नेहमी आनंदी रहा...
आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे असं म्हणतात. सुख सुध्दा क्षणभंगुर आणि दुःख सुध्दा. म्हणजे काय झालं... काल एका पुस्तकात मी वाचलं की, सुख मिळवण्याच्या आपल्या सगळ्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणजे एकच वस्तू एकाला सुखस्वरूप तर, दुस-याला दुःखस्वरूप वाटते. हे वाचून मी एकदम विचार करायला लागले. म्हणजे, सगळा गोंधऴच आहे म्हणायचा.पण नीट विचार केल्यावर जाणवलं, हे सगळ अगदी खरं आहे. कारण असे अनुभव आपण सगळे सुध्दा घेतोच की. पण हे सगळ मान्य करणं थोड जड जातं. कारण आपल्याला आपलं दुःख मोठ वाटत. पण आपल्याला दुःख मिळाल्याने कोणाला तरी आनंद झालाय, किंवा सुख मिळालय अशी कल्पना आपण कधी करतो का ?
अगदी साधी गोष्ट .... बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही तर आपली किती चिडचिड होते. पण जेव्हा आपण निवांत हेडफोन कानात घालून , गाणी ऐकत बसलेले असतो, तेव्हा उभ्या असणा-या माणसांकडे आपण बघून न बघितल्यासारख करतोच ना. हे सगळं खूप नॅचरल आहे. कारण प्रत्येक वेळी उठून जागा देणं शक्य नसत. दर वेळी मीच का ? असे प्रश्न पडू शकतात. पण हाच प्रश्न जेव्हा आपण उभे असतो, तेव्हा बसलेल्याला पडत असेल ना ? आपल्याला मिळणा-या सुख दुःखाला एका वेगळ्या पातळीवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण सामान्य माणसं आहोत. त्यामुळे सुख मिळाल्यावर आनंद होणं आणि दुःख झाल्यावर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण फक्त त्या सगळ्याचा किती त्रास करून घ्यायचा हे ठरवायला हवं. नाहीतर एखाद्याने ठरवल्याप्रमाणे फोन न केल्यानी किंवा भेटायला न आल्यानी प्रचंड डिप्रेशन यायचं कारण नाही. थोडसं लेट गो करायला शिकलं पाहिजे. कल्पना करून त्याचं सुख, दुःख बाळगणं चूक आहे. कारण कल्पनेचं खरे खोटेपण अनुभवांती कळतं. एखादी आनंद देणारी वस्तू, व्यक्ति कायम तशीच रहाते का ? तर नाही. कारण अमुक एक वस्तू किंवा व्यक्ति आपल्याजवळ आहे , म्हणून आपण सुखी आहोत. ही संकल्पना बदलायला हवी. शाश्वत आणि स्थिर असं काहीच नसलं तरी जीवनातला आनंद शोधला पाहिजे. कारण आपण इथे आनंदी रहायलाच आलोत. हो ना ?