Saturday, 20 September 2014


मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसाला.........




मला माणसाच्या मनाचं नेहमी कुतूहल वाटतं. एकाच वेळी असंख्य विचारांची गर्दी मनात असते. अगदी आत्ता सुध्दा मी हे लिहिताना आणि तुम्ही हे वाचताना आपल्या मनात कितीतरी विचार आहेत. आहेत ना ? त्यातल्या त्यात मनस्वी लोकांच्या बाबतीत हे आणखीन कठीण होऊन बसतं. कारण मनात आलय तसच वागणं शक्य नसतं. जगाच्या नियमावलीप्रमाणे वागायला गेलं तर घुसमट होते. अर्थात खरे मनस्वी लोक या घुसमटीचा विचार न करता मनाप्रमाणेच वागतात. पंचाईत होते ती माझ्यासारख्या लोकांची आणि मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक पण यामध्ये असतील. आपलं काय होतं ... आपल्याला मनासारखं वागायचं असत पण आपण समाजाचा फार विचार करतो.
मला नाही आवडत असं कृत्रिम वागायला. पण अगदी खरं सांगु का ? खरं वागलेलं लोकांना चालत नाही. मग उगाच कृत्रिम वागायला लागतं. मॅनर्सचा भाग म्हणे. नुकतीच एका पुस्तकाच्या निमित्ताने डोंगरकपारीत वसलेल्या एका गावात जाण्याचा योग आला. आश्चर्य म्हणजे, तिथे सगऴी माणसं मनस्वी होती. कारण त्यांची मनं निर्मळ होती. एकदम स्वच्छ..... जे मनात आलं ते बोलून रिकामे. किती छान. जगण्याच्या गरजा थोड्या, त्यामुळे मनाचे चोचले नाहीतच. जे आहे त्यात आनंद मानून आयुष्य जगायची कला या लोकांमध्ये मी अनुभवली. खूप हेवा वाटला. आपण नाही असं जगू शकत. कारण आपणच आपल्या जगण्यातला नैसर्गिकपणा हरवलाय. त्या गावात 95 वर्षांच्या आजीला सुध्दा जगण्याची जिद्द होती. जीवावर बेतलेल्या दुखण्यातून ही आजी वाचली आहे. पण तिचा पाठीचा ताठ कणा पाहून मला लाज वाटली. त्या आजीची करडी तरीही प्रेमळ नजर खूप काही शिकवून गेली. तिच्या  घरातला दूध न घातलेला कोरा चहा पिऊन फ्रेश वाटलं. 
शहरात राहून आपण आपली मनं फार कमकुवत करून घेतोय असं प्रकर्षानी जाणवलं. रिफ्रेश होण्यासाठी हजारो, लाखो रूपये घालवून ट्रीप करण्यापेक्षा अशा खेड्यांमध्ये जाऊन राहिलं पाहिजे. क्षणार्धात जन्मोजन्मीची नाती जोडणारी आणि तरीही विलक्षण अलिप्तता जपणारी ही मंडळी मनाचे डॉक्टर आहेत. नुसत्या एका हाकेवर एकमेकांसाठी धावणारे हे लोक मला फार आवडले. कोणाच्या घरात काय चाललय? कोण गावाला गेलय ? इथपासून कोणाच्या घरात काय भाजी केलीय ? हे सगळ मोकळेपणानी शेअर करणारी ही माणसं मला खूप आवडली. हल्ली आपण सारखं म्हणतो, मनातले विचार शेअर करावेत, त्यानी दुःख हलकं होतं, सुख वाढतं. पण इथे शेअरिंग करा असं वेगळं सांगायची गरजच नाही. सगळ जीवन म्हणजे खुली किताब. किती छान ना ? मोकळा श्वास, मोकळं जगणं. नो लपवा छपवी. काहींना वाटेल की असं एकमेकांच प्रायव्हेट लाईफ कसं शेअर करतात हे लोक? पण त्यापेक्षाअसं म्हणूया की एखाद्याच्या आयुष्यात असं काही असलं आणि त्यानी मनस्वीपणे ते सांगितलं तरी त्याचा बाऊ करून घेत नाहीत हे लोक. 
मोकळं जगायला आवडणा-या लोकांसाठी अशी गावं म्हणजे सुखाचं आगर. पण आपल्याला कृत्रिम वागायची इतकी सवय झालीय की अशा गावात आपलं मन फार काळ रमणार नाही. सोयीसुविधांचा अभाव असला तरी मोकळ्या मनानी जगण्यासाठी म्हणावसं वाटतं....... खेड्याकडे चला............या मनस्वी लोकांमध्ये घालवलेला हा दिवस मी विसरूच शकत नाही. पुढे सुध्दा माझं मन मला या दिवसाची साद घालून म्हणेल, मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसाला.........

