Friday, 1 November 2019


आपल्या अस्तित्वाचं महत्त्व...




हारणं कोणाला आवडतं? तुम्ही म्हणाल काय हा प्रश्न? जिंकायलाच आवडतं सगळ्यांना पण काल एक दुर्दैवी घटना घडली. I will win, not immediately, but definitely असं  माझी लाडकी मैत्रीण निशा कायम म्हणायची. पण दुसऱ्यांना जिंकणं शिकवणारी निशा स्वत:च्या भावनांवर विजय मिळवू शकली नाही. निशाच्या जाण्यानी मन सुन्न झालंय. हजारो प्रश्न मनात निर्माण करून निशा गेली. या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आता?
निशानी आत्महत्या केली या घटनेमुळे माणसाचं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा कळलं. एरवी खंबीर, निर्भीड आणि कणखर वाटणारी निशा इतका टोकाचा निर्णय घेऊ शकते यावर विश्वास बसला नाही. निशा गेलीय, काहीही केलं आणि कितीही रडले तरी ती परत येऊ शकणार नाही. पण अजून अशा कितीतरी "निशा" मृत्युच्या दरीत लोटल्या जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण अतिशय प्रगल्भ अशी निशा जर असं वागू शकते तर मनानी कमकुवत मैत्रिणींची काळजी वाटायला लागते. अगदी स्वत:ची सुद्धा...
अशा व्यक्ती जाणं फक्त त्यांच्या कुटुंबाच्या नाही तर समाजाच्या दृष्टीनी हानिकारक आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे मग? कारण निराशेचे क्षण सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहेतच. घटना, परिस्थिती किंवा आपल्या जवळची वाटणारी माणसं आपण खोल गर्तेत जाण्याला कारणीभूत होऊ शकतात. त्यावेळी स्वत:ला महत्त्व देणं विसरून असे प्रकार घडू शकतात. अगदी शहाणी, शिकली सवरलेली माणस असं वागू शकतात. मनात दु:ख दाबून आनंदी राहण्याचा आभास निर्माण करणाऱ्या माणसांच्या बाबतीत अशा घटना अनाकलनीय होऊन बसतात. त्या त्या वेळी मनानी जगणं नाकारणं हे कसं घडतं माहित नाही. पण हा निर्णय अचानक झालेला नसतो. प्रोसेस असते ती. एखादी अशी घटना घडते आणि मग मृत्यूच जवळचा वाटतो. खरं म्हणजे तिने लढायला हवं होतं. जीव काही इतका वर आलाय का? या आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया अगदी बरोबरच आहेत. पण स्वत:चं जगणं नाकारण्याइतकी निराशा किती भयंकर असेल. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच आपण सुरु केलेल्या कामाचं काय होईल हा विचार सुद्धा मनाला शिवत नसेल का? हो... नसेल शिवत हा विचार. कारण मी जाण्यानी सगळे प्रश्न सुटतील असं वाटू लागत असेल. अशा वेळी मन आणि बुद्धी असे दोन भाग न राहता, एक विचित्र गारुड मनावर राज्य करत असेल.   
पण एक नक्की, या भयानक विचारांवर मात करता आली पाहिजे. अगदी बेसिक म्हणजे आपलं स्वत्व हरवू देता काम नये. आपल्या स्वत:पेक्षा अशी कोणतीही व्यक्ती महत्त्वाची नसायला हवी. कारण ज्या व्यक्तीसाठी आपण स्वत:ला संपवण्याचा विचार करतो तिला खरच काही फरक पडणार आहे का? ज्या घटनेमुळे आपण असा निर्णय घेतला त्या घटनेत आपल्या जाण्याने आपल्याला अपेक्षित बदल घडणार आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न स्वत:ला विचारण्याचं भान कोणत्याही परिस्थितीत शाबूत राहायलाच हवं. स्वत:वर प्रेम केलं पाहिजे आधी, तर दुसऱ्यावर प्रेम करता येईल. आत्मकेंद्री असणं आणि स्वत:वर प्रेम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हं. पण बऱ्याचदा बाह्य गोष्टींना आपण इतकं महत्त्व देतो की त्यापुढे आपलं अस्तित्व लक्षातच घेत नाही. एक मात्र प्रकर्षाने जाणवलं, मनानी खंबीर किंवा हळव असं काहीही अशा प्रसंगात उपयोगी पडत नाही. अशा वेळी उपयोगी पडणार आहे ते म्हणजे आपल्या अस्तित्वाचं आपल्याला उमजलेलं महत्त्व. आपलं चांगलं किंवा वाईट दुसऱ्या कोणामुळे होत नाही. त्याला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आयुष्याची बिघडलेली चव दुरुस्त करण्याची जबाबदारी आपली आहे. पदार्थ फेकून देणं हा पर्याय योग्य नाही. कारण उत्तर नाही असा एकही प्रश्न या जगात नाही.  
                                                                                                                    डॉ. विनया केसकर 

Monday, 7 October 2019


 स्वीकारुनी आनंदावे .....


