आता तू माझं ऐक....
मनातल्या विचारांवर मात करणं तितकं सोप नाही. कारण हेच मन समोरच्या व्यक्तीबाबत, परिस्थितीबाबत मत तयार करून मोकळं होतं. कित्येकदा अगदी प्रेमात वागणारी अचानक विचित्र वागु लागतात. त्याची नेमकी कारणं कऴत नाहीत. कारण मनाचं कसं असतं, त्याला जशी सवय लावावी तसं ते adjust होतं. त्याला बिच्चा-याला खरच काही कळत नाही. त्यातल्या त्यात अति संवेदनशील मन असणा-यांच जरा कठीणच आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी नीट, पहिल्यासारखी बोलत नाहीये असं लक्षात आलं की, मन विचारांच्या प्रवासाला निघतं. ब-याचदा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधून मिऴत नाहीत. काही वेळा काळ हेच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. पण हे सगळ मनाला समजावून सांगण काही सोप नाही.
परिस्थितीवर मात करणं एक वेळ सोपं. पण दुस-याच्या विचित्र वागण्यामुळे होणा-या त्रासावर मात करणं खूप कठीण. कारण परिस्थिती बदलणं आपल्या एकट्याच्या हातात आहे. समोरच्या व्यक्तीनी कसं वागावं हे आपल्या हातातच नाही. मला असं वाटतं, खरचं ज्यांना आपली काळजी वाटते त्यांना आपलं मन, भावना कळतातच. अगदी आपलं चुकत असलं तरी अशी माणसं आपल्या विचित्र वागण्याकडे लक्ष देत नाहीत. आपल्या मनःस्थितीचा विचार करून , आपल्याला बरं वाटावं म्हणून जे करायचं ते करतात. पण नीट विचार केला तर असही वाटतं, खरच असं असतं? म्हणजे आपल्या मनातलं दुःख, नाराजी दूर करणं कोणाला जमू शकतं? किंवा कोणाला खरच त्याचं इतकं पडलेल असतं?
त्रास कमी होऊन आनंदी तर रहायच आहे. पण कोणी मदत करत नाहीये. अशा वेळी त्रास होतो. पण एक मात्र खरं की, अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत न करणारे आपले नाहीत हा साक्षात्कार तरी होतो. मग मनाचा प्रवास सुरू होतो एका वेगळ्या दिशेनी. ही उदासी, एकटेपणा दूर करण्यासाठी मनाला वेगळ्या कामात गुंतवलं की ते ऐकतं. अर्थात ते येड्यागबाळ्याचं काम नाही. कारण मनाला असं नेहमीच वाटतं की, कोणीतरी गोंजारावं, समजूत काढावी . पण मनानी आपल्यावर राज्य करण्याआधी आपणच त्याच्यावर स्वार झालं की मग त्याची थोडी पंचाईत होते. हे सगळं म्हणलं तर अतिशय सोपं आहे, नाही तर अशक्य. पण आपला जन्म अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठीच झालाय बॉस. कारण दुःखी, कष्टी रहाणं हे काही आपल्यासारख्यांना शोभत नाही. चला तर मनाला वेगळ्या कामांमध्ये गुंतवून त्याची पंचाईत करण्याचा प्रयत्न करू या. पाहू तरी जमतंय का?