Friday, 19 September 2014


आजारपण........



नमस्कार, बरेच दिवस झाले आपल्याला भेटून. मला तुमची आठवण येत होती. तुम्हाला येत होती का नाही माहिती नाही. कोणत्याही अभिव्यक्तिच्या कलेमध्ये कलाकार किंवा सादर करणा-याला आपल्या कलेच्या चाहत्यांची आठवण होतेच.  नाही का ? म्हणजे मी हे गृहित धरते, की तुम्ही माझ्या लेखाची वाट पहात होतात. काही विचार, मुद्दे , मतं तुमच्याशी शेअर केलं की मन हलकं होतं. आज पण एका मस्त अनुभवाचं शेअरिंग तुमच्याशी करायचं आहे. 
गेल्या २३ तारखेपासून म्हणजे ऑगस्टच्या हं मी एका वेगळ्या अनुभवातून जातीय. तुम्हा - आम्हा सर्वांना आलेला हा अनुभव आहे. फार काही वेगळं नाहीये. पण तरीही सांगतेच तुम्हाला.... व्हायरल इन्फेक्शन नावाच्या एका किरकोळ आजाराने मी मस्त आजारी पडले होते. हो.... मस्तच म्हणते . कारण यामुळेच मला माझ्यावर माया 
करणा-या लोकांचं प्रेम अनुभवता आलं. कारण कितीही आजारी असलं तरी झोपून न रहाण्याची वाईट सवय मला आहे. पण यावेळच्या व्हायरलनी मज्जा आणली. 
एका गाण्याच्या कार्यक्रमाचे निवेदन करत असतानाच व्हायरलनी आपले हात पाय पसरले. भर तापात आणि भर पावसात कशीबशी दवाखान्यात पोहोचले. मला बरं नाहीये यावर डॉक्टरसुध्दा विश्वास ठेवेनात. मग काय झाल्या तपासण्या वगैरे.... रोजच्या सकाळ संध्याकाळ बारा गोळ्यांचा पाऊस आजपर्यंत माझ्यावर बरसतो आहे. पण खरं सांगते फार मजा आली या अनुभवातून. सासुबाईंकडून सेवा करून घेता आली. इतकंच काय नव-यानी सुध्दा नारळ पाणी वगैरे आणून दिलं. मुलगा घाबरला होता. वा वा वा.........  सगळे काम करतायत आणि आपण मस्त झोपून रहायचं. एरवी ते पोलपाट लाटणं आणि फोडणी यातून सुटकाच नव्हती. आजारपणामुळे चक्क दोन दिवस मी स्वयपाकघराचं तोंड पाहिलं नाही.  घरी येणा-या सगळ्यांनाचआश्चर्य वाटतं होतं. अरे विनया आजारी आहे ? चेहे-यावरून तर वाटतं नाही. काय मेलं दुर्देव मी आजारी आहे हे सांगावं लागत होतं. तीच गोष्ट डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्यावर झाली. तिथे ओळखीचे सगळे लोक म्हणत होते, 'काय मग आज इकडे कुठे ? ' अरे बाबांनो , बरं नाहीये. म्हणून आलीय. पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं. प्रसन्न चेहे-याचे तोटे हो दुसरं काय .... 
असो..... आता मी बरी आहे. कामं करायला सुरूवात केलीय. त्यामुळे मस्त मस्त विषय घेऊन पुन्हा भेटूच....