कोणतीही गोष्ट स्वीकारणं हा मुख्य मुद्दा असतो. मग ते परिस्थिती असो किंवा माणूस. एकदा ते स्वीकारलं की मग येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण स्वत:ला तयार करतो. बऱ्याचदा असं वाटत की मी सगळ स्वीकारलं आहे. पण खरच तसं नसत. खूप वेळा आपण म्हणतो बघा, “आलीया भोगासी असावे सादर”. मी त्यापुढे अजून एक गोष्ट नेहमी म्हणते, करू नये कुरकुर विनू म्हणे.... विनोदाचा भाग सोडला तर व्यक्ती, परिस्थिती किंवा भावना मनापासून स्वीकारली तर ताण कमी व्हायला मदत होते. निदान मी माझ्याशी प्रामाणिक आहे ही भावना आनंद देऊ जाते.
म्हणणं किती सोप आहे नाही का? परिस्थिती कोणती असावी हे खरच आपल्या हातात असत का? ती परिस्थिती आल्यावर आपण ती स्वीकारतो कशी यावर बरचसं अवलंबून असत. आर्थिक उतार चढाव, मानसिक आंदोलनं, माणसं आपल्याशी कसं वागतात, गैरसमज, मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी हे सगळं आपल्या हातात नसतं. आपल्या हातात असतं ते म्हणजे स्वीकारणं.
मी आत्ता दु:खी आहे हे स्वीकारलं की मग त्या परिस्थितीमधून बाहेर कसं पडायचं यावर मन उपाय शोधू शकतं. पण बऱ्याचदा आपण दु:खी आहे असं न स्वीकारता आनंदी राहण्याचं नाटक करतो. अर्थात प्रत्येकाचा व्यक्त होण्याचा पैटर्न वेगळा असूच शकतो. नका सांगू सगळ्या जगाला. पण निदान आपल्या मनाशी कबुल करून ते स्वीकारणं इतकं तरी करतो का आपण?  दु:ख या एका भावनेबद्दल बोलले मी. पण भावना या एका शब्दांत काय काय सामावलंय बघा...भूक, तहान, आनंद, राग, द्वेष, इर्षा, हाव, सोबतीची भूक, भीती, रडणे, हसणे, रुसणे, काहीही करू नये असे वाटणे, भटकायची इच्छा, झोप, कंटाळा... बापरे ही यादी संपतच नाहीये. दिवसभरात अशा कितीतरी भावना आपल्या मनात येत असतात. त्या स्वीकारणं हे पहिलं महत्त्वाचं काम आहे. बराचसा ताण यामुळे कमी होतो. स्वीकारलं की पुढे कृती सोपी होते. भावना कोणतीही असो, आधी ती स्वीकारावी. मनाला उगाच दामटू नये. मनाला दामटलं की मनाविरुद्ध कृती करण्यात यश मिळू शकतं पण आतून वाटणारं समाधान मिळत नाही. मग का आटापिटा करायचा? शक्य असतील त्या भावना व्यक्त करून, अनुभवून मोकळं व्हावं. भावनांची घागर एका मोठ्या पात्रात रिती करून पुन्हा नव्याने घागर भरायला ठेवावी. कारण आपल्याला कितीही वाटलं तरी भावनांचा प्रवाह थांबत नाही.
सगळं आपल्या मनासारखं कधीही घडू शकत नाही हे स्वीकारायला हवं. माझ्याच बाबतीत असं का? हा प्रश्नच पडायला नको. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतात तेव्हा आपण म्हणतो का? माझ्याच बाबतीत असं का? प्रेम, आदर आणि ओलावा या गोष्टी नको असं कोणी आहे का या जगात? पण आपला हट्ट असतो हे आपल्याला हव्या असणाऱ्या व्यक्तीकडून मिळावं.  या सगळ्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत किंवा मिळू शकतील पण मला हव्या तशा आणि हव्या त्या व्यक्तीकडून नाही एकदा हे स्वीकारलं ना की माझ्याच बाबतीत असं का? हा प्रश्न पडत नाही.
स्वीकारा रे स्वत:ला आहात तसे... कोणाला काय वाटतं याकडे नको लक्ष द्यायला. कारण इथे प्रत्येकाचं दुखणं वेगळं आणि अपेक्षा वेगळ्या. दुसऱ्या कोणामुळे आपण आनंदी किंवा दु:खी होण्याची गरज नाही. असलेल्या परिस्थितीचा स्वत:ला त्रास करून न घेणं आणि आहे ते मोकळ्या मनानी स्वीकारणं ही स्वत:वर प्रेम करण्याची पहिली पायरी आहे. करूया का स्वत:वर सुद्धा प्रेम?
साहिरची ही कविता "स्वीकारार्हता" ही भावना मस्त व्यक्त करते..

