Sunday, 3 May 2015

निसर्गासारखा नाही रे सोयरा...........



आपल्याला निसर्गाकडून शिकण्यासारखं खुप काही आहे. आपलं कर्तव्य निरपेक्षपणे बजवणे ही गोष्ट आपल्याला निसर्ग शिकवतो. म्हणजे बघा ना झाड कधी अशी फुशारकी मिरवतं का , बघा मी किती लोकांना सावली देतो. पाऊस कधी असं म्हणतो का  की , माझ्यामुळेच ही सृष्टी हिरवीगार आहे. सूर्य कधीतरी विकेंडला थंड हवेच्या ठिकाणी जातो का ? पण आपण माणसं मात्र आपल्या जवळच्या माणसांसाठी जरी काही केलं तरी हजार वेळा बोलून दाखवतो आणि परतफेडीची अपेक्षा करतो. इतकच कशाला आपला शब्द ऐकला जातो तोवर सगळी नाती प्रिय वाटतात. जेव्हा आपला अपमान होतो किंवा आपल्या मनाप्रमाणे वागलं जात नाही तेव्हा हीच आपली माणसं आपली वाटेनाशी होतात. निसर्गात मात्र असं होत नाही. याचा अनुभव नुकताच घेतला. 
माझ्या घराच्या छोट्याश्या गच्चीत एका पारव्याच्या जोडीनी  त्यांच्या प्रेमाचा पुरावा झाडाच्या एका कुंडीत ठेवला. सगळे सरपटणारे प्राणी, चिमण्या , पक्षी यांना आमच घर comfortable आणि सुरक्षित वाटतं की काय  काय माहित. जुनी लोकं म्हणतात ना, घर फक्त आपलच नसतं. त्याचा प्रत्यय येतो मला नेहमी. त्या पारव्याच्या जोडीतला बाबा,  आई आणि अंड्यांची सोय करून निघून गेला. आई मात्र त्या अंड्यांच रक्षण करत होती. त्यात मध्येच पाऊस पडायचा, कधी ऊन. कावळे दादा टपून होतेच. पण ती माऊली नेटानी आपल्या अंड्यातल्या पिल्लांचा सांभाळ करत होती. गच्चीत सगळीकडे पिसं आणि घाण झाली होती. बरं ती पिल्लं अंड्यातून बाहेर आल्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. मी खिडकीचा पडदा देखील हळूच उघडत होते. कपडे वाळत घालताना सुध्दा अलगद घालत होते. जरा खुट्ट झालं की ती आई मात्र लगेच आपले पंख पसरत होती. अगदी डोळ्यात तेल घालून आपल्या पिल्लांचा सांभाळ करत होती. तिच्या स्वतःच्या भूकेसाठी ती काय करायची काय माहित ? का मि. पारवा तिला काही आणून द्यायचे माहिती नाही. 
फायनली त्या अंड्यातून दोन गोंडस पिल्लं बाहेर आली. मी पहिल्यांदाच जवळून लाईव्ह इतकी गोडं पिल्लं पाहिली होती. मग तर मी बाळ बाळंतिणीला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही असं ठरवलं. तिचं तिच्या पिल्लांवरचं प्रेम पाहून मलाच भरून यायचं. अगदी कमी वेळातच त्या पिल्लांनी  आपले पंख फडफडवायला सुरूवात केली. मी रोज त्यांच्याकडे आणि त्यांच्या आईकडे बघायची. उगाच माझ्या आईपणाशी कम्पेअर करायची. माझं पिल्लू पहिल्यांदा पालथं पडलं, रांगायला लागलं, चालायला लागलं ते सगळे क्षण आठवून डोळ्यात पाणी आलं. त्या आईला पण असच वाटत असेल का असं वाटत होतं. ती आई आपल्या पिल्लांसाठी खायला आणायला बाहेर जायची तेव्हा उगाच मी त्यांच रक्षण करायची. त्यांना गरज होती का ? किंवा मी रक्षण करू शकतीय का ? याचा विचार न करता, मनानी सगळ करायची. ती आली की मी हुश्श करायची. 
काही दिवसांनी ती पिल्लं उडून गेली. आई पण दिसेना. मी बेचैन झाले. कुंडीत आणि गच्चीभर त्यांनी घाण करून ठेवली होती. पण त्या घाणीपेक्षा आई आणि पिल्लं कुठे गेली हेच मी शोधत होते. माणसं जितकी मी,  माझं करतात तितकं निसर्गातले सजीव करत नाहीत. आपल्या मुलांनी आपल्या म्हातारपणाची काठी व्हावं अशी अपेक्षा करत नाहीत. पिल्लं सुध्दा आई वडिलांच्या ईस्टेटीवर डोळा ठेवत नाहीत. आपलं कर्तव्य चोख पार पाडतात. परिणाम निसर्गावर सोडून देतात. या जिवंत अनुभवातून आपणच आपल्या अपेक्षांमुळे दुःखी होतो हे जाणवलं. निसर्ग नियम पाळला तर दुःखी होण्याचं कारण नाही. सुख आणि दुःख आपल्याचं कर्माचं फळ असतं. आपण जसं पेरतो तसं उगवतं. निसर्गातले सजीव कर्म करून फऴ निसर्ग देईल तसं स्वीकारतात. आपण मात्र फळ आपल्याच मनाप्रमाणे मिळावं असा हट्ट करतो. ईश्वर काय , निसर्ग काय त्यांच्या पदरचं काही देत नाहीत. आपल्या अकाऊंटमध्येच काही नसेल तर चेक बाऊंस होणारच ना? कोणत्याही गोष्टीत आपलं contribution किती आहे याचा विचार करून फळाची अपेक्षा केली पाहिजे. म्हणजे माझ्याच बाबतीत असं का ? हा प्रश्न पडणार नाही. निसर्ग नियमानुसार जे योग्य असतं तेच घडत यावर एकदा विश्वास बसला  की,  '' निसर्गासारखा नाही रे सोयरा.  गुरू, सखा बंधु , माय बाप  '' यावरही विश्वास बसतो.