Saturday, 28 November 2015

 हरवलेली माणुसकी .....


खरं तर लिहिण्याचा मूड कायम असतो. रोज काही ना काही तरी असं घडतच की त्यावर आवर्जून लिहावं असं वाटतं. पण priorities या नावाखाली आपल्याला काय हवय ते करणच आपण सोडून देतो. वेळ ही एक अशी गोष्ट आहे जेव्हा ती आपल्याकडे असते तेव्हा तिची किंमत कळत नाही .  जेव्हा ती   निघून जाते तेव्हा कितीही साक्षात्कार झाला तरी त्याचा उपयोग नसतो.  म्हणून आज ब-याच दिवसांनी वेळेचा सदुपयोग करत तुमच्याशी संवाद साधतीय. 
जग बदलतय असं आपण सगळेच नेहमी म्हणतो. आपणही बदलतोय हे मात्र लक्षात येत नाही. जगाप्रमाणे वागून आपण आपलं असं काही ठेवत नाही. खरं म्हणजे असं करायची काही गरज नाही. आपण जसे आहोत तसेच रहायला काय हरकत आहे. मला तर असं वाटतं आपण वेगळं काही वागायला गेलो तरच गडबड होते. 
जग बदलतय हा अनुभव आपल्या सगळ्यांना  रोजच्या जगण्यात येतोय. काल लोकलमध्ये एक घटना घडली जी मनाला चटका लावून गेली, बरच काही शिकवून गेली.  लोकलमध्ये दहा वर्षांपूर्वी जितकी गर्दी होती त्या मानानी कितीतरी पट गर्दी वाढलीय. ऑफिसच्या वेळांमध्येच नाही तर अगदी कधीही गर्दी असतेच हल्ली. जग बदलतय ना .... अजून एक ठळकपणे जाणवणारा बदल म्हणजे एकमेकांशी तुटलेला संवाद. मोबाईल नामक यंत्रात आपण सगळे इतके गुंतलोय की समोर कोणी बसलय याची जाणीवच नाही. त्यामुळे समोरच्याला होणारा त्रास वाचण्याचा प्रश्नच उरला नाहीये. आपल्याला जागा मिळालीय ना मग झालं तर. एखादा पेशंट उभा असला तरी त्याचा चेहेरा वाचण्यासाठी वेळ आहे कोणाला. आपल्याला मिळालेल्या जागेवर बसणे आणि मोबाईलमध्ये तोंड खुपसणे हेच महत्त्वाचं काम. स्टेशन आलं की उतरून जायचं. पण बदलणा-या या जगात संवादाचा अभाव ही खटकणारी गोष्ट आहे. बर , सहप्रवाशाशी बोलायला जावं तर ते कितपत आवडेल या शंकेनी गप्प बसलेलं बरं असं वाढत चाललय. एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तो विचारणं आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे नाक खुपसण्यासारखं झालय. 
संवाद वाढायला हवा हे प्रकर्षानी जाणवलं ती घटना आता सांगते. एक मध्यम वयाची बाई आपल्या दोन मुलांना घेऊन लोकलमधून प्रवास करत होती. डोक्यावर स्कार्फ होता. चेहेरा अगदी नॉर्मल होता. ती आजारी असेल अशी शंकाही आली नाही. नेहमीच्या धबडग्यात बायका चढत होत्या, उतरत होत्या. थोडी जागा झाली की तिथे बसण्यासाठी झुंबड उडत होती. खरं तर मला बसायला जागा हवी होती,  पण त्या बाईला बसायला जागा मिळाली. त्यावेळी तिचा थोडा राग आला. कारण मी बसणार इतक्यात ती बाई बसली. त्याच डब्यात तिची आई लांबून सूचना देत होती,  ''नीट बस, स्कार्फ नीट लाव.''  मला काही कळेना , हा काय प्रकार आहे. शेवटी न राहवून मी विचारलं तेव्हा ती बाई म्हणाली, ''कालच माझी दोन ऑपरेशन्स झाली. एक पोटाचं आणि दुसरं डोक्याचं. नगरच्या पुढे शेवगावला मला जायचं आहे. मुलांच्या शाळा बुडू नयेत म्हणून नव-यानी माहेरी राहू दिलं नाही. '' मी अक्षरशः चाट पडले. काय धीराची आहे ही बाई. सो कॉल्ड नाजुक बायकांनी आदर्श घ्यावा अशी. मला असं वाटलं, अगदी क्षुल्लक आजाराचा बाऊ करण्याची सवय लागलीय का आपल्याला ? 
परिस्थिती माणसाला कोणत्याही दुःखाशी दोन हात करायला शिकवते. त्या व्यक्तिला आपल्या  फक्त मॉरल सपोर्टची गरज असते. पण जग बदलतय या नावाखाली ही माणुसकी दाखवायला आपण कमी पडतोय की
 काय ?