मैं ज़िंदगी का साथ निभाता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ाता चला गया
जो मिल गया उसी को मुक़द्दर समझ लिया
जो खो गया मैं उसको भूलता चला गया
हर फ़िक्र को धुएँ में उड़ा...
                                                                                                                                  डॉ. विनया केसकर 

Monday, 22 July 2019


समजून घेणे ....


परवा डोळ्यात अंजन घालणारा एक प्रसंग घडला. जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्ही ऑफिसमधल्या मैत्रिणी नेहमी प्रमाणे ऑफिस जवळ असणाऱ्या एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो. आमचे डबे आम्ही नेतोच. पण तरी ऑफिस मध्येच बसून खाण्याचा कंटाळा येतो. आपलाच डबा खायचा असतो तर आम्ही तिथे का जातो? हे कोडं आम्हालाही कळत नाही. तो मुद्दा जाऊदे... मला तुम्हाला वेगळच सांगायचं आहे. आम्ही आत डबा खात असताना त्या हॉटेलच्या बाहेर आजी बाहेर बसली होती. आजकाल स्टेशन, चौक, रस्त्याच्या कडेला बऱ्याचदा अशी मंडळी दिसतात. काही वेळा उगाच असं वाटत, सगळेच पैसे मागतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीला पैसे देणं शक्य आहे, पण सगळ्यांना पैसे देणं शक्य नाही. खूप वेळा असं सुद्धा मनात येतं, धडधाकट आहेत, मग काम का करत नाहीत. त्या आजीला हॉटेल बाहेर बघितल्या पासून हे सगळे विचार मनात आले.
डबा खात असताना सुद्धा तिचा आवाज सारखा कानावर पडत होता. तिला चहा हवा होता.  पण नेमका त्या वेळी चहा नव्हता. माझ्या डब्यात एक पोळी जास्त होती. अर्थात जास्त होती आणि मला नको होती म्हणून मला असं वाटलं की, आजीला द्यावी. माझ्या मैत्रिणीनी तिला बाहेर जाऊन विचारलं, “आजी , चपाती हवीय का?” तर ती आजी “नाही” म्हणाली. आम्हाला थोडा राग आला. असं वाटलं, काय हे? चांगली ताजी चपाती देतोय तर नाही म्हणतीय. नेहमी जसे नकारात्मक विचार मनात येतात तसे आमच्या देखील आले. अन्न दिलं तर नकोय, पैसे हवेत असे शेरे सुद्धा मनात मारले गेले. बाहेर आल्यावर मी त्या आजींना म्हणलं, “का हो आजी, ताजी चपाती देत होते तर का नाही घेतली?” आजींनी दिलेल्या उत्तराने मी पुरती ओशाळले. त्या म्हणाल्या, “अगं पोरी, तुम्ही दिवसभर काम करता. डबा खायला एकदाच मिळतो न्हव का. त्यातून तुझ्या डब्यातली चपाती घ्यायची म्हणजे तू अर्धवट जेवनार. म्हनून नको म्हनल.” आजी या कारणासाठी पोळी घेत नसतील याचा विचार सुद्धा मनात आला नव्हता.
नंतर मनात आलं, बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेण्यात आपण कमी पडतो नाही? शिक्के मारण्याची ही सवय कमी करत करत जायला हवी. खूप विचार करणारे सुद्धा कधी कधी असे Judgmental वागतात. समजून घेणे आणि मग मत बनवणे हे कायम करता आलं पाहिजे. या प्रसंगांनी डोळ्यात अंजन घातलं. खर तर माझा स्वभाव समजून घेण्याचा आहे. पण काही वेळा सुद्धा असं Judgmental वागणं योग्य नाही. असं आपण किती वेळा म्हणतो की मला आता maturity आलीय. पण मोठ्या गोष्टी समजून घेणे याला maturity म्हणत नाहीत तर छोट्या गोष्टी समजून घेणे म्हणजे maturity.
                                                                                                                            डॉ. विनया केसकर 

Friday, 8 March 2019


वैचारिक समानता.....

