स्वीकारुनी आनंदावे
.....
कोणतीही गोष्ट स्वीकारणं हा मुख्य मुद्दा असतो.
मग ते परिस्थिती असो किंवा माणूस. एकदा ते स्वीकारलं की मग येणाऱ्या प्रश्नांची
उत्तरं शोधण्यासाठी आपण स्वत:ला तयार करतो. बऱ्याचदा असं वाटत की मी सगळ स्वीकारलं
आहे. पण खरच तसं नसत. खूप वेळा आपण म्हणतो बघा, “आलीया भोगासी असावे सादर”. मी
त्यापुढे अजून एक गोष्ट नेहमी म्हणते, करू नये कुरकुर विनू म्हणे.... विनोदाचा भाग
सोडला तर व्यक्ती, परिस्थिती किंवा भावना मनापासून स्वीकारली तर ताण कमी व्हायला
मदत होते. निदान मी माझ्याशी प्रामाणिक आहे ही भावना आनंद देऊ जाते.
म्हणणं किती सोप आहे नाही का? परिस्थिती कोणती
असावी हे खरच आपल्या हातात असत का? ती परिस्थिती आल्यावर आपण ती स्वीकारतो कशी
यावर बरचसं अवलंबून असत. आर्थिक उतार चढाव, मानसिक आंदोलनं, माणसं आपल्याशी कसं
वागतात, गैरसमज, मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी हे सगळं आपल्या हातात नसतं. आपल्या
हातात असतं ते म्हणजे स्वीकारणं.
मी आत्ता दु:खी आहे हे स्वीकारलं की मग त्या
परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं यावर मन उपाय शोधू शकतं. पण बऱ्याचदा आपण दु:खी
आहे असं न स्वीकारता आनंदी राहण्याचं नाटक करतो. अर्थात प्रत्येकाचा व्यक्त
होण्याचा पैटर्न वेगळा असूच शकतो. नका सांगू सगळ्या जगाला. पण निदान आपल्या मनाशी
कबुल करून ते स्वीकारणं इतकं तरी करतो का आपण? दु:ख या एका भावनेबद्दल बोलले मी. पण भावना या
एका शब्दांत काय काय सामावलंय बघा...भूक, तहान, आनंद, राग, द्वेष, इर्षा, हाव,
सोबतीची भूक, भीती, रडणे, हसणे, रुसणे, काहीही करू नये असे वाटणे, भटकायची इच्छा,
झोप, कंटाळा... बापरे ही यादी संपतच नाहीये. दिवसभरात अशा कितीतरी भावना आपल्या
मनात येत असतात. त्या स्वीकारणं हे पहिलं महत्त्वाचं काम आहे. बराचसा ताण यामुळे
कमी होतो. स्वीकारलं की पुढे कृती सोपी होते. भावना कोणतीही असो, आधी ती
स्वीकारावी. मनाला उगाच दामटू नये. मनाला दामटलं की मनाविरुद्ध कृती करण्यात यश
मिळू शकतं पण आतून वाटणारं समाधान मिळत नाही. मग का आटापिटा करायचा? शक्य असतील
त्या भावना व्यक्त करून, अनुभवून मोकळं व्हावं. भावनांची घागर एका मोठ्या पात्रात
रिती करून पुन्हा नव्याने घागर भरायला ठेवावी. कारण आपल्याला कितीही वाटलं तरी
भावनांचा प्रवाह थांबत नाही.
सगळं आपल्या मनासारखं कधीही घडू शकत नाही हे
स्वीकारायला हवं. माझ्याच बाबतीत असं का? हा प्रश्नच पडायला नको. कारण जेव्हा
आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात तेव्हा आपण म्हणतो का? माझ्याच बाबतीत असं का?
प्रेम, आदर आणि ओलावा या गोष्टी नको असं कोणी आहे का या जगात? पण आपला हट्ट असतो
हे आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीकडून मिळावं.
या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत किंवा मिळू शकतील पण मला हव्या तशा
आणि हव्या त्या व्यक्तीकडून नाही एकदा हे स्वीकारलं ना की माझ्याच बाबतीत असं का?
हा प्रश्न पडत नाही.
स्वीकारा रे स्वत:ला आहात तसे... कोणाला काय
वाटतं याकडे नको लक्ष द्यायला. कारण इथे प्रत्येकाचं दुखणं वेगळं आणि अपेक्षा
वेगळ्या. दुसऱ्या कोणामुळे आपण आनंदी किंवा दु:खी होण्याची गरज नाही. असलेल्या परिस्थितीचा
स्वत:ला त्रास करून न घेणं आणि आहे ते मोकळ्या मनानी स्वीकारणं ही स्वत:वर प्रेम करण्याची
पहिली पायरी आहे. करूया का स्वत:वर सुद्धा प्रेम?
साहिरची ही कविता "स्वीकारार्हता" ही भावना मस्त
व्यक्त करते..
मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा...
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा...
डॉ. विनया केसकर