आल्यावर रस्त्याच्या कडेला एक कुत्रा बसला होता. खरं तर तो तिला काहीही करत नव्हता. पण ती खूप घाबरली होती. धीटपणे रस्ता ओलांडणारी ती चिमुकली घाबरून गेली होती. तिच्या आजोबांना कळतच नव्हतं की हे काय चालू आहे? आपली नात हात सोडून उलट्या बाजूला का पळतीय? ती मात्र त्या कुत्र्याला  टाळून व्यवस्थित पुढे आली... हा सगळा प्रकार बघताना माझ्या मनात एका अनावर पण स्वाभाविक भावनेचा विचार आला. ती म्हणजे... भीती.
अगदी रोजच्या आयुष्यात बघितलं तर आपल्या लक्षात येतं की, भीतीनी आपल्याला किती ग्रासलेलं असतं नाही? किती तरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध भीतीपोटी आपण करतो. काही वेळा देवाधर्माचं करतो ते ही भीतीपोटी. मी असं केलं नाही तर माझ्या आयुष्यात काही अडचण तर येणार नाही? या भीतीनी. कित्येकदा कृती करायची म्हणून केली जाते.
नाती जपताना देखील आपण भीतीपोटी काही वेळा मनाविरुद्ध वागतो. कधी समाजाची भीती, तर कधी स्वत:ची. समाजाची वाटणारी भीती यावर मात करता येऊ शकते. पण स्वतःला वाटणाऱ्या भीतीवर मात कशी करायची? नाती तुटू नयेत, काही प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून मनात नसताना भीतीपोटी मनाविरुद्ध वागावं लागतं. कारण मनासारखं वागून आपण आपल्याबरोबर अनेकांची फरपट करू ही भीती. काय करणार? सगळ्यांनाच मनस्वी वागणं शक्य नसत ना? मनासारखं वागण्याची भीती.. न वागण्याचा त्रास. या सगळ्यात मनाची होणारी घालमेल..
एक गाणं सारखं मनात रुंजी घालत होतं..
भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...