महिला दिनानिमित्त काही तरी लिहावं असं वाटत असतानाच एक विचार मनात आला. महिलेमध्ये पुरुषाचे काही गुण असतात, तर पुरुषांमध्ये महिलांचे. उदाहरण द्यायचं झालं तर, एकटी स्त्री अगदी पुरुषाप्रमाणे आपल्या संसाराचा डोलारा खंबीरपणे सांभाळते. तसच पुरुषांमध्ये महिलेचा भावनिक ओलावा असतोच की. ही दोन्ही उदाहरणं सार्वत्रिक नाहीत. काही वेळा असं सुद्धा बघायला मिळत.
मला नेहमी असं वाटत स्त्री आणि पुरुष असा भेद करून त्याच त्याच गोष्टी उगाळून काय मिळणार आहे? कोणीही अति केलं की त्याची माती होणार आहे. मला हे मान्य आहे की स्त्रियांवर तुलनेनी प्रमाणाबाहेर अन्याय झाला आहे, होतोय... पण हळू हळू चित्र बदलतंय. स्त्री किंवा पुरुष असा भेद न करता एक माणूस म्हणून बघायला हवं. कारण कित्येक वेळा पुरुषांमध्ये सुद्धा मातृत्वाची झलक दिसते. ज्ञानेश्वर महाराजांना आपण माउली म्हणतो. शिवाजी राजेंसारखा राजा स्त्री ला सन्मानाने वागवत होता.  राणी लक्ष्मीबाईंनी पतीच्या निधनानंतर आपल्या प्रजेचं रक्षण करण्यासाठी प्राणांच बलिदान केलं. सावित्रीबाई फुलेंनी ज्योतीबांच्या नंतर सुद्धा आपला वसा पूर्ण केला. खर तर समानता विचारांमध्ये यायला हवी. ओरबाडून हक्क मिळू शकतात. पण मनातून आदर, सन्मान असायला हवा. नुसतं gender equality हवी असं म्हणून काय होणार? आधी माणूस म्हणून एका व्यासपीठावर येण्याची दोघांचीही तयारी आहे का? याचा विचार दोघांनी करण्याची गरज आहे. कोणा एकामुळे गाडी पुढे जाणार नाही. एकमेकांना एकमेकांच्या साथीने पुढे जाण्याची इच्छा हवी. पूर्वी झालेल्या त्रासाचा वचपा काढत बसून तरी समाधान मिळणार आहे का? त्यापेक्षा पुढच्या पिढ्यांमध्ये वैचारिक समानता येऊन, एकमेकांवर असलेलं अवलंबित्व मान्य करून, पुढे जाता येईल का?   
                                                    डॉ. विनया केसकर   

Thursday, 7 March 2019


सावर रे....

कित्येकदा असं होतं की काही केल्या मनाला सांभाळणं, सावरणं जमत नाही. हे सावरणं आपण आपल करायचं असतं हे कळत असतं. स्वभान, स्वओळख झालेली so called आधुनिक स्त्री असून सुद्धा बऱ्याचदा हे जमत नाही. वास्तवाचं भान येऊनही आलेली उदासी, प्रश्न कोणी तरी सोडवावा असं उगाच वाटतं. खर तर हे सुद्धा माहिती असतं की ही उदासी आपण स्वत:च दूर करू शकतो. पण अवलंबून राहायला छान वाटत काही वेळा. इथेच खरा प्रश्न येतो. कारण एरवी आपले आपण प्रश्न हाताळणारी जेव्हा अवलंबून राहते तेव्हा साहजिक अपेक्षा वाढतात. अपेक्षा हे सगळ्या दुखा:चं मूळ आहे.
गोष्ट अगदी साधी असते. पण या अपेक्षांमुळे गुरफटून जातो आपण. काही वेळा तर नेमकं काय चुकलंय, काय बिनसलंय हेच कळत नाही. सांगता येत नाही आणि सहन होत नाही असं काहीसं. खूप वेळा वाटतं शरीराला पडलेले कष्ट परवडतात. पण मनाला झालेले कष्ट कोणत्या विश्रांतीनी दूर होतील ते समजत नाही.
संदीप खरे ची ती कविता आठवते, कशी ही अवस्था? कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे? मन आतून म्हणत, सावर रे... आणि मग मनाचं ऐकून सादाला प्रतिसाद म्हणून म्हणावसं वाटतं... हो, मी च बदलू शकेन ही मनस्थिती. कारण जेव्हा हे पटत की, आत्ताच्या स्थितीला, व्यक्तीला, परिस्थितीला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. तेव्हा मनातून पुन्हा आवाज येतो... सावर रे, तुझी तूच सावर. होईल त्रास, वाढेल त्रास, पडशील, धडपडशील, पण ते असेल पुन्हा उठण्यासाठी आणि स्वत: सिद्ध होऊन आधार देण्यासाठी... कोणीतरी माझ्यातला खंबीर मी ला सावर रे हे म्हणावं यासाठी....     

Wednesday, 16 January 2019


नव्या वर्षात करूया काही अवघड गोष्टी ....


नवीन वर्ष सुरु झालं... बरेच दिवसात मनापासून काही लिहाव असं वाटत नव्हत. शिवानी दीदींचा एक व्हिडीओ पहिला आणि एक मस्त विचार मिळाला. त्या म्हणाल्या, “आपण दही लावताना जुन्या, आंबट आणि खराब झालेल्या दह्याचं विरजण लावत नाही. तर नवीन दही सुद्धा खराब होऊ शकत. तसच मागील वर्षातील आंबट, कडू आठवणी मनात ठेवून नवीन वर्ष सुरु करू नका. पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा.” एकदम भारी विचार.
कितीही नाही म्हणल तरी आपल्या मनात अशा नकोशा आठवणी असतातच आणि आपण त्या आठवणी पुढच्या वर्षात carry forward करतोच.
पूणर्पणे नव्यानी वर्ष सुरु करा  हे म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात असं वागणं शक्य आहे का? जुन्या आठवणी पाठ सोडत नाहीत आणि त्या नकोशा देखील वाटतात. त्या आठवणी विसरून त्या त्या व्यक्तींशी पुन्हा नॉर्मल वागणं इतकं सोप नाही. कारण आपण सामान्य माणस आहोत. राग येण, तो मनात राहणं स्वाभाविक आहे. पण या सामान्य वाटणाऱ्या भावना मनाला खूप त्रास देतात.
त्या व्यक्तीला माफ करण शक्य नसेल तर निदान द्वेष थांबवता येईल का? कारण कोणतीही व्यक्ती कायम तशीच नसते. परिस्थिती प्रमाणे माणसात बदल होतो. या निमित्ताने अजून एक मस्त विचार मिळाला, ठराविक लोक आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले नाही की respect करत नाहीत असंं वाटतंं. आपला acceptance कमी होतो. कारण हे डोक्यात जाऊन बसतं की ही व्यक्ती माझ्या अपेक्षे प्रमाणे वागत नाहीये. आपल्या मनाप्रमाणे वागले की respect. मन कमजोर असल की अहंकार असतो.  आणि आत्मसन्मान कमी होतो. ती व्यक्ती लवकर डिस्टर्ब होते. संवेदनशील असणं वेगळं, जी व्यक्ती संवेदनशील असते ती लगेच hurt होते आणि react होते, असं आजकाल बोलल जात. पण मनाची स्थिरता लवकर हलते त्यामुळे असं घडतं. जेव्हा दुसऱ्याच्या वागण्यावर माझा आनंद अवलंबून असतो, तिथेच तर प्रोब्लेम्स सुरु होतात.  कारण माझा आनंद मी माझ्यात मिळवू शकत नाही. त्यामुळे आपण  दु:खी होतो. आपला मान आणि अपमान आपण ठरवायचा. आत्म्याची ताकद वाढली की आत्मविश्वास वाढतो आणि आत्मसन्मान वाढतो.  माणसाच्या आयुष्यात सहन न होणारी दु:ख फार कमी असतात. बाकी सगळे प्रश्न आपण ओढवून घेतो. रोजच्या गोष्टीनी आपण लगेच चिडतो आणि त्याला मोठ करतो, दु:खी होतो. आपण आपला आनंद टिकवण्यासाठी आपलं मन आनंदी ठेवायचं आणि एखादी अशी व्यक्ती अआपल्या सहवासात आली जिचं मन कमजोर आहे आणि त्यामुळे ती रागवते, चिडचिड करते असं लक्षात आलं तर त्रास करून घ्यायचा नाही. कारण आपला आनंद आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे बघा किती सोप्पंं, आपल्याला राग आला तर आपलं मन कमजोर आहे आणि समोरच्याला राग आला तर त्याचं मन कमजोर आहे. या दोन्ही केसमध्ये चूक कोणाचीही नसल्यानी आनंद कमी होण्याची गरज नाही...
मला माहितीय, अवघड आहे हे, पण अवघड गोष्टी करण्यातच खरी मज्जा आहे. क्यो की, बेटा, तेरी ख़ुशी तुझमेही छुपी हुई है.....   
                                                                                                                             डॉ. विनया